आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
आजचा वर्तमानकाळ आपल्या भूतकाळासाठी भविष्यकाळ असतो. पेराल तेच उगेल हे जसे एका व्यक्तीसाठी लागू होतं तसं ते एका देशासाठीही लागू होतं. भुतकाळात केलेल्या राजकीय चुकांची भरपाई आजही भारत करतो आहे. चुकीच्या पध्दतीने हाताळलेला त्यावेळचा काश्मिरमधील सीमावाद भारताची आजही डोकेदुखी आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तर एका अविकसित देशाला विकसीत देश होण्याच्या मार्गावर आणुन ठेवता येते याची काही मोजकी उदाहरणे आज जगात आहेत. चीनला कम्युनिस्ट देश म्हणुन आज ओळखले जात असले तरी माओने केलेल्या बदलांमध्ये त्याचे खरे कारण दडलेले आहे.
भारतामधेही असाच एक दुरदर्शी नेता होऊन गेला, ज्याची राजकीय कारकीर्द म्हणजे २१ व्या शतकातील भारताच्या विकासाची रुपरेषाच होती. या दूरदर्शी नेत्याचे नाव आहे श्री. राजीव गांधी. पण, त्यांच्या राजकीय कारकीर्दीपेक्षा मृत्युलाच जास्त प्रसिध्दी मिळाली. आत्मघातकी हल्ला करुन श्रीलंकन नागरी युध्दात मध्यस्ती केल्याचा सूड म्हणुन त्यांचा खून करण्यात आला.
त्यांचा मृत्यू गूढ असला तरीही त्यांचं आयुष्य म्हणजे या गूढ शेवटाच्या अगोदर असणाऱ्या अनेक रंजक, दुरदर्शी आणि लोकहीतवादी निर्णयांनी भरलेलं होतं. आज आपण याच निर्णयांचा आढावा घेणार आहोत.
राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ला मुंबईमध्ये झाला. ते तीन वर्षांचे असताना त्यांचे आजोबा पंडीत जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांची आई इंदिरा गांधी यांनीसुध्दा भारताचे पंतप्रधानपद भुषविले आहे, तर त्यांचे वडील फिरोज गांधी खासदार होते.
राजीव गांधींनी आपले बालपण तीन मुर्ती हाऊसमध्येच घालवले. काही वेळेसाठी त्यांना डेहराडूनच्या वेल्हम शाळेत प्रवेश दिला गेला, तेथून लवकरच त्यांना हिमालयातील तलहटी येथील दुन शाळेच्या वसतीगृहात टाकण्यात आले. तेथून मग पुढील शिक्षण घेण्यासाठी ते केंब्रीजला गेले आणि लंडनच्या इंपेरीयल कॉलेजमधून त्यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी मिळवली.
राजीव गांधींना वैमानिक व्हायचे होते. ब्रिटनमध्ये जाऊन त्यांनी वैमानिक होण्याचे प्रशिक्षण घेतले आणि व्यावसायिक वैमानिक बनुन ते १९६६मध्ये भारतात परतले. केंब्रीज विद्यापीठात शिकत असताना त्यांची ओळख सोनिया गांधी यांच्याशी झाली आणि १९६८मध्ये त्यांनी सोनिया गांधी यांच्याशी लग्न केले.
राजकारणात रस नसलेल्या राजीव गांधींना संगीत आणि फोटोग्राफीची मात्र खुप आवड होती. राजकारणात येण्याआधी ते दिल्ली फ्लाइंग क्लबचे सदस्य होते. तिथुन त्यांनी नागरी हवाई प्रवासाचे प्रशिक्षणही घेतले होते. १९७०मध्ये त्यांनी एक वैमानिक म्हणुन एयर इंडियामध्ये काम सुरु केले.
परंतु, १९७५मध्ये लागू केलेल्या आणीबाणीमुळे नंतर लगेच इंदिरा गांधींना सत्ता सोडुन द्यावी लागली होती. त्यात १९८० साली लहान भाऊ, संजय गांधीचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अशावेळी आई इंदिरा गांधी यांना राजकारणात मदत करण्यासाठी त्यांनी देशाच्या राजकारणात प्रवेश केला.
१९८१मध्ये त्यांना कॉंग्रेस पक्षाच्या युवा गटाचा अध्यक्ष बनवण्यात आले. अमेठी मतदारसंघात ते खासदार म्हणुन लोकसभेवर निवडून आले. त्यांच्या नेतृत्वाखालीच कॉंग्रेसने केंद्रात आपले सरकार स्थापन केले. तसेच १९८२मध्ये भारतात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळी दिली गेलेली महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी लीलया पेलली.
