आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांचा भारतावरील वरचष्मा तर संपला. भारताचे दोन तुकडे झाले. पाकिस्तानची निर्मिती झाली. भारतातील विविध संस्थानांचे विलीनीकरण करून भारताची निर्मिती करणे हे त्यावेळी एक आव्हानच होते. स्वतंत्र भारताची उभारणी करताना अशा कित्येक आघाड्यांवर तोंड द्यावे लागत होते.
१९४७ साली कश्मीर संस्थान राजा हरी सिंह यांच्या ताब्यात होते. राजा हरी सिंह यांना कश्मीर भारतात किंवा पाकिस्तानात विलीन करण्याची इच्छा नव्हती. कश्मीरमध्ये मुस्लीम बहुसंख्य असल्याने हे राज्य पाकिस्तानात विलीन व्हावे अशी पाकिस्तानची इच्छा होती. राजा हरी सिंह यांना आपले राज्य स्वतंत्र ठेवायचे होते. पाकिस्तानला मात्र येनकेन प्रकारे कश्मीर आपल्या ताब्यात घ्यायचाच होता. भारत स्वतंत्र झाल्यापासून आता आता पर्यंत कश्मीर हे नेहमीच एक विवादास्पद राज्य होते. भारताच्या फाळणीनंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे कश्मीरमधील शांतता भंग पावण्यास सुरुवात झाली.
पाकिस्तानला कश्मीर हवे होते त्यासाठी तिथल्या राज्यकर्त्यांनी सतत राजा हरी सिंह यांच्या मागे काश्मीरला पाकिस्तानात विलीन करण्याच्या विनंत्या देखील केल्या. मात्र राजा हरी सिंह यांना आपले राज्य पाकिस्तानच्या हवाली करण्याची बिलकुल इच्छा नव्हती. परंतु आपण कश्मीर पाकिस्तानमध्ये विलीन करण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी कधीच उघडपणे आणि ठणकावून सