आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात अनादी काळापासून अनेक राजवंश, राजघराणी आणि त्यांची राज्ये राहिली आहेत. त्यांच्यामध्ये वेळोवेळी संघर्षसुद्धा होताना आपल्याला दिसून येतो, तर बाह्य आक्रमणांच्या प्रसंगी हीच राज्ये एकमेकांचा हात धरून शत्रूचा प्रतिकारही केल्याचे अनेक पुरावे इतिहास अभ्यासाच्या वेळी आपल्याला सापडतील. दक्षिण भारतातील प्रसिद्ध राजघराणे म्हणजे चोल राजवंश. या चोल राजांनी आपले साम्राज्य भारतीय उपखंडाच्या बाहेरही नेले. चोल राजा कारिकाला चोलच्या कर्तृत्वाबद्दल आणि पराक्रमाबद्दल तर आपण जाणून घेतलंच आहे.
चोल राजांबरोबरच केरळचे पेरुमल राजवंशसुद्धा इतिहासात असेच प्रसिद्ध आहे. या राजवंशाचे चोल राजवंशाबरोबर सलोख्याचे संबंध नव्हते. प्रदेशाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात सतत लढाया होत असत. पण केरळच्या पेरुमल राजवंशात एक उल्लेखनीय राजा होऊन गेला तो म्हणजे राम वर्मन कुलशेखर. राम वर्मन कुलशेखर हे चेरा साम्राज्याचे किंवा कुलशेखर घराण्याचे शेवटचे ज्ञात शासक आहेत. त्यांनी बहुधा इसवी सन १०९० ते ११०२ दरम्यान राज्य केले.
राम कुलशेखरा यांच्या शासकीय कारकिर्दीतील शिलालेख हे प्रामुख्याने क्विलँडीजवळील पँथलयानी कोल्लम, तिरुवालूर (पेरियारवर), चंगनासेरीजवळील पेरुन्ना, नेदुमपुरम थाली आणि कोल्लम येथे आढळतात. तंजावरमधील तिरुवलनचुझी येथे इसवी सन ११२२ चा एक शिलालेख सापडला. यामध्ये रामा कुलशेखरा यांचा उल्लेख आढळून येतो. त्यानुसार राम कुलशेखरा हे विक्रम चोल यांचे समकालीन राजे आहेत हे दिसून येतं.
जेव्हा राम वर्मन कुलशेखर सिंहासनावर आले तेव्हा राज्यात तीव्र राजकीय संकट आणि अस्थिरता होती. १०९६ च्या सुमारास, चोल सम्राट कुलोथुंगाने कोल्लमचे दक्षिणेकडील शहर काबीज केले. चेरा आणि चोल राज्यांमध्ये यु*द्ध सुरू झाले. चेर सैन्याची राजधानी चेरस, महोदयपुरम आणि आसपासची ठिकाणे निर्घृणपणे जाळून नष्ट केली गेली.
चोलांनी महोदयपुरमचा नाश केल्यानंतर राम वर्मा कुलशेखरांनी आपली राजधानी कोल्लमला हलवली. स्वतःचा राजवाडा नसताना, तो कोल्लममधील अत्यंत साध्या निवासस्थानात राहिला. त्याने त्याच्या यु*द्धात्मक कार्यांचे ठिकाण क्विलनला हलवले. त्याने कोल्लमचे चोलांपासून रक्षण केले. आक्रमक शक्तीविरुद्ध आत्मघाती पथके (चावर्स) तयार करून नायर नावाच्या टोळीने राम वर्मा कुलशेखराच्या बाजूने लढाई केली. चेरस स्वतः नायर होते की त्यांनी नायर्सला योद्धा वर्ग म्हणून नियुक्त केले हे सध्या अस्पष्ट आहे.
संस्कृत केरळ महात्म्य, ‘भूगोला’ पुराणातील एक उपपुराण, नायरांना देव, राक्षस आणि गंधर्व स्त्रियांसह नंबूदिरी पुरुषांची संतती म्हणते. या नायरांनी चोल सैन्याचे प्रचंड नुकसान केले. या प्रदेशातील चोल साम्राज्यवादाला हा पहिला धक्का होता आणि यांनी चेरा देशात शतकभर चाललेले चोल वर्चस्व संपवले.
राम वर्मा कुलशेखर यांच्या कारकीर्दीत अरब आणि मलबार यांच्यात मजबूत व्यापारी संबंध होते. अरब व्यापारी आले, मिरपूड आणि वेलचीसारख्या मसाल्यांचा तसेच मलबारमधून तलवारी, हस्तिदंत आणि रेशीमसारख्या वस्तूंचा ते व्यापार करत होते. मलबारमधील तलवार, सर्वोत्तम लोहार कारागिरीचे प्रतीक अरबांसाठी प्रतिष्ठेचे प्रतीक होते. अरब व्यापाऱ्यांमार्फत वस्तूंच्या व्यापाराबरोबरच सांस्कृतिक देवाणघेवाणही होत होती.
मक्कामध्ये पैगंबर मुहम्मद यांच्या उदयाची बातमी अरब व्यापाऱ्यांमार्फत मलबारमध्ये खूप वेगाने पसरली होती. जेव्हा प्रेषित मुहम्मद यांचा चमत्कार म्हणून चंद्राचे दोन भाग झाले, तेव्हा अरबी द्वीपकल्पाच्या आत आणि बाहेर अनेक लोक त्याचे साक्षीदार होते. राम वर्मन कुलशेखर हे त्यावेळी केरळचे राजा होते.
जेव्हा आपल्या महालाच्या छतावर राजा राम वर्मन कुलशेखर आराम करीत होते तेव्हा त्यांनीही तो चमत्कार पाहिला. राजाला अरब व्यापाऱ्यांद्वारे इस्लामबद्दल माहिती मिळाली आणि चंद्र फुटल्याच्या घटनेनंतर प्रेषित मुहम्मद आणि त्यांंच्या या धर्माबद्दल जाणून घेण्यास राजा राम वर्मन कुलशेखर अधिक उत्सुक होते.
या राजाने इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा संदर्भ एम. हमीदुल्ला यांनी लिहिलेल्या “मुहम्मद रसूलउल्लाह”, विल्यम लोगान यांनी लिहिलेला “मलबार मॅन्युअल” आणि बालकृष्णपिल्लई यांनी लिहिलेला “हिस्ट्री ऑफ केरला: एन इंट्रोडक्शन” या पुस्तकांमध्ये मिळतो. त्याच्यानंतर त्याचा मुलगा कोठा वर्मा आला आणि त्याच्या मुलाने कोल्लमसह काही काळ चेरा साम्राज्यावर राज्य केले. रामेश्वरथुकोइल शिलालेखातही रामवर्मा कुलशेखराविषयी बरीच माहिती आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.