१९८४मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर २४ तासांच्या आतच राजीव गांधी यांना पंतप्रधान म्हणुन निवडण्यात आले. यानंतर त्यांनी पुढे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी २५० पेक्षाही जास्त सभा घेतल्या. त्यांची मेहनत आणि सहानूभूतीच्या लाटेचा परिणाम म्हणुन त्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला ४०१ जागा मिळाल्या.
याचबरोबर राजीव गांधींची वयाच्या केवळ ४०व्या वर्षी देशाचे सातवे पंतप्रधान झाले. देशाचे सगळ्यात तरुण पंतप्रधान असलेल्या राजीव गांधींनी पंतप्रधानपदाची धुरा अगदी समर्थपणे सांभाळली.
एका आधुनिक विचारसरणीच्या व्यक्तीकडे पंतप्रधानपद सोपवले गेले आणि देशात नविन तंत्रज्ञान विकसित होण्यास सुरुवात झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान यातच भविष्यातील भारताच्या विकासाचा मंत्र दडलेला आहे हे त्यांनी चांगलेच हेरले होते. २१ व्या शतकातील भारत घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या बदलांची पायाभरणी त्यांनी सुरु केली.
त्यांनी केलेल्या मुलभुत बदलांच्या यादीत समाविष्ट होतो तो म्हणजे त्यांनी मतदानाचे वय. २१ वर्षांवरुन १८ वर्ष केले. युवकांना आपल्यात देश घडवण्याची क्षमता आहे हा विश्वास या निर्णयाने त्यावेळी दिला.
देशाला पुढे जायचे असेल तर डिजिटल तंत्रज्ञानाची गरज आहे, संगणकीकरण करणे गरजेचे आहे हे हेरुन त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले. देशाच्या युवकांना मुख्य पटलावर आणायचे असेल तर युवकांच्या हातात संगणक आणि विज्ञान या दोन गोष्टी असायलाच हव्यात हा त्यांचा आग्रह होता. विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी केला जाणारा शासकीय खर्च वाढवण्यात आला. संगणकाच्या किंमती कमी करण्यात आल्या.
१९८४ ते १९८९पर्यंत राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते. लघु संगणकाच्या संकल्पनेची आपली योजना त्यांनी सुरु केली. खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना ३२ बिट संगणक बनवण्यास परवानगी मिळाली. एमटीएनएल, बीएसएनएल, पिसीओ या कंपन्यांची सुरुवात राजीव गांधींच्या काळातच झाली.
लोकशाहीच्या यशाचे रहस्य ग्रामीण भागात दडलेले आहे म्हणून त्यांनी अनेक योजना गावपातळीवर पोहचतील याची खबरदारी घेतली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मोफत मिळावे म्हणून जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना केली.
पंचायती राजला संविधानिक मान्यता मिळवून देत देशात ३५ लाख नविन लोकप्रतीनिधी निवडून आले. आणीबाणीच्या धक्क्यानंतर देशातील लोकशाही धोक्यात आहे असे म्हणणाऱ्या टीकाकारांना हे चोख प्रत्यूत्तर होतं.
देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतू दुर्दैवाने त्यांना याच गोष्टीसाठी सगळ्यात जास्त टीका सहन करावी लागली.
श्रीलंकेत चालू असलेल्या नागरी युध्दात शांती सेना पाठवणे, पंजाब करार, आसाम करार, मिझोराम करार असे काही महत्त्वपूर्ण करार त्यांनी त्यावेळी केले.
२१ मे १९९१ ला पक्षाचा प्रचार करताना तामिळनाडू मधील श्रीपेरांबदुर येथे त्यांच्यावर लीट्टे या श्रीलंकन दहशतवादी संघटनेच्या समर्थकाकडून आत्मघातकी हल्ला करण्यात आला. यातच त्यांचा मृत्यू झाला.
राजीव गांधी म्हणजे भारतीय राजकारणाच्या निरभ्र आकाशात कायमस्वरुपी शुभ्रपणे झळकत राहणारे नक्षत्र आहे. एक असा धुमकेतू ज्याने फक्त भारतालाच नाही तर जगाला आपल्या दूरदर्शी विचारांच्या प्रकाशात उजळून टाकले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.