आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी क्रिकेटला धर्माचा मान दिला जातो. जितके क्रिकेटवेडे लोक आपल्या देशात आहेत तितके जगाच्या पाठीवरील कुठल्याच देशात सापडणार नाहीत, अगदी क्रिकेटचा जन्मदाता असलेल्या इंग्लंडमध्ये देखील नाही. क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळं संपूर्ण क्रिकेट टीमला मोठा मानसन्मान मिळतो. क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार होणं ही प्रत्येक खेळाडूच्या मनातील प्रमुख सुप्त इच्छा असते.
भारतीय क्रिकेटमध्ये ‘कर्णधारपद’ हा नेहमीच एक संवेदनशील विषय राहिला आहे. आजवर टायगर पतौडी, कपिल देव, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली अशा कित्येक दिग्गजांनी संघाचं कर्णधारपद भूषवलेलं आहे. अनेकदा एखाद्याला खेळाडूला कर्णधारपद देताना किंवा त्याच्याकडून ते काढून घेताना वाद-विवादही निर्माण होतात.
काही दिवसांपूर्वी भारतीय टी ट्वेंटी संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यानं आपण टी ट्वेंटी वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्याच्या जागी रोहित शर्माच्या हाती संघाची धुरा सोपवण्यात आली होती.
तेव्हापासून भारतीय क्रिकेटमध्ये अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. ८ डिसेंबर २०२१ रोजी बीसीसीआयनं या चर्चांना आणखी हवा देणारी घोषणा केली. बीसीसीआयनं टी ट्वेंटी संघाचा विद्यमान कर्णधार असलेल्या रोहित शर्माला एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोपवल्याची घोषणा केली. रोहित शर्मा हा तोच खेळाडू आहे, ज्याला बीसीसीआयनं २०११ च्या वन-डे वर्ल्डकप स्क्वाडमधून बाहेर ठेवलं होतं.
२०११ चा क्रिकेट वर्ल्डकप भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचा ठरला. १९८३ नंतर पुन्हा एकदा भारतानं वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इतिहास रचणारा हा भारतीय संघ खासच होता. विश्वविजेत्या संघामध्ये तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समतोल साधण्यात आला होता. मात्र, त्यातून एक प्रमुख नाव गायब होतं ते म्हणजे रोहित शर्माचं.
सध्याच्या घडीला धडाकेबाज सलामीवीर, जगातील टॉप टेन फलंदाजांमध्ये समाविष्ट असलेला आणि २००७च्या टी-ट्वेंटी वर्ल्डकप विजेत्या स्क्वाडचा भाग असलेल्या रोहितला २०११ साली १५ खेळाडूंच्या भारतीय चमूमध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. रोहित सारख्या गुणी खेळाडूला आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धेतून वगळण्याचं नेमकं काय कारण होतं?
विश्वचषकापूर्वी म्हणजे २००९ साली रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्यामुळं साधारण ५ ते ६ आठवडे तो क्रिकेटपासून लांब होता. त्यानंतर, त्यानं कॅलेंडर वर्षात देशासाठी फक्त सात इनिंग खेळल्या. त्यात त्यानं २५.५ च्या सुमार सरासरीने धावा केल्या होत्या. नंतरच्या वर्षी म्हणजे २०१० मध्येही रोहितचा खराब फॉर्म कायम राहिला. वर्षभरात त्यानं टीम इंडियासाठी खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये ३८.८ च्या सरासरीनं केवळ ५८६ धावा केल्या. त्याचा खराब फॉर्म आणि वर्षभरातील सुमार कामगिरी पाहता २०११ च्या वर्ल्डकप स्क्वाडमध्ये त्याला घेण्यात आलं नाही.
‘२०११ च्या वर्ल्डकपसाठी निवड न होणं हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात दुःखद क्षण होता. कारण संपूर्ण स्पर्धा आपल्याच देशात खेळवली जात होती आणि अंतिम सामना तर माझ्या घरच्या मैदानावर खेळला गेला,’ अशी खंत रोहित शर्मानं एका मुलाखतीमध्ये केविन पीटरसनशी गप्पा मारताना व्यक्त केली होती. या गोष्टीनं रोहितच्या संपूर्ण क्रिकेट कारकीर्दीवर परिणाम झाला. मात्र, हा परिणाम सकारात्मक होता.
