आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारत आणि चीन यांच्या दरम्यान १९६२ साली झालेल्या युद्धात भारताला माघार घ्यावी लागली होती. चीनच्या लष्करी हालचालींची माहिती काढणारी एकही कुशल गुप्तचर संघटना अस्तित्वात नसल्याने या युद्धात आपल्याला योग्य ती रणनीती आखता आली नाही. भारताच्या गुप्तचर विभागामध्ये एखादा दुसऱ्या राष्ट्राची माहिती काढणारा उपविभाग असला तरी त्याचे काम अपुरे पडत होते. १९६५ साली झालेल्या पाकिस्तान सोबतच्या युद्धात तर याची प्रकर्षाने कमतरता जाणवली. इतर देशाच्या हलचाली मिळवणे आपल्या देशाच्या दृष्टीने किती गरजेचे आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाल्यानंतर गुप्तचर विभागाचेच दोन भाग करण्यात आले.
२१ सप्टेंबर १९६८ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गुप्तहेर विभागाचे दोन भाग करून रिसर्च अँड ऍनॅलिसिस विंग (RAW) म्हणजेच “रॉ”ची स्थापना केली. संपूर्ण जगाकडे आणि विशेषत: दक्षिण आशियावर लक्ष ठेवणे हेच ‘रॉ’चे प्रमुख काम होते.
जवाहरलाल नेहरूंच्या जवळचे आणि त्यांच्यासोबत अनेक परदेश वाऱ्या केलेले आर. एन. काओ यांनी गुप्तचर विभागात चांगली कामगिरी केली होती. रॉच्या प्रमुखपदाची सूत्रे इंदिरा गांधींनी काओ यांच्याकडे सुपूर्द केली.
आर. एन. काओ हे एक उत्कृष्ट हेर होते. रॉच्या स्थापनेपासून त्याची संपूर्ण बांधणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवण्यात आली होती.
फक्त तीनच वर्षात या गुप्तचर संस्थेने दक्षिण आशियाचा चेहरामोहरा बदलून टाकला.
त्यांचे पूर्ण नाव होते रामेश्वर नाथ काओ. त्यांचे नातेवाईक, सहकारी आणि मित्र त्यांना रामजी याच नावाने ओळखायचे. उत्तर भारतातील बनारस येथे १९१८ साली काश्मिरी ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. काओ यांनी अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातून एम. ए. केले होते. १९३९ साली ते भारतीय पोलीस सेवेत रुजू झाले. इंग्रजांनी १९२० साली गुप्तचर यंत्रणेची स्थापना केली होती. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी काही काळ इंग्रजांनी काओ यांना या गुप्तचर विभागाच्या संचलनालयात पदी नेमले होते. या गुप्तचर यंत्रणेतील बहुतांश अधिकारी हे ब्रिटीश होते.
काओ हे या विभागात काम करणारे पहिले भारतीय होते.
१९५० साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा इंग्लंडची राणी भारत भेटीवर येणार होती. यावेळी तिच्या सुरक्षेची जबाबदारी काओ यांच्यावरच सोपवण्यात आली. राणीच्या स्वागतासाठी मुंबईत एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणी हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना कोणीतरी तिच्या दिशेने फुलांचा एक बुके फेकला. काओ यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. तो बुके राणीपर्यंत पोहोचण्याआधीच त्यांनी हातानी झेलला. त्यांच्या या कौशल्यावर राणीने हसून, “चांगले क्रिकेट खेळू शकता,” अशी टिप्पणी केली होती.
१९६८ साली जेंव्हा काओ यांनी रॉची सूत्रे स्वीकारली तेंव्हा दक्षिण आशियातील घडामोडी वेगाने बदलू लागल्या. त्यांनी स्वतः २५० गुप्तहेर निवडले होते. ‘रॉ’च्या या गुप्तहेरांना कित्येक वर्षे काओबॉइज (kaoboys) म्हणून ओळखले जायचे.
त्यांना जेंव्हा हे कळाले की त्यांच्या गुप्तहेरांना काओबॉय म्हटले जाते तेंव्हा त्यांनी ‘रॉ’च्या बिल्डींगसमोर खरोखरच एक ‘काऊबॉय’चा पुतळा उभा केला.
पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान वेगळा करून बांग्लादेशची निर्मिती करण्यामागे काओ यांचा देखील मोठा हात होता. बांगलादेशच्या निर्मितीसाठी झगडणाऱ्या मुक्ती बाहिनीला काओ यांच्या नेतृत्वाखालील रॉने बरीच मदत केली होती. बांग्लादेशच्या निर्मितीसाठी भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धात भारताचा विजय झाला आणि १९७१ साली बांग्लादेश स्वतंत्र झाला. बांग्लादेशची निर्मिती हे काओ यांचे एक अभूतपूर्व यश होते असे मानले जाते. यामुळे त्यांचा दिल्लीच्या वर्तुळातील मानसन्मान उंचावला.
