आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
साराभाई vs साराभाई ही अगदी घराघरात पोहोचलेल्या सीरिअल्सपैकी एक. २००४ ते २००६ मध्ये आठवड्यातून एकदा लागणारी ही सीरिअल तिच्या आउट ऑफ द बॉक्स कॉमेडी आणि पात्रांच्या केमिस्ट्रीसाठी लोकप्रिय होती. होती काय आज १५ वर्षांनंतरही तेवढीच लोकप्रिय आहे.
इंद्रवधनचे वन लायनर्स, मोनिषाच्या मिडल-क्लास सवयींमुळे हैराण असलेली सोफिस्टीकेटेड माया साराभाई, रोसेषच्या विचित्र कविता आणि हा सगळा वेडेपणा बॅलंस करणारा साहिल साराभाई. हे सगळे आपल्या घरचेच सदस्य झाले होते.
आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की हे नट जेव्हा सिरिअल्समध्ये काम करत नाही तेव्हा काय करत असतील किंवा काम करणं बंद केल्यावर काय करत असतील.
या सीरिअलमधले बहुतेक सगळेच लोक अजूनही फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत पण एक व्यक्ती अशी आहे जिने सगळं सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. तो म्हणजे रोसेष साराभाई म्हणजेच राजेश कुमार.
जर तुम्ही साराभाई फॅन असाल तर माया-इंद्रवधनचा लहान मुलगा रोसेष साराभाई याला विसरूच शकत नाही. त्याच्या कविता कितीही विचित्र असल्या तरी त्या अजूनही लोकांच्या मनातून गेलेल्या नाहीत.
राजेशने साराभाई व्यतिरिक्त इतरही अनेक सिरिअल्समध्ये अगदी आत्तापर्यंत काम केलं आहे. आपल्या बहिणीच्या उपचारासाठी पटणावरुन मुंबईला येऊन सुरुवातीला नाटकात काम करत हळूहळू टीवीकडे आपला प्रवास सुरु केला. केवळ मेहनतीच्या जोरावर त्याने आपले करिअर उभे केले.
खरंतर मुंबईचा, फिल्म इंडस्ट्रीचा झगमगाट, सगळे ऐशोआराम सोडून शेती करण्याचा निर्णय घेणं सोपी गोष्ट नाही.
पण राजेश यांनी आपल्या गावात जाऊन तिथल्या गावकऱ्यांना जैविक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणे, त्याचे फायदे याबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी झिरो बजेट फार्मिंग/जैविक शेतीच्या माध्यमातून त्यांच्या १० एकर शेतीमध्ये भाज्या आणि इतर पिकांचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.
पटनापासून १२५ किमी अंतरावर असलेल्या बरमा या आपल्या गावात वीजपुरवठा नसल्याने होणाऱ्या समस्यांना दूर करण्यासाठी सगळ्यात आधी स्थानिक अधिकाऱ्यांची मदत घेऊन गावात वीज पोहचवली. खरंतर राजेशने आपल्या एका मित्रापासून प्रेरणा घेऊन शेती करण्याचा निर्णय घेतला, शेतीमधून उत्पन्न तर चांगले होतेच पण याशिवाय आपल्याच गावातील जवळजवळ शंभर शेतकऱ्यांना रोजगार मिळवून दिला.
राजेश गावांतील शेतकऱ्यांची गरिबी दूर करू इच्छितात आणि स्वतः जैविक शेतीचा मार्ग निवडून एक उत्तम आदर्श घालून देत आहेत.
राजेश एका मुलाखतीत सांगतात की मुंबईजवळ एखाद्या गावात राहण्यापेक्षा चांगलं आपण आपल्या गावात राहून गावाचा विकास करावा. मोठ्या शहरात चौकीदार किंवा ड्रायव्हरची नोकरी करण्यापेक्षा आपण गावात जैविक शेती करुन जास्ती कमाई करू शकतो. रसायने, कीटकनाशक यावर खर्च होणारा पैसा जैविक शेतीमुळे वाचतो आणि शेतकरी आपली कमाई ४०% ने वाढवू शकतो.
राजेश यांचे वडील शिवानंद प्रसाद आपल्या मुलाच्या ह्या निर्णयाने खूप खुश आहेत. ते सांगतात की “Rally For River” या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
राजेश आपल्या या कामानी आपल्या देशातील शेतकऱ्यांची गरिबी दूर करू इच्छितात. आपल्या आयुष्याला मिळालेल्या ह्या नवीन दिशेमुळे राजेश खूप खुश आहेत.
त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.