खराब फॉर्मसोबत संघर्ष करून रोहितनं जोरदार कमबॅक केला. २०१३ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघ व्यवस्थापनानं त्याला वनडे फॉरमॅटमध्ये सलामीवीर म्हणून एक परमनंट जागा दिली. त्यानंतर रोहित शर्माच्या कारकीर्दीमध्ये कमालीचे बदल झाले. तेव्हापासून, हिटमॅननं कधीही मागं वळून पाहिले नाही. आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर त्यानं २०१५ आणि २०१९च्या वर्ल्डकप संघामध्ये जागा निश्चित केली.
आता तर त्याच्या गळ्यात कर्णधार पदाची माळच टाकण्यात आली आहे. विराट कोहलीसारख्या धडाकेबाज आणि यशस्वी कर्णधाराच्या हातात संघाचा कारभार असताना रोहितला त्याची जागा का देण्यात आली? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याचं उत्तर आपल्याला रोहितच्या आकडेवारीमध्ये सापडेल. ही आकडेवारी त्या सामन्यांची आहे ज्यामध्ये रोहितनं तात्पुरत्या कर्णधाराची भूमिका निभावलेली आहे.
एकदिवसीय फॉरमॅटमध्ये आतापर्यंत रोहितनं कर्णधार म्हणून १० सामने खेळले आहेत. त्यापैकी ८ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला आहे तर फक्त दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. म्हणजेचं त्याच्या नेतृत्त्वाखाली विजयाची टक्केवारी ८० टक्के इतकी आहे. रोहितनं जानेवारी २०१८ साली श्रीलंकेविरुद्ध भारताचं कर्णधारपद भूषवलं होतं. भारतानं ही मालिका २-१ ने जिंकली होती.
त्यानंतरच्या हाँगकाँग, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्यानं भारताचं नेतृत्व केलं होतं. यातील फक्त किवीजकडून त्याला पराभव स्विकारावा लागला होता. एकदिवसीय कर्णधार असताना त्यानं श्रीलंकेविरुद्ध ४ अर्धशतकं आणि दोन शतकं झळकावली होती. यामध्ये धडाकेबाज द्विशतकाचाही समावेश होता. याशिवाय इंडियन प्रिमियर लीगमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने केलेली कमाल तर प्रत्येकानं पाहिलीच आहे.
रोहित शर्मा कधीही कर्णधारपदाच्या दबावाला बळी पडत नाही. आपल्यावर असलेल्या जबाबदारीचा पूर्णपणे आनंद घेण्याची त्याला सवय आहे. त्याच्या डोक्यामध्ये कायम विजयाचेच विचार सुरू असतात. त्यामुळं पराभव झाला तर काय..? हा प्रश्न त्याला कधी पडतच नाही. त्यामुळं जेव्हा त्याला मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली तेव्हा त्याच्यातील लिडरशीप क्वालिटी आणखी खुलून समोर आली.
ही गोष्ट त्याच्या एकूण कारकिर्दीसाठी फारच फायद्याची ठरली आहे. अशा शब्दांत रोहितचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याचं एकदा कौतुक केलं होतं. रोहित शर्माची केवळ बॅटिंगच नाही तर कॅप्टन्सी देखील कमालीची आहे. त्याच्या डोक्यात काय सुरू आहे, याचा ठाव घेणं कठिण आहे, असं दिग्गज श्रीलंकन खेळाडू महेला जयवर्धने एकदा म्हणाला होता.
एकूण सर्व परिस्थितीचा सारासार विचार करून बीसीसीआयनं आता २०२३च्या वन-डे क्रिकेट वर्ल्डकपपूर्वी रोहितला कर्णधारपद बहाल केलं आहे. विराट कोहलीला आपल्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. ही कमतरता रोहित भरून काढेल,असा अनेकांना विश्वास आहे. आता रोहित हा विश्वास साध्य ठरवतो की नाही हे येणाऱ्या काळात सर्वांना दिसेलच.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.