आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
टायटॅनिक. हे नाव ऐकताच ती प्रसिद्ध धुन तुमच्या कानात वाजली असेल. डोळ्यांसमोर रोझ आणि जॅकची ती रोमॅन्टिक पोझही आली असेल. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये प्रवासी जहाज बुडताना झालेले मृत्यूही तुमच्या डोळ्यांसमोर तरळले असतील. पण टायटॅनिक हे नाव केवळ या घटनेपुरतंच मर्यादीत नाही. या नावाला दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासात मानाचं स्थान आहे. ‘ऑपरेशन टायटॅनिक’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मोहिमेतील मुठभर सैनिकांनी गनिमी काव्यानं शत्रु राष्ट्राला अक्षरश: मुर्ख बनवलं.
दुसऱ्या महायुद्धातील आजपर्यंतची सर्वात मोठी संयुक्त सागरी लष्करी मोहिम ‘डी डे’च्या यशाची कहाणी या मोहिमेच्या उल्लेखाशिवाय अधुरीच राहिल. १९४४ साली दुसऱ्या महायुद्धाने कळस गाठला होता. जर्मनीतील नाझींचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटेन या तत्कालीन मित्र राष्ट्रांना कोणत्याही परिस्थिती हे महायुद्ध थांबवायचं होतं. त्यासाठी या मित्र राष्ट्रांनी जर्मनीविरोधात आजपर्यंतची सर्वांत मोठी संयुक्त लष्करी मोहीम राबवली. त्या मोहिमेचं नावं होतं ‘डी डे’.
उत्तर फ्रान्स लगत असलेल्या जर्मनीच्या ताब्यातील ‘नॉरमँडी’ या सागरी भुभागावर संयुक्त लष्करी सैन्यानं घुसखोरी केली. मित्र राष्ट्रांच्या सैन्याची ही हालचाल जर्मनीच्या नजरेत येऊ नये, यासाठी आणखी एक मोहीम आखण्यात आली. हीच मोहीम इतिहासात ‘ऑपरेशन टायटॅनिक’ या नावानं प्रसिद्ध आहे. या दोन्ही मोहिमेनंतर काही दिवसातच जर्मन सैन्याला हार पत्करावी लागली.
ब्रिटिश सैन्याच्या स्पेशल एअर सर्विस युनिटमधील सैनिकांवर ऑपरेशन टायटॅनिकची धुरा सोपवण्यात आली होती. या सैनिकांनी जर्मन सैन्याला तब्बल ४० दिवस झुंजवत ठेवलं. मित्र राष्ट्रांच्या नॉरमँडीमध्ये होत असलेल्या हालचालींवरुन जर्मन सैन्याचं लक्षं हटवणं हे या सैनिकांचं मुख्य काम होतं. यासाठी या सैनिकांनी भन्नाट युक्त्या लढवल्या. शत्रु राष्ट्रांचे सैनिक पॅरोशुटद्वारे जर्मनीत घुसखोरी करत असल्याचा बनाव या सैनिकांनी रचला. याद्वारे हजारो सैनिक घुसखोरी करत असल्याची जर्मनीची समजुत व्हावी, यासाठी मानवी रुपातील शेकडो पुतळे पॅराशुटला बांधून सोडण्यात आले.
‘रुपर्ट्स’ असं या डमी पॅराशुटला नाव देण्यात आलं होतं. हे रुपटर्स ३ मीटर उंचीचे होते. खरेखुरे सैनिक भासावे, यासाठी या रुपटर्सला सैनिक वेश परिधान केला गेला. या डमी पॅरोशुटर्समधून बंदुकीचा आवाज येत असल्यानं मोठं आक्रमण झाल्याचा भास जर्मनीला झाला होता. एवढंच नाही तर या रुपटर्सच्या आत स्फोटकं देखील पेरण्यात आली होती. त्यामुळे जमिनीवर पोहोचताच या रुपटर्सचा स्फोट होत होता. या हल्ल्यानंतर नॉरमँडी भागातील जर्मन सैन्य या डमी पॅराशुटर्सच्या मागावर तैनात करण्यात आलं. या डमी पॅराट्रुपर्समुळे नॉरमँडी भागात घुसघोरी करत असलेल्या मित्र राष्ट्रांच्या सैन्याची हानी टळली.
हे युद्ध संपल्यानंतर या रुपटर्सची बोली देखील लावण्यात आली होती. १९६२ साली प्रदर्शित हॉलिवुड सिनेमा ‘द लोन्गेस्ट डे’मध्ये डमी रुपटर्सवर एक सीन आहे. डमी पॅराशुटर्स ही संकल्पना ब्रिटिश सैन्यानंच पहिल्यांदा वापरली असं नाही. १९४० साली नेदरलँड विरुद्ध झालेल्या युद्धात जर्मन सैन्यानं डमी पॅरोट्रुपर्स डच सैन्याला मूर्ख बनवण्यासाठी सोडले होते. ऑपरेशन टायटॅनिकमध्ये जर्मन सैन्याचीच युक्ती त्यांच्यावर उलटली होती.
कुठलंही युद्ध असो ते शक्तीबरोबरच युक्तीनंही लढलं जातं. भारताच्या युद्ध इतिहासात शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा युद्धतंत्राला फार महत्व आहे. गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचं महत्वाचं हत्यार होतं. मुठभर मावळ्यांच्या संगतीनं याच युद्धतंत्राच्या साहाय्याने महाराजांनी अनेक लढाया, मोहिमा जिंकल्या. मोगल, आदिशाहीचे अनेक सरदार लाखोंच्या सैन्यानिशी स्वराज्यात घुसले. अफजलखानाचा वध असो किंवा लाल महालातून शाहिस्तेखानाला त्याची बोटं छाटून पळवून लावण्यात महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचाच वापर केला.
१९१४ ते १९१८ दरम्यान झालेल्या पहिल्या महायुद्धामुळे युरोपात निर्माण झालेल्या अस्थिरतेचं रुपांतर दोन दशकांनंतर दुसऱ्या महायुद्धात झालं. १९३९ ते १९४५ दरम्यान दुसरं महायुद्ध झालं. जर्मनीनं पोलंडवर केलेल्या हल्ल्यानंतर हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ साली अधिकृतरित्या सुरु झालं. ब्रिटन, फ्रांस, अमेरिका, रशिया या मित्र राष्ट्रांनी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलं. जर्मनीच्या बाजूनं जपान आणि इटली हे देश लढले. सुरवातीला अमेरिका या महायुद्धापासून दूर होता. मात्र, अमेरिकेच्या ‘पर्ल हार्बर’ या बेटावर जपानने केलेल्या हल्ल्यानंतर सर्व ताकदीनिशी अमेरिका या महायुद्धात उतरला. या महायुद्धात जवळजवळ ६ कोटींवर माणसं मारली गेली. ही आजपर्यतच्या मानवी इतिहासातील सर्वात मोठी जीवितहानी होती. युरोप आणि आशियातील अनेक देश या युद्धात बेचिराख झाले.
जर्मनीचा हुकुमशाह ॲडॉल्फ हिटरलरच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे हा मृत्यूतांडव घडला. या महायुद्धात लाखो जर्मन देखील मारले गेले. हिटलरचा ज्यू द्वेष तर जगजाहीरच होता. हिटरलने ६० लाख ज्यूंना गॅस चॅबरमध्ये कोंडून मारले. ही कत्तल करताना लहान मुलं, महिला, वृद्ध कोणाचीच गय केली गेली नव्हती. हा नरसंहार इतिहासात ‘हॉलोकास्ट’ म्हणून कुप्रसिद्ध आहे.
तब्बल ६ वर्ष चाललेल्या या युद्धाची समाप्ती अखेर जपानच्या शरणागतीनं २ सप्टेंबर १९४५ मध्ये झाली. या महायुद्धात पहिल्यांदाच अणुशक्तीमुळे होणार विध्वंसही जगानं पाहिला. पर्ल हॉर्बर बेटावरील हल्ल्यानंतर चिडलेल्या अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमावर ६ ऑगस्ट १९४५ ला तर नागासाकी या शहरावर ९ ऑगस्ट १९४५ साली अणुबॉम्ब टाकला. यात एका क्षणात हजारो लोक मृत्यूमुखी पडले. नागासाकीच्या समुद्रकिनाऱ्यावरील जहाजांसह बंदरांना आग लागली. या हल्ल्यात हिरोशीमात १ लाख ४० हजार तर नागासाकीत सुमारे ७४ हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
विस्तारवाद, जगावर राज्य करण्याच्या इर्षेपायी जगात आजवर अनेक युद्ध झाली. किंबहुना महत्वाकांक्षी राजकारण्यांनी ती जगावर लादली. यात कोट्यावधी लोक मरण पावले, अनेक कुटुंब उद्धवस्त झाली, गरिब देश नेस्तनाबूत झालीत, तर श्रीमंत देशांची अर्थव्यवस्था रसातळाला गेली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.