आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारताच्या इतिहासात काही राजांचे नाव काळ्या अक्षरात लिहिण्यात आले आहे, अशाच राजांपैकी एक प्रसिद्ध नाव आहे राजा जयचंद याचे !
राजा जयचंद देशभरात एक गद्दार म्हणून ओळखला जातो. पृथ्वीराज चौहानशी असलेल्या वैरामुळे राजा जयचंद मोहम्मद घोरीला जाऊन मिळाला होता आणि त्याच्यामुळे पृथ्वीराजचा यु*द्धात पराभव होऊन हिंदुस्थानावर परकीय सत्ताधीशानी वर्चस्व प्रस्थापित केले.
राजा जयचंदची ही बाजू आपण ऐकली असेल, पण इतिहासात काही तथ्ये अशी देखील आहेत, ज्यावर दृष्टिक्षेप टाकल्यास राजा जयचंद मुळात जसा चितारला जातो, तसा नव्हता, असेच वाटते. ही तथ्ये काय आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊ…
पृथ्वीराज चौहानाने अन्य राजपूत राजांच्या समवेत ११९१ साली मोहम्मद घोरीचा तराईच्या पहिल्या यु*द्धात दारुण पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मोहम्मद घोरी भारतावर चालून आला. त्याने पृथ्वीराज चौहानांना धडा शिकवण्याची तयारी करण्यास सुरुवात केली.
इकडे पृथ्वीराज चौहान मात्र राजा जयचंदची मुलगी संयोगिताच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. राजा जयचंदचा दोघांच्या या नात्याला विरोध होता. पण पृथ्वीराज चौहानांनी संयोगिताला पळवून तिच्याशी विवाह केला.
यामुळे जयचंदने पृथ्वीराज चौहानांशी असलेले सर्व संबंध तोडले.
जयचंद आणि पृथ्वीराज चौहान यांच्यात रणांगणावर अनेक वेळा यु*द्ध झाले आणि प्रत्येक वेळी पृथ्वीराज चौहानांना सहज विजय संपादन करता आला. पण या यु*द्धांमध्ये पृथ्वीराज चौहानाने आपले अनेक कुशल सेनानी गमावले. संयोगिताशी असं पळवून लग्न केलं म्हणून अनेक राजपूत राजे पृथ्वीराज चौहानांवर नाराज होते.
पृथ्वीराज चौहान यांच्याकडून वारंवार पराभूत झालेला राजा जयचंद प्रतिशोधाच्या अग्नीने पेटून उठला. पृथ्वीराज चौहानाचा प्रतिशोध घेण्यासाठी जयचंद मोहम्मद घोरीला जाऊन भेटला. त्याने घोरीला पृथ्वीराज चौहानांवर आक्र*मण करण्यासाठी आमंत्रित केले. आयतीच संधी मिळाल्याने घोरी हिंदुस्थानावर चालून आला, पृथ्वीराज चौहानांनी सर्व राजपूत राजांकडे व जयचंदकडे मदत मागितली. पण जयचंदने मदत करण्यास नकार दिला. इतर राजे देखील घोरीच्या पक्षात जाऊन उभे राहिले.
पृथ्वीराज चौहानांकडे तीन लाखांचे विशाल सैन्यदल होते. घोरीकडे फक्त १ लाख २० हजार सैनिक होते. ११९२ मध्ये तराईचे दुसरे यु*द्ध सुरु झाले. या यु*द्धात सुरुवातीला पृथ्वीराज चौहानांच्या सैन्याकडून सुरुवातीला वर्चस्व प्रस्थापित करण्यात आले पण त्यानंतर मात्र घोरीच्या घोडदळाने आपली बाजू भक्क्तम केली. बघता बघता पृथ्वीराज चौहानांचे सैन्य सैरभैर पळाले.
अखेरीस या यु*द्धात पृथ्वीराज चौहानांचा दारुण पराभव झाला व पृथ्वीराज चौहानांना हालहाल करून मारण्यात आले.
पृथ्वीराज चौहान यांच्या पाडावानंतर घोरीने कुतुबुद्दीन ऐबकवर भारताच्या मुस्लिम साम्राज्याचा कारभार पाहण्याची जबाबदारी सोपवली. पृथ्वीराज पराभूत झाल्याने जयचंद आनंदी झाला व त्याने उत्तरेत आपले वर्चस्व निर्माण केले. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. मोहम्मद घोरी भारतात परतला आणि जयचंदवर त्याने आक्र*मण केले. जयचंदाने स्वतः त्याचा सामना करण्याचा निर्णय घेतला. पण या यु*द्धात त्याचा बाण लागल्याने मृत्यू झाला. कनौज नगरीवर घोरीने आपले वर्चस्व निर्माण केले.
इथवरच्या कथेवर नजर टाकल्यास आपल्याला जयचंद एक देशद्रोहीच भासतो पण इतिहासकारांच्या मते मात्र वास्तव यापेक्षा वेगळं होते. डॉ. आनंद शर्मा म्हणतात की, राजा जयचंदच्या आयुष्यावर खूप संशोधन केले तरी त्याच्या मुलीचा संयोगिताचा उल्लेख त्यांना कुठेच आढळून आला नाही. कुठल्याही कागदपत्राच्या हवाल्याने जयचंदला संयोगिता नावाची मुलगी होती, हे सिद्ध होऊ शकत नाही, असे देखील शर्मा म्हणतात. इतकेच नाहीतर घोरीला जयचंदाने भारतात बोलावले हे सिद्ध करणारा एकही पुरावा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याउलट तराईच्या यु*द्धात पृथ्वीराज चौहान आणि जयचंद दोन्ही एकत्र लढल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे.
तराईच्या पहिल्या यु*द्धाच्या वेळी पृथ्वीराज चौहानाने राजा जयचंद यांच्या समवेत अनेक छोट्या राजांना यु*द्धासाठी आमंत्रित केले होते, असं म्हणतात पण तराईच्या पहिल्या यु*द्धात राजा जयचंद कुठेच आढळून आला नाही. जयचंद या यु*द्धात सहभागीच झाला नव्हता.
दुसऱ्या तराईच्या यु*द्धात मोहम्मद घोरीने चौहानांचा पराभव केला व कुतुबुद्दीन ऐबकच्या हातात सत्ता सोपवून तो परतला. वर्षभराने तो पुन्हा चालून आला आणि त्याने जयचंदाला मारले. पण यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, कारण, जर जयचंदाने घोरीला मदत केली होती तर त्याला का मारण्यात आले? याचे उत्तर आज इतिहासकारांकडे नाही, याविषयी पुरावा देखील त्यांच्याकडे नाही. इतकेच नाहीतर इतिहासकारांकडे जयचंदाने घोरीला मदत केली, हे सिद्ध करू शकेल असा दस्तऐवज देखील नाही.
त्यामुळे कथेत एक राष्ट्रद्रोही गद्दार म्हणून रंगवण्यात आलेला जयचंद मुळात तसा होता का? हा अजूनही वादाचा विषय आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.