आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आतापर्यंत फक्त द*हश*तवादी ह*ल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेला पुलवामा जिल्हा सध्या देशभरात नवीन गोष्टींसाठी प्रसिद्ध होतो आहे. हा जिल्हा सध्या एक रोजगार केंद्र म्हणून आकारास येत असून दिवसेंदिवस या भागाचा देशाच्या इतर भागांशी असलेला व्यापार वाढत चालला आहे.
आज भारतातील कुठलाही लहान मुलगा शाळेत पेन्सिलचा वापर करायला सुरुवात करतो त्यावेळी त्याचे काश्मीर खोऱ्याशी एक अनोखे नाते प्रस्थापित होते, कारण तो वापरतो त्या पेन्सिलीचे उत्पादन याच काश्मीर खोऱ्यात करण्यात येते. पुलवामा जिल्हा हा देशभर ‘पेन्सिल डिस्ट्रिक्ट’ म्हणून ओळखला जातो.
आतं*कवादापासून पेन्सिलच्या व्यापारापर्यंत पुलवामाचा प्रवास आपण जाणून घेऊया..
दक्षिण काश्मीरमधील ऊखू या गावातून देशभरात करण्यात येणाऱ्या पेन्सिल उत्पादनासाठी ९० टक्के लाकूड उपलब्ध करून देण्यात येतो. पेन्सिल आणि स्लेटच्या उत्पादनामुळे पुलवामा जिल्हा पहिल्यांदा काहीशा सकारात्मक कारणामुळे देशाच्या नकाशावर उठून दिसत आहे. पुलवामा येथील फॅक्टरी मालक असलेल्या मंजूर अहमद यांनी न्यूज १८ला दिलेल्या माहितीत म्हटले होते की,
सुरुवातीच्या काळात पेन्सिल निर्माण करणाऱ्या कंपन्या जर्मनी आणि चीनमधून पेन्सिलसाठी लागणारे लाकूड आयात करत होत्या. आता ऊखू गावातील लाकडाने त्यांना उत्तम स्वदेशी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे ऊखूच्या लाकडाची मागणी वाढत असून इथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आहे.
या जिल्ह्यातील गावागावात पेन्सिल आणि स्लेटच्या निर्मितीचे स्वप्न आकार घेत असून सरकारदेखील या भागाला एक नवीन सकारात्मक ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. दिवसेंदिवस काश्मिरात नवीन पेन्सिलच्या उत्पादन वाढीची मागणी वाढत चालली आहे. या गावात पेन्सिलसाठी लागणारी लाकडे उपलब्ध झाल्याने या भागातून आता निर्यात देखील करण्यात येते आहे.
पॉप्लर वृक्षाच्या लाकडापासून एकदम चांगल्या दर्जाच्या पेन्सिलची निर्मिती करण्यात येते. दक्षिण काश्मीरच्या खोऱ्यात या लाकडाचे चांगले उत्पादन करण्यात येते. पुलवामा परिसरात आढळणारा हा वृक्ष चिनार वृक्षाचीच प्रजाती आहे. असंख्य लोक या वृक्षाचे लाकूड पेन्सिल इंडस्ट्रीला उपलब्ध करून देण्याचे काम करतात. पेन्सिल बनवायला जितके मॉइश्चर गरजेचे असते बरोबर तितकेच या लाकडामध्ये असते.
१९८४ साली काश्मीरच्या सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यात आला. लासिपोरा भागात ३०० हेक्टरवर हे क्षेत्र विकसित करण्यात आले. याच ठिकाणी पेन्सिलचे ६० टक्के उत्पादन करण्यात येते. २५० युनिट्स या सफरचंदाच्या बागांनी घेरलेल्या भागात पेन्सिल उत्पादनाचे काम करतात.
भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि अधिक खपाच्या पेन्सिलसाठी लागणारा कच्चा माल याचा भागातून पुरवण्यात येतो.
नटराज आणि अप्सरा पेन्सिलसाठी लागणाऱ्या लाकडाचे उत्पादन याच पुलवामा जिल्ह्यात करण्यात येते. हिंदुस्थान पेन्सिल या जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या पेन्सिल निर्मात्या कंपनीला येथूनच माल पुरवण्यात येतो.
काश्मीर खोऱ्यातील बहुतांश उद्योगांना महिला हातभार लावत आहेत. पेन्सिल आणि स्लेट उद्योगाशी संबंधित उद्योगांमध्ये २००० लोकांना नोकरीची संधी मिळाली आहे. ऊखू येथे तर महिला छोट्या छोट्या युनिटमध्ये व्यवस्थितपणे कारभार बघतात. आधी फक्त पेन्सिलसाठी लागणारे लाकूड निर्मात्यांना देण्यात येत होते पण आता त्याला पेन्सिलसाठी वापरा योग्य बनवून निर्मात्यांना सोपविले जात आहे.
सध्या पुलवामा आणि लासिपोरा येथे अनेक उद्योगांशी संलग्न असलेले लोक येथे सरकार इथे काहीतरी विकास करेल या आशेवर बसले आहेत. संपूर्ण भारताशी औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी येथे एका माहामार्गाच्या निर्मितीची आवश्यकता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा महामार्ग अपूर्ण आहे.
याठिकाणी वीजेचा तुटवडा आहे. इथे औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने चांगली कररचना निर्माण करण्याची गरज आहे. या भागातील मागास समाज मुख्यधारेत आणायचा असेल तर याठिकाणी पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास अत्यावश्यक आहे.
२००६ साली तत्कालीन सरकारने ज्यावेळी कोल्ड स्टोअर, टीएमटी, फोम, लेदर, फॅब्रिकेशन, दूध उत्पादन अशा विविध क्षेत्रांचा विकास करून इथल्या औद्योगिक विकासाला चालना दिली होती, त्यावेळी हा भाग औद्योगिकदृष्ट्या विकसित होण्यास सुरवात झाली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.