त्याकाळी शीतयुद्ध शिगेला पोहोचले होते. हिमालयाच्या कुशीत वसणाऱ्या सिक्कीम राज्यात काही तरी गडबड होण्याचे संकेत रॉला मिळाले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारणातील स्थितीही काहीशी तणावपूर्ण होती. १९६२ साली चीनकडून मिळालेल्या धड्यातून यावेळी काओच्या नेतृत्वाखालील रॉने अशी काही खेळी केली की सिक्कीम भारतात यशस्वीरीत्या विलीन झाले. चीनने या राज्यावर ताबा मिळवण्यापूर्वीच भारताने सिक्कीमचा ताबा स्वतःकडे घेतला आणि सिक्कीम हे भारतातील एक अंतर्गत राज्य बनले. यावेळी दिल्लीतूनही रॉच्या कामाचे जाहीररीत्या कौतुक करण्यात आले.
रॉच्या प्रमुखपदी असताना काओ यांनी भारतातील गुप्तचर विभागात काम करणाऱ्या एका संपूर्ण पिढीला राष्ट्राच्या संरक्षणाचे धडे दिले. सुमारे दशकभर ते रॉच्या प्रमुखपदी होते. याकाळात गुप्तचर विभागात रुजू होणाऱ्या प्रत्येक तरुण अधिकाऱ्याला त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. काओ अतिशय व्यवहारी होते आणि त्यांच्या कामातील हा व्यवहारी दृष्टीकोन त्याच्या सहकाऱ्यांना फारच कौतुकास्पद वाटत असे.
फ्रांसच्या गुप्तचर विभागाने काओ यांना १९७० च्या दशकातील पाच सर्वोत्तम गुप्तहेरामध्ये स्थान दिले होते.
फ्रांसच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख काउंट अलेक्झांडर मारेंचेस यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना म्हटले होते, “काओ यांचे व्यक्तिमत्व म्हणजे शारीरिक आणि बौद्धिक कुशलतेचा अनोखा संगम आहे. त्यांच्या या अनोख्या आणि अद्भुत व्यक्तिमत्वाने ते इतरांना मोहवून टाकतात. त्यांचे कर्तुत्व, त्यांच्यातील मैत्रभाव कौतुकास्पद आहे. तरीही त्यांना स्वतःच्या या गुणांबद्दल त्यांना अजिबात आत्मप्रौढी नाही.”
१९७७ साली ते रॉच्या प्रमुखपदावरून निवृत्त झाले. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी त्यांना मंत्रिमंडळाच्या सुरक्षा सल्लागार पदी नेमले.
त्यनिओ भारतातील अंतर्गत तज्ज्ञ समिती (थिंक टँक) म्हणून धोरण आणि संशोधन समितीची स्थापना केली. आजच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद साचीवालायाची ती एक पूर्वतयारीच म्हणावी लागेल. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) या भारतातील खास सुरक्षा दलाच्या स्थापनेतही त्यांचा मोठा वाटा होता.
अफगानिस्तान, चीन, इराण आणि दक्षिण आशियातील इतर कोणताही देश असो त्यांच्या ओळखीचे जाळे इतके खोलवर पसरलेले होते की, त्यांच्यासारखे इतके वैविध्यपूर्ण मैत्रीसंबंध निर्माण करणे कुणालाच जमणार नाही. फक्त एका फोन कॉलवरून ते परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकत होते. विभागा-अंतर्गत शत्रुत्वालाही नियंत्रणात ठेऊन ते नेतृत्व करत असत.
त्यांना प्रसिद्धीचा सोस नव्हताच त्यामुळे कुठल्याही सार्वजनिक व्यासपीठावर ते क्वचितच दिसत असत. अगदी मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या लग्नातही त्यांनी स्वतःचे फोटो काढले नाहीत. त्यांना अनेकदा त्यांचे आत्मकथन लिहिण्याविषयी सांगण्यात आले पण, प्रत्येकवेळी त्यांनी नम्रपणे नकार दिला.
अतिकुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले एक कुशल गुप्तहेर एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही. ते एक उत्तम शिल्पकारही होते. चित्रकार होते. त्यांना वन्यजीवाविषयी आकर्षण होते.
भारताच्या गुप्तहेर संघटनेची उभारणी करणाऱ्या काओ यांचा २००२ मध्ये वयाच्या ८४व्या वर्षी मृत्यू झाला. सुरक्षित भारताच्या उभारणीत अमुल्य योगदान देणाऱ्या काओ यांच्या स्मृती आपल्याला देशाच्या संरक्षणासाठी नेहमीच स्फूर्ती देत राहतील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.