आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
सचिन तेंडुलकरने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या बॅटचा आवाज आजही स्टेडियममध्ये ऐकायला येतो. सचिनने आजवर अनेक सामन्यात अत्यंत चांगली कामगिरी केली. सचिन मैदानात उतरणार म्हटल्यावर समोरच्या टीमच्या गोलंदाजांच्या मनात धडकीच भरायची.
असाच एक सामना होता १९९८ सालच्या कोका कोला कपच्या फायनलचा !
संयुक्त अरब अमिरातीच्या संघाने शारजाहमध्ये झालेल्या सामन्यात सचिनच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने विजय संपादन केला होता. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या मनात या सामन्यानंतर सचिनची एक भीतीच बसली होती.
या मालिकेत विजय संपादन करून भारत आणि ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये आपले एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. न्यूझीलंड या मालिकेत खेळणारा तिसरा संघ होता, जो बाहेर पडला होता. भारताने नाणेफेक जिंकली आणि कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीनने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सपाट पिचवर गोलंदाजी करणे आणि नंतर लाईटमध्ये फलंदाजी करणे जास्त फायद्याचे आहे, हे अझरुद्दीनच्या लक्षात आले. त्याला वाटले गोलंदाजांच्या हातून चेंडू निसटेल आणि फलंदाज त्याचा फायदा घेऊ शकतील.
सामना सुरू झाला आणि व्यंकटेश प्रसादने पहिला बॉल फेकला आणि मोहम्मद अझरुद्दीनच्या चेहऱ्यावर हलका आनंद पसरला. भारताने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. त्याला माहिती होते की ऑस्ट्रेलियन संघाला या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड ठरणार आहे.
तिसरा ओव्हर अजित आगरकरने टाकला. यात मार्क वॉने चकवा खाल्ला आणि चेंडू बॅटच्या किनाऱ्याला लागून सरळ मागे यष्टीरक्षक दिनेश मोंगियाच्या हातात गेला.
ऑस्ट्रेलियन संघाचा स्कोअर १८ रन्सवर १ विकेट असा झाला होता. रिकी पॉन्टिंगने पुढे एक रन घेऊन खाते उघडले. तो चांगले रन काढेल असे सगळ्यांनाच वाटले होते पण, व्यंकटेश प्रसादच्या एका गुडलेन्थ बॉलवर पॉन्टिंगच्या बॅटला स्पर्श करत चेंडू किपरच्या हातात गेला आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये शांतता पसरली. पॉन्टिंग फक्त २ मिनिटे खेळपट्टीवर टिकला. ऑस्ट्रेलियन टीमचा स्कोअर १९ वर २ विकेट असा झाला.
मॅचवर पकड मजबूत होते आहे, हे लक्षात आल्यावर अझरुद्दीनने खेळाडूंना नवीन रणनीती समजावून सांगण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियन टीम आपल्या टीमसमोर सरेंडर करत असतानाच फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट याने ४५ धावा करून सामना पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ऑस्ट्रेलियन संघाची मिडल ऑर्डर पूर्णपणे नेस्तनाबूत झाली होती. ऑस्ट्रेलियाची ८५ वर ५ अशी दुरावस्था झाली होती.
अशातच मैदानावर स्टीव्ह वॉचे आगमन झाले. त्याने सिंगल डबल करून स्ट्राईक रोटेशन सुरु ठेवले. पण रन काढण्याच्या नादात मायकल बेव्हन रनआउट झाला. यानंतर कॅप्टन स्टीव्ह वॉने अत्यंत जबाबदारीने सामान खेळला. त्याने आणि डेरेन लेहमनने ७०-७० रन बनवले. एकवेळ तर अशी आली की ऑस्ट्रेलियन संघ संपूर्ण बाद होण्याची स्थिती निर्माण झाली होती. पण ५० ओव्हरमध्ये २७२ रन्सवर ९ विकेटचा समाधानकारक स्कोअर उभा करण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले.
आता त्यांना गोलंदाजी करून विजय संपादन करायचा होता, त्यांच्याकडे फ्लेमिंगसारखे गोलंदाज आणि शेन वॉर्नसारखा स्पिनर होता, ज्यांच्यात सामना पालटण्याची ताकद होती.
ऑस्ट्रेलियाच्या २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला. सगळ्यात पहिले सौरव गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानात आले. हे राईट आणि लेफ्ट हॅन्डचे कॉम्बिनेशन होते. दोघांनी सांभाळून सुरुवात केली.
सचिनने कव्हर ड्राइव्ह, स्क्वेअर ड्राइव्ह लावून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आपले मनसुबे जाहीर केले. ८.४ ओव्हरमध्ये भारताने ३९ रन्स केले होते. पुढे फ्लेमिंग बॉलिंग करायला आला आणि फटका मारण्याच्या नादात गांगुली आउट झाला. यानंतर ऑस्ट्रेलियन संघात उत्साह संचारला. गांगुली गेल्यावर मोंगिया फलंदाजी करायला आला आणि २८ रन्स करून आउट झाला. एकीकडे विकेट पडत असताना सचिन मात्र जोरदार शॉट मारत होते.
टीम इंडियाची १२८ रन्सवर २ आउट अशी स्थिती निर्माण झाली. आता टीमला विजय मिळवून देणे हे सचिनच्या हातात होते. रन्स करण्याच्या उद्देशाने कॅप्टन अझरुद्दीन मैदानावर आला. त्याने सचिनसमवेत हळूहळू सामना पुढे नेण्यास सुरुवात केली. बघता बघता दोघांनी चांगली पार्टनरशिप केली. टीमचा रनरेट वाढत होता.
आणि सचिनने आपले शतक पूर्ण केले.
सचिनवर आता मॅचमध्ये विजय मिळवून देण्याची जबाबदारी होती. पण आता शेन वॉर्नच्या रूपाने एक मोठा अडथळा समोर आला. शेन वॉर्नचा स्पिन धोका देऊ शकत होती. अशावेळी धैर्य न गमावता सचिनने वॉर्नच्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. त्याने वॉर्नच्या गोलंदाजीवर आक्रमक होण्याचा निर्णय घेतला. बॉल स्पिन व्हायच्या आधीच सचिन त्याची दिशा ओळखायचा आणि तसा टोलवायचा सचिनने वॉर्नला विकेटसाठी खूप त्रास दिला.
सचिनच्या बेजोड फलंदाजीच्या बळावर भारत विजयाच्या अगदी जवळ जाऊन पोहचला. शेन वॉर्नने १० ओव्हरमध्ये ६१ रन्स दिले. सचिनने १३१ बॉलमध्ये १३४ धावा केल्या. ९ चेंडू राखून भारताने सामन्यात विजय मिळवला.
सचिन या सामन्यात आउट झाला पण मॅच भारताच्या ताब्यात देऊन गेला. शारजाहमध्ये ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव झाला. सचिनने या टूर्नामेंटमध्ये असामान्य कामगिरी करत ९ सिक्स मारले होते. सचिनला या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच ‘किताब बहाल करण्यात आला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.