आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
काही वर्षांपूर्वी ‘गाझी अटॅक’ नावाचा चित्रपट आला होता. यावेळी त्या चित्रपटाच्या पटकथेची आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांच्या नावाची देखील खूप चर्चा झाली होती. हा चित्रपट भारतीय नौदलातील जवानांच्या एका अशा मिशनवर आधारलेला होता, ज्यातील शौर्याने पाकिस्तानची देखील गाळण उडाली होती.
हे मिशन नेमकं काय होतं आणि त्याचं स्वरूप कसं होतं, हे आपण आता जाणून घेणार आहोत.
१९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान यु*द्धाच्या काही दिवस आधी घडलेली ही वास्तविक घटना आहे. याची सुरुवात त्यावेळी झाली ज्यावेळी पाकिस्तानच्या नौदलाने भारताचे एयर क्राफ्ट कॅरियर असलेल्या आयएनएस विक्रांतला नेस्तनाबूत करण्याची योजना आखण्यास सुरुरवात केली होती. या कामासाठी त्यांनी त्यांच्या अत्याधुनिक ‘गाझी’ या पाणबुडीची व्यवस्था केली होती.
पाकिस्तानला बंगालच्या खाडीवर आपली पकड मजबूत करायची होती, यावेळी त्यांच्या मार्गातील सर्वांत मोठा काटा होता ‘आयएनएस विक्रांत’.
पाकिस्तनच्या पाणबुडी ‘गाझी’चे खरे नाव युएसएस डिआबलो होते. पाकिस्तानने ही पाणबुडी अमेरिकेकडून खरेदी केली होती. १९६४ साली ही पाणबुडी पाकिस्तनाच्या नौदलात सामील करण्यात आली होती. रडारवर दृष्टीस न पडता ही पाणबुडी ११ हजार नौटिकल माइल्स अंतर सहजपणे पार करू शकत होती. याचाच फायदा पाकिस्तानने घेतला आणि त्या पाणबुडीला बंगालच्या खाडीत आणण्यात आले. भारतीय सैन्याला याबद्दल अजिबात माहिती नव्हती. याच काळात पाकिस्तानच्या नौदलाने लुब्रिकेशन तेलाच्या संदर्भातील एक गुप्त संदेश पाकिस्तानच्या हेडक्वार्टरला पाठवला. पण हा संदेश भारतीय नौदलाच्या हाती लागला. यानंतर नौदलाच्या लक्षात आलं की गाझीने त्यांच्या सीमेत प्रवेश केला आहे.
रडारला चकमा देऊन भारताच्या हद्दीत प्रवेश करू शकेल अशी ती एकमेव पाणबुडी होती!
याची माहिती मिळताच भारतीय नौदलाचे व्हाईस ऍडमिरल एन कृष्णन यांनी आपल्या टीमची बैठक बोलावली आणि गाझीचा ह*ल्ला परतवून लावण्यासाठी तैयारी करण्यास सुरुवात केली. गाझीच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे, असं पाकिस्तानच्या लक्षात येऊ न देणे फार आवश्यक होते, यासाठी भारतीय नौदलाने खोटे मेसेज प्रसारित करून पाकिस्तानला याबाबतीत कसलीही सूचना मिळू दिली नाही. या दरम्यान आयएनएस विक्रांतला अंदमानजवळील एका गुप्त ठिकाणी हलवण्यात आले. भारतीय सैन्याच्या योजनेचा पहिला टप्पा सफल झाला होता. या काळात गाझी विशाखपट्ट्नमच्या किनाऱ्याजवळ होती. ते विक्रांतवर ह*ल्ला करण्याची योजना आखत होते. त्यांनी यासाठी माईन्सच्या काही गुफा तयार केल्या होत्या.
गाझीचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलाकडून आयएनएस राजपुताना या दुसऱ्या महायु*द्धातील जहाजाचा वापर करण्यात येणार होता. एकदा विक्रांत सुरक्षित ठिकाणी पोहचले की आयएनएस राजपुताना त्याच्या स्थानावर जाऊन पोहचेल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. भारत आपल्या अत्यंत जुन्या जहाजाचा वापर एका अत्याधुनिक पाणबुडीच्या विरोधात करणार होता.
आयएनएस राजपुतानावरून कायम अशी संदेशाची देवाणघेवाण करण्यात येत होती, जेणेकरून हे जहाज विक्रांत आहे, अशा भ्रमात शत्रू राहील. या संदेशांनी पाकिस्तान भ्रमित देखील झाला. गाझी हळूहळू आयएनएस राजपुतानाच्या दिशेने सरकत होती. राजपुताना पाठवत असलेल्या सिग्नलचाच पाठलाग गाझी करत होती.
अल्पवधीतच गाझी राजपुतानाच्या समोर आली. आता राजपुतानावरील कॅप्टन इंदर कुमार यांनी कमान सांभाळत आपल्या जहाजावरील नेव्हीगेशन सिस्टम बंद केले. आता समोरासमोर टक्कर होणार होती.
३-४ डिसेंबरच्या मध्यरात्री, राजपुतानाच्या सोनार सिस्टमवर एक पाणबुडी असल्याची माहिती मिळत होती. कॅप्टन इंदर कुमार यांना पूर्ण विश्वास होता की त्यांच्या जहाजासमोर गाझीच आहे. त्यांनी लगेचच दोन मिसाईल डागण्याचे आपल्या जवानांना आदेश दिले. राजपुताना जहाजावरुन दोन मिसाईल डागण्यात आल्या आणि काही क्षणांत एक मोठा विस्फो*ट झाला. भारतीय नौदलाच्या जवानांना वाटलं की विस्फो*ट राजपुताना जहाजावर झाला की काय, पण तसं काही नव्हतं. हा विस्फो*ट ‘गाझी’वर झाला होता आणि यात ते जहाज पूर्णपणे नेस्तनाबूत झाले होते.
रात्रीच्या अंधारात कुठलाच निष्कर्ष काढता येत नव्हता, पण सकाळी काही मच्छिमारांना समुद्राच्या पृष्ठभागावर तेल आणि पाणबुडीचे अवशेष आढळून आले. त्यांनी लगेचच नौदलाला याबाबत सूचित केले. परीक्षण केल्यावर ही यु*द्धनौका युएसएस डिआबलो अर्थात ‘गाझी’ असल्याचे निष्पन्न झाले. गाझीने तिथल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत जलसमाधी घेतली होती.
पण अत्यंत आधुनिक असलेली गाझी बुडाली कशी याबद्दल अजूनही भारतीय नौदलाला समजले नव्हते. याची दोन कारणे देण्यात आली, पहिल्या कारणानुसार जहाजावरुन मारा करण्यात आलेल्या मिसाईल गाझीच्या इंधनाच्या टाक्यावर जाऊन आदळल्याने स्फो*ट होऊन ही पाणबुडी निकालात निघाली, दुसरे होते या पाणबुडीने विक्रांतला बुडवण्यासाठी तयार केलेल्या माईन्समध्ये स्वतःच अडकली व विस्फो*टात जलमग्न झाली.
पाकिस्तानने मात्र नेहमीप्रमाणे चोरी पकडली गेल्यावर हात झटकले होते, पाकिस्तानने स्टेटमेंट दिले होते की गाझी वाट चुकुन भारताच्या हद्दीत गेली होती व तिथे माईन्समुळे गाझीचा स्फो*ट झाला. आता एवढी अब्रू गेल्यावर पाकिस्तान कोडगेपणा करणारच.
खरी दाद त्या भारतीय नौदलाच्या जवानांना द्यायला हवी, ज्यांनी दुसऱ्या महायु*द्धातील जहाजाच्या बळावर एका अत्याधुनिक पाणबुडीचा सामना केला होता. त्यांच्या अजरामर शौर्याने भारताच्या सागरी सीमा अधिक सुरक्षित केल्या.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.