आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ईदा सिकमन नावाची एक जर्मन स्त्री चार दिवसांपासून एका घरात अडकून पडली होती. नऊ दिवसांपूर्वी काही कामगारांनी तिच्या घरासमोर भिंत बांधली, तिच्या अपार्टमेंट समोरचा जाण्यायेण्याचा रस्ता संपूर्णपणे तीन दिवसांपूर्वीच पोलिसांकडून बंद करण्यात आला होता.
ईदा ना कुठली चोर होती ना गुन्हेगार तरी तिला अशाप्रकारे बंदिवास घडला होता. तिची फक्त एकच होती, ती चुकीच्या वेळेस चुकीच्या ठिकाणी होती. तिचं अपार्टमेंट पूर्व जर्मनीत होतं आणि तिच्या घरासमोरच्या रस्त्यावर बर्लिन शहराला पूर्व आणि पश्चिम जर्मनीत विभाजित करणारी इमारत होती.
ईदाला स्वतःची सुटका करून घ्यायची होती. त्यासाठी ईदा प्रयत्नशील होती. तिने अखेरीस खिडकीच्या वाटे मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर उडी मारण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला आणि त्यात तिला तिचे प्राण गमवावे लागले. हॉस्पिटलला घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
१९४५ साली दुसरं महायु*द्ध संपुष्टात आलं होतं, जर्मनीला दोन्ही बाजूंनी दोस्त राष्ट्रांच्या फौजेने ताब्यात घेतले होते. त्यात पश्चिमेकडील भाग अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनच्या ताब्यात होता तर पूर्वेकडील भाग हा सोव्हिएत महासंघाच्या ताब्यात होता. पुढे या दोन्ही भागात दोन वेगवेगळी राष्ट्रे निर्माण करण्यात आली.
पश्चिमेकडील बाजूस तयार करण्यात आलेलं राष्ट्र होतं पश्चिम जर्मनी, जे पुढे जाऊन फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तर पूर्वेकडील भाग जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक म्हणून ओळखला जाऊ लागला. पश्चिम जर्मनी हा संपूर्णपणे अमेरिकेच्या भांडवलवादी तत्त्वांवर आधारलेला होता, तर पूर्व जर्मनी पूर्णपणे सोव्हिएत महासंघाच्या समाजवादी-साम्यवादी धोरणांवर आधारलेला होता.
जर्मनीची राजधानी असलेली बर्लिन ही दोन देशात विभागली गेली होती. बर्लिनचा अर्धा भाग हा पश्चिम जर्मनीत तर अर्धा पूर्व जर्मनीत होता.
१९६१ सालापर्यंत या दोन्ही देशात कुठलीही सीमारेषा अस्तित्वात नव्हती.
१९६१ च्या ऑगस्ट महिन्यात पूर्व जर्मनीतून होणाऱ्या घुसखोरीला कंटाळून पश्चिम जर्मनीने सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोणालाच सीमा ओलांडून जाणे शक्य झाले नाही. सीमेवर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. काही दिवसात दोन्ही भागांना वेगळं करणारी भिंत आणि तारांचं कुंपण उभं राहिलं.
अशा आणीबाणीच्या प्रसंगात असंख्य जर्मन नागरिकांनी पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत घुसखोरी करण्यास सुरुवात केली. १९६१ ते १९८९ या काळात तब्बल ५००० लोकांनी ती सीमारेखा ओलांडण्याचा प्रयत्न केला. यात असंख्य लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत स्थलांतर करण्याचा उद्देश एकच होता पूर्व जर्मनीत असलेल्या समाजवादी शासनामुळे तिथे लोकांची दुरावस्था झाली होती. त्या लोकांना खायची भ्रांत निर्माण झाली होती. या तुलनेत पश्चिम जर्मनी हे एक प्रगत राष्ट्र म्हणून नावारूपास येत होते. यामुळे पूर्व जर्मनीच्या लोकांचा ओढा पश्चिम जर्मनीकडे अधिक प्रमाणात होता.
बर्लिनच्या भिंतीला ओलांडण्यासाठी अनेकांनी प्रयत्नांची शर्थ केली होती. ईदा सिकमन यांच्या घराप्रमाणे अनेकांची घरे अशी होती ज्याच्या खिडक्या पश्चिम जर्मनीत उघडत होत्या अनेक लोकांनी त्या खिडकीतून उड्या टाकून पळ काढण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला. पश्चिम जर्मनीने त्या लोकांना येण्यास मदत देखील पुरवायला सुरूवात केली.
परंतु पूर्व जर्मनीच्या सैनिकांनी त्यांच्या खिडक्या दरवाजे सीलबंद करून त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गाला कायमचं बंद केलं. यामुळे नवीन पेच पूर्व जर्मनीतील नागरिकांच्या समोर उभा राहिला. पुढे बॉर्डरवरील संरक्षण अजून वाढवण्यात आलं.
एक नो मॅन्स लँडचा प्रदेश निर्माण करण्यात आला, या प्रदेशाला डेथ ट्रॅप देखील म्हटलं जाऊ लागलं.
या डेथ ट्रॅपमध्ये जो अडकायचा त्याचा शरीराची गोळ्यांनी चाळण केली जात होती. या अशा परिस्थितीत स्वतःचा जीव वाचवणे शक्य नव्हते, तरी देखील पुढाकार घेऊन बर्लिनची भिंत ओलांडून अनेकांनी ही भिंत ओलांडण्याचा भीम पराक्रम केला होता.
कोनार्ड शुमन हा अशाच काही धाडसी लोकांपैकी एक होता. त्याने बर्लिनच्या भिंतीचे तारेचे कुंपण ओलांड़ून पश्चिम जर्मनीत प्रवेश केला होता. असाच एक रेल्वे इंजिन ड्राईव्हर होता हॅरी डेटरलिंग, याने ट्रेन नुसती चोरली नाही तर त्याने ती ट्रेन पूर्व जर्मनीच्या शेवटच्या थांब्यापर्यंत नेली आणि त्याठिकाणी त्याने तब्बल २५ लोकांना घेऊन सीमा पार केली.
वूल्फगॅंग एंगल्स नामक एका पूर्व जर्मनीच्या सैनिकाने, ज्याने तारेचे कुंपण बांधायला मदत केली होती, एका रात्री स्वतः मोठ्या ट्रकला घेऊन भिंतीला तोडून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा दुर्दैवाने तो अडकला आणि त्याच्यावर सैनिकांकरवी दोन वेळा गोळीबार करण्यात आला पण त्याचा सुदैवाने तो सुखरुपणे त्यातून बचावला. त्यानंतर त्याने तडक पश्चिम जर्मनी गाठले.
अनेक लोकांनी पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत जाण्यासाठी जमिनी खालून सुरुंग बांधले होते. १९६२ साली पूर्व जर्मनीच्या काही विद्यार्थ्यांनी १३१ फूट लांबीचा भुयारी मार्ग निर्माण केला होता. यातून २९ लोकांनी पळ काढल्याचं नंतर लक्षात आलं. अजून एक ५७ फूट लांबीचा भुयारी मार्ग तयार करण्यात आला होता, ज्याच्या वाटे दोन दिवसात असंख्य लोकांनी पळ काढला होता.
हरमुट नावाच्या एका मुलाने तर भुयारी गटारातून तब्बल चार तास पोहून पश्चिम जर्मनी गाठली होती.
बेथके बंधू नामक दोन भावंडांनी तर याबाबतीत कमालच केली होती. त्यांनी एक विमान घेऊनच पश्चिम जर्मनीतून पूर्व जर्मनीत प्रवेश केला आणि अनेक नागरिकांची सुटका केली होती. अशा प्रकारे लोकांनी विविध मार्गानी पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत प्रवेश केला होता.
ज्याप्रकारे अनेकांचे बॉर्डर ओलांडून पलीकडे जाण्याचे प्रयत्न यशस्वी झाले तसे अनेकांचे अयशस्वी देखील झाले. १४० लोकांनी यात आपले प्राण गमावले होते. २५७ लोकांना पकडण्यात मृत्युदंड वा जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
१९८९ साली ऑगस्ट महिन्यात स्प्लित्झर फॅमिली हे शेवटचे पूर्व जर्मनीतले लोक होते ज्यांनी यशस्वीरित्या ही बॉर्डर ओलांडली होती. पुढे त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात या भिंतीला आणि कुंपणाला पाडण्यात आलं. नंतर १९९० साली जर्मन संघराज्याची स्थापना झाली. जर्मन संघराज्याच्या स्थापमुळे दुसऱ्या महायु*द्धानंतर जर्मनीला प्रत्यक्षात स्थैर्य प्राप्त झालं होतं.
आजही जर्मनीत बॉर्डर ओलांडण्याचे किस्से मोठ्या गमतीने सांगितले जातात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.