आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याने अनेकांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. साहित्यात नोबेल मिळवणारे ते एकमेव भारतीय आहेत. त्यांनी अभिव्यक्तीच्या हरेक क्षेत्रात मुक्त संचार केला. भारतातील अनेक तरुण त्याकाळी रवींद्रनाथांच्या विचारांनी भारावलेले होते. त्यांच्या साहित्याचा जगभरातील अनेक भाषांत अनुवाद झाला. ज्यामुळे जगभरातील तरुणाईला या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे विचार जाणून घेता आले. चीनी तरुणांवर तर रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचा विशेष प्रभाव जाणवतो. रवींद्रनाथ आणि चीन यांचे नाते खूप जुने आणि गहिरे आहे.
रवींद्रनाथ टागोर यांनी वयाच्या २०व्या वर्षी म्हणजे १८८१ साली, ‘मॉर्टालिटी बिझनेस इन चायना’ नावाचा एक लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी चीनी नागरिकांच्या विचारांचे आणि जपान विरोधातील चीनच्या विद्रोहाचे समर्थन केले होते. रवींद्रनाथांच्या या लेखामुळे चीनी युवकांमध्ये एक जागरूकता निर्माण झाली आणि रवींद्रनाथांना किती अचूकपणे चीनी समस्येचे अकलन होते, हेदेखील दिसून आले.
नोबेल पारितोषिक मिळवणारे अशिया खंडातील रवींद्रनाथ एकमेव व्यक्ती होते.
त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी अनेक देशातून त्यांना निमंत्रणे येत असत. असेच एकदा जपानने रवींद्रनाथांना आमंत्रित केले होते. रवींद्रनाथांचा जपान प्रवास हा चीनमधील हॉंगकॉंगमधून होणार होता. हॉंगकॉंगमधल्या मुक्कामाच्या दरम्यान त्यांनी चीनी कामगारांशी गप्पा मारल्या. चीनी कामगारांची काम करण्याची पद्धत आणि त्यांची शिस्त पाहून रवींद्रनाथ प्रभावित झाले. कामगारांच्या विचारांनी रवींद्रनाथांना एक वेगळी दृष्टी मिळाली.
चीनमधील कामगारांशी मारलेल्या गप्पा आणि त्यांचे विचार यातून रवींद्रनाथ इतके प्रभावित झाले की, त्यांनी चीनी कामगारांच्या या मुलाखतीच्या संदर्भाने एक लेख लिहिला. ज्यामध्ये त्यांनी असे भाकीत केले होते की, या देशातील ही शक्ती जर अशीच शाश्वत राहिली तर, एक दिवस चीन जागतिक महासत्ता बनेल. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर,
“ताकद, काम करण्याचे कौशल्य आणि कामातून मिळणारे सुख पाहिल्यास मला असे वाटते की, या देशात एक अशी शक्ती आहे, जिचे जतन करणे शक्य आहे. चीनकडे अशी ताकद आहे, जिला अमेरिका देखील घाबरते, हे मी स्वतः पहिले आहे. चीनचा काम करण्याचा उत्साह आणि त्यांची काम करण्याची शक्ती यांना कोणतेही नुकसान पोहोचवू शकत नाही. म्हणूनच अमेरिका चीनपासून नेहमी चार हात दूर असते.”
चीनबद्दल रवीन्द्रनाथांनी केलेली ही भविष्यवाणी १९१६ मधील आहे. परंतु, चीनने आपल्या कर्तृत्वाने ही भविष्यवाणी सिद्ध करून दाखवली आहे. टागोर म्हणाले होते की, “एक दिवस चीन महासत्ता असेल. विज्ञानावर चीनचे नियंत्रण असेल आणि चीनला महाशक्ती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.”
चीनमधील बुद्धीजीवी लोकांमध्ये टागोरांबद्दल प्रचंड आकर्षण होते. टागोरांनी लिहिलेले मूळ साहित्य बंगालमधून लिहिले होते. त्यांचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि मग त्याचे चीनी अनुवाद झाले. अशाप्रकारे टागोरांचे बंगाली साहित्य चीनपर्यंत पोचले. चीनी तरुण तर रवींद्रनाथांच्या कवितांचे विशेष चाहते होते. त्यांच्या साहित्यातून प्रकट होणारे विचार चीनी तरुणांना प्रचंड प्रेरणादायी वाटत. चीनमधील बुद्धीजीवी गटावर रवींद्रनाथांच्या साहित्याचा इतका प्रभाव पडला होता की त्यांनी रवींद्रनाथांना चीनमध्ये येऊन आपले विचार मांडण्यासाठी आमंत्रण दिले. रवींद्रनाथांनाही चीनबद्दल आकर्षण होतेच. या आमंत्रणामुळे त्यांना चीनचा आणखी जवळून अभ्यास करणे शक्य झाले.
येणाऱ्या काळात भारत-चीन मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाल्यास हे दोन्ही देश अंधकारमय युगापासून आपला बचाव करण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावतील असे टागोरांचे मत होते. अनेकदा त्यांनी या मताचा पुनरुच्चार केला. त्यांनी स्थापन केलेल्या शांतीनिकेतन विद्यापीठात चीन भवन नावाने चीनी विभाग स्थापन केला. यातून चीन आणि भारतादरम्यानचे संबंध दृढ व्हावेत यामागची टागोरांची दृढ इच्छा स्पष्ट होते.
चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला २०२१ साली शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. आज चीनची जी प्रतिमा आणि चीनचे जे वास्तव आहे, शंभर वर्षापूर्वी त्याची कल्पना करणे देखील अशक्य होते. विसाव्या शतकातच चीनने हे ओळखले होते की, पश्चिमी राष्ट्रांना इतरांना गुलाम बनवायचे आहे. स्वतःला पोषक ठरणारे गुण इतरांमध्ये विकसित करण्याची कला त्याच्याकडे होती.
पण, चीनला कोणाच्याही अधीन जायचे नव्हते. त्यांना गुलाम बनायचे नव्हते. म्हणूनच चीनने आपल्या समाजासाठी, कुटुंबासाठी काही नियम व अटी बनवल्या. समाजात या नियमांचे कठोर पालन केले जाईल याकडे विशेष लक्ष पुरवले. आपल्या परंपरागत चौकटी राहून देखील चीनने आपल्या देशातील युवकांना विज्ञानाचा अभ्यास आणि संशोधन करण्यास प्रेरणा दिली. वस्तुत: याच उद्देशाने चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली होती.
चीनमध्ये क्रांतीची आग पेटत असतानाच रवींद्रनाथांना चीन दौरा करण्याची संधी मिळाली. चीनचे युवा नेते तुओंग रवींद्रनाथांच्या विचाराने प्रभावित झाले. तुओंग यांनी रवींद्रनाथांच्या विचारांना चीनी क्रांतीचा एक अविभाज्य भाग बनवला. रवींद्रनाथांनी भांडवली राष्ट्रवादावर टीका केली. त्यामुळे जपान आणि अमेरिकेकडून त्यांना टीका सहन करावी लागली.
अर्थात, १९१६ साली रवींद्रनाथांनी चीन बद्दल जे भाकीत केले होते. ते सत्य ठरले. चीनमध्ये क्रांतीची मशाल पेटली आणि पुढे पुढे मार्गक्रमण करत ही मशाल मोक्षाच्या मार्गापर्यंत पोहोचली.
विज्ञानाच्या क्षेत्रात चीनने खूप प्रगती केली. देशात विकास घडवून आणला. अनेक नवेनवे शोध देखील लावले. परंतु हे सगळे करत असताना तत्वांवरील निष्ठेला महत्व देत त्यांनी आपल्या मूळ संस्काराशी कधीही फारकत घेतली नाही.
टागोरांच्या विचारांना चीनी तरुणांनी आपल्या क्रांतीचा एक महत्वपूर्ण भाग बनवला. टागोर भारतीय असले तरी चीनच्या आजच्या विकासात टागोरांच्या विचारांचे महत्व अनन्य साधारण आहे. टागोरांची चीन आणि भारत यांच्यामध्ये बंधुत्वाचे संबंध निर्माण व्हावेत अशी खूप इच्छा होती. आजच्या घडीला टागोरांचे हे विचार चीन आणि भारत दोघांनीही समजून घेऊन एकमेकातील खोल दरी भरून काढण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.