आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारतात खेळांच्या बाबतीत फक्त पुरुषांनीच नाही, तर महिलांनी देखील एक महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. अनेक महिला खेळाडूंनी भारताचे नाव जगभरात प्रसिद्ध केले आहे. अशाच काही कर्तबगार महिला खेळाडूंपैकी एक आहे पी. टी. उषा.
अत्यंत मोठा संघर्ष केल्यानंतर पी. टी. उषा यांनी सफलता मिळवली होती. त्यांनी या संघर्षकाळात त्यांच्या रस्त्यात येणाऱ्या अनंत अडचणींवर मात केली होती. पी. टी. उषा यांनी ज्यापद्धतीने खेळाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली, ते निश्चितच अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
पी.टी. उषाचा जन्म २७ जून १९६४ रोजी केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यातील एका लहानश्या गावात झाला होता. पिलावुलाकंडी तेकपाराम्बी उषा हे त्यांचे नाव होते, जे उच्चारण्यास सोपे जावे म्हणून त्या ‘पी. टी. उषा’ असे संक्षिप्त नाव वापरण्यास त्यांनी सुरुवात केली.
एका साधारण कुटुंबात जन्माला आलेल्या पी. टी. उषा यांना आयुष्यभर संघर्षच करावा लागला होता. एक धावपटू बनण्यासाठी त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना लहानपणापासून खेळण्याची आवड होती. शाळेत असताना त्यांनी अनेक खेळाच्या स्पर्धांमधे भाग घेतला होता. या स्पर्धांमधे त्यांनी उत्तम कामगिरी केली म्हणून जिल्हास्तरावरील स्पर्धांसाठी त्यांची निवड करण्यात आली. पण पैशाच्या कमतरतेमुळे त्यांना यापुढे मजल मारता येत नव्हती. पण पी.टी.उषा यांनी हार मानली नाही. त्यांच्या आयुष्यात एक असे वळण आले ज्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडत गेले.
खेळांमध्ये त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना २५० रुपयांच्या स्कॉलरशिप मिळाली. १९७९ साली याचे देखील फार महत्त्व होते. आता त्यांना चांगल्या स्पोर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.
याच काळात त्यांना माहिती मिळाली की केरळमधे नॅशनल गेम्स होणार आहेत, यानंतर उषा यांनी रात्रंदिवस मेहनत घ्यायला सुरुवात केली आणि नॅशनल स्कुल गेम्समधे चांगली कामगिरी करण्याची तयारी सुरु केली. याठिकाणी उषा यांनी उत्तम कागिरी केली. त्यावेळी ओ एम नाम्बियार या त्याकाळच्या एका प्रसिद्ध धावपटू आणि प्रशिक्षकाने पी. टी. उषा यांची कामगिरी पाहिली आणि ते फार प्रभावित झाले. त्यांनी त्यावेळीच उषा यांना प्रशिक्षण देण्याचा चंग बांधला. नाम्बियार यांच्याकडून प्रशिक्षण घेणे उषा यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले.
असं म्हणतात की नाम्बियार यांनी पी. टी. उषा यांना चांगले प्रशिक्षण देऊन त्यांना उत्तम धावपटू बनवले. एका छोट्या गावातील मोडकळीस आलेल्या रस्त्यावर पळणारी पी. टी. उषा लवकरच ऑलिम्पिकच्या ट्रॅकवर पळू लागली. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपल्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केले. त्यांनी एक एक करत अनेक पदके जिंकली.
१९८० साली मॉस्को येथे झालेल्या ऑलिम्पिकमधे त्यांनी भारताचे नेतृत्व केले होते. पण ही एक ऑलिम्पिक त्यांच्यासाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखी होती, ८० मीटरच्या शर्यतीत त्यांना पाचवे स्थान मिळाले. कुठलंही पदक न मिळवता त्यांना भारतात परतावे लागले.
मॉस्को येथील ऑलिम्पिक स्पर्धेत खराब प्रदर्शन केल्यानंतर देखील त्या मागे ह्टल्या नाहीत, त्यांनी घाम गाळून आपली मेहनत घेणे सुरू ठेवले. १९८१ मधे झालेल्या सिनियर इंटर स्टेट कॉम्पिटिशनमधे त्यांनी चमत्कार घडवला. त्यांनी उत्तम कामगिरी केल्यामुळे १०० मीटरच्या शर्यतीला ११.८ सेकंदात पूर्ण केले आणि २०० मीटरच्या शर्यतीला २४.६ सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
१९८२ साली दिल्ली येथे झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत त्यांनी कमाल केली आणि सिल्व्हर मेडल मिळवले. यानंतर कुवेत सिटीमधे झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमधे त्यांनी गोल्ड मेडल मिळवले. १९८५ साली जकार्ता येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी भारताचा झेंडा उंचावला होता. याठिकाणी त्यांनी सहा पदके जिंकली होती. यात पाच गोल्ड आणि एका ब्रॉन्झ मेडलचा समावेश होतो. हा प्रवास येथेच थांबला नाही, १९८३ ते १९८९ सालापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी १३ सुवर्णपदकं नावावर केली.
मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे अद्वितीय यश कमावल्यामुळे त्यांना ‘क्वीन ऑफ इंडियन ट्रॅक’ आणि ‘पय्योली एक्स्प्रेस’ या नावाने ओळखले जात होते.
एक महिला धावपटू म्हणून पी. टी. उषा यांनी अनेक पदके नावावर केले. विदेशात त्यांनी केलेल्या प्रदर्शनामुळे भारतीय महिला देखील कमी नाहीत, हे सिद्ध करण्यात त्यांना यश आले. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे भारत सरकारने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. नॅशनल गेम्समधील उत्तम प्रदर्शनसाठी १९८४ मधे पी.टी.उषा यांना अर्जुन अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
हे वर्ष पी. टी. उषा यांच्यासाठी फार आनंदाचे होते. पी. टी. उषा यांच्या कार्याची माहिती भारतीयांना त्यावेळी झाली जेव्हा त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू म्हणून अनेकवेळा सन्मानित करण्यात आले. १९८६ साली उत्तम कामगिरीसाठी त्यांना आदिदासचा गोल्डन शु प्रदान करण्यात आला.
१९९१ साली पी. टी. उषा यांनी व्ही श्रीनिवासन यांच्याशी विवाह केला. २००० साली त्यांनी निवृत्ती घेतली, पण यानंतर देखील त्या थांबल्या नाहीत. त्यांनी केरळमध्ये एथलेटिक्स अकॅडमी सुरु केली ज्यात त्या नवीन खेळाडूंना प्रशिक्षण देतात.
भारताची धावकन्या पी. टी. उषा यांचा हा संघर्षमय प्रवास निश्चितच भारतातील अनेक महिला खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved