आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गेल्याच वर्षी महाराष्ट्र आणि केरळ मध्ये पडलेल्या तुफान पावसाने येथे काही काळ अक्षरश: हाहाकार माजवला होता. लोकांना स्वतःची राहती घरे सोडून छावण्यांचा आसरा घ्यावा लागला. कष्टाने उभारलेले संसार वाहून जाताना पाहण्याशिवाय गत्यंतर उरले नव्हते. हळूहळू पूरस्थिती ओसरली तसे हे उध्वस्त झालेले संसार सावरण्यासाठी अनेक हात पुढे आले.
काही ठिकाणी मदत योग्य ठिकाणी पोहोचली तर काही ठिकाणी दूरवरून आलेल्या या मदतीतही घोटाळे होतात. दुसऱ्याचा संसार सावरणारे दिसले तसे, मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारेही दिसले. सबंध समाज संकटात सापडल्यावर कळवळा येणारे बरेच जण असतात. अशावेळी मदत करायला पुढे येणारेही बरेच जण असतात. पण, सबंध आयुष्य आणि अख्खी कमाई फक्त दुसऱ्यांच्या संसाराला हातभार लागावा म्हणून खर्ची घालणारा अवलिया तुम्ही कधी पहिला आहे का?
आज अशाच एका अवलियाची गोष्ट आम्ही सांगणार आहोत ज्याने आपल्या आयुष्यातील सर्व कमाई गरिबांना दिली. युनोने देखील यांच्या कामाची दाखल घेत, त्यांना २० व्या शतकातील उत्कृष्ट व्यक्ती म्हणून पुरस्कार दिला आहे. या पुरस्कारापोटी मिळालेले ३० कोटी रुपयेही त्यांनी गरिबांनाच दान दिले.
कलियुगातील या महान दानशूर कर्णाचे नाव आहे, पालम कल्याणसुंदरम!
पालम कल्याणसुंदरम देहयष्टीने अगदी सडपातळ, चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरलेले आणि चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित! अगदी तुमचे-आमचे आजोबा शोभतील असेच. त्यांचे मंजुळ बोलणे आणि त्यातून जाणवणारा त्यांचा दृढनिश्चय पाहून तुम्हीही अवाक व्हाल.
कल्याणसुंदरम यांचा जन्म तामिळनाडूतील थिरुनेलावेल्ली जिल्ह्यातील मेलाकारीवेलामकुलाम येथे झाला. वयाच्या पहिल्या वर्षीच त्यांच्या शिरावरील वडिलांचे छत्र हरपले. त्यांच्या आईनेच त्यांचा सांभाळ केला. गरिबांची सेवा करण्याची वृत्ती त्यांच्या आईनेच त्यांच्यात रुजवली. शेतकरी कुटुंबातील असूनही गरिबांबद्दल कणव राखण्याची शिकवण त्याच्या आईनेच दिली. आईची ही शिकवणच पुढे त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनले.
मानवतेची सेवा करण्याचे त्यांचे हे व्रत वयाच्या ७३व्या वर्षापर्यंत आजही अखंड सुरु आहे. पालम यांनी ग्रंथालयशास्त्रातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यात सुवर्णपदक मिळवले. याव्यतिरिक्त त्यांनी साहित्य आणि इतिहास या विषयातील पदव्युत्तर पदव्या मिळवल्या आहेत. आयुष्यातील ३५ वर्षे त्यांनी श्रीवैकुंठ्म येथील कुमारकुरूपारा कला महाविद्यालयात, ग्रंथपालाची सेवा बजावली आहे.
त्यांना मिळणारा सर्व पगार ते अनाथ आणि ज्यांना शिक्षण घेणे परवडत नाही अशा मुलांसाठी दान करून टाकत. दोन वेळचे पोट भरण्यासाठी ते काही छोटी-मोठी कामे करत.लग्न केल्यास मिळणारा पगार सगळा घरखर्च चालवण्यातच जाईल, आणि इतरांना थोडीही रक्कम दान करता येणार नाही, या विचाराने ते आजन्म अविवाहित राहिले.
“मी ज्या ठिकाणी लहानाचा मोठा झालो ते एक छोटे खेडे होते. रस्ते, दिवे, पाणी शाळा इतकेच काय अगदी काडेपेटी जरी विकत घ्यायची म्हंटले तरी, छोटेसेही दुकान नव्हते. अशा खेड्यातून दूरपर्यंत शाळेला चालत जावे लागे. त्याकाळी गावातून १० किमी दूरवर असलेल्या शाळेत चालत जाणारा मी एकटाच विद्यार्थी होतो. मला वाटायचे माझ्यासोबत कुणी असेल तर, किती आनंद झाला असता. मिळून शाळेत जाता आले असते. गावातील मुलांना शाळेचा खर्च परवडत नसे. मी त्यांना शाळेत जाण्यासाठी उद्युक्त करू लागलो. यासाठी त्यांची शाळेची फी भरण्याचीही मी तयारी केली,” असे पालम सांगतात.
लहान वयातच त्यांना केवळ गरिबीमुळे शिक्षण न घेऊ शकणाऱ्या आपल्या मित्रांबद्दल किती तळमळ होती हे यातून दिसून येते. ते केवळ मुलांना शिक्षणाची प्रेरणा देऊन थांबले नाहीत तर, त्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भारही उचलला. शाळेत जायचे तर पुस्तके, वह्या, कपडेही हवेच. शाळेत जाण्यास तयार होणाऱ्या मुलांना त्यांनी अशीही मदत केली.
कल्याणसुंदरम म्हणतात, “मला पैशाचा मोह अजिबात नाही. पण, इतरांना काही रक्कम दान म्हणून देता यावी म्हणूनच मी कमवतो. आपल्या कमाईतील काही रक्कम इतरांच्या गरजा भागवण्यासाठी दान म्हणून देण्यात जो आनंद आहे, तो इतर कशातच नाही.”
कल्याणसुंदरम यांचा आवाज लहान मुलांसारखा आहे. त्यांच्यातील या दोषामुळे त्यांना आत्महत्या करू वाटे, इतके ते निराश झाले होते. पण, त्यांची ओळख स्व-विकासाचे धडे देणारे लेखक थामिझवानन यांच्या पुस्तकांशी झाली. त्यानंतरचे त्यांचे आयुष्यच बदलून गेले.
“तुम्ही कसे बोलता याची चिंता करू नका. इतरांनी तुमच्याबद्दल चांगले बोलले पाहिजे यासाठी धडपड करा.” या लेखकाचा हा संदेश त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवला. त्यानंतर त्यांनी स्वतःला कधीही, कमीपणाच्या न्युनगंडाच्या पिंजऱ्यात बंदिस्त करून घेतले नाही.
ग्रंथपालाची नोकरी करत असताना मिळणारा सगळा पगार ते दान करून टाकत. स्वतःचे दोन वेळचे पोट भरण्यासाठी ते हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करत. निवृत्तीनंतर मिळालेली १० लाख रुपयांची सगळी पेन्शन त्यांनी दान देऊन टाकली. आजही स्वतःचे पोट भरण्यासाठी ते वेटरची नोकरी करतात.
त्यांचे हे योगदान मात्र दुर्लक्षित राहिले नाही. याचा आनंदच आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या या कामाची दाखल घेतली गेली. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे युनोने त्यांना २० व्या शतकातील उत्कृष्ट व्यक्ती म्हणून गौरवले. अमेरिकन सरकारने त्यांना ‘मॅन ऑफ मिलेनियम’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. रोटरी क्लब ऑफ इंडिया कडूनही त्यांना लाईफ टाईम ऑफ सर्विस अॅवार्ड मिळाला आहे.
पालम या नावाने ते एक एनजीओ देखील चालवतात. त्यांची ही एनजीओ समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी काम करते. या वयातही ते दररोज एनजीओच्या कार्यालयात येतात. त्यांचे राहते घर अगदी छोटे असून, त्यांचे राहणीमानही फारच साधे आहे. तुम्हालाही गरीब, शोषत, वंचित घटकासाठी काही काम करण्याची इच्छा असल्यास पालम यांच्या एनजीओला दान करू शकता. या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी हा सर्व पैसा दान दिला जातो आणि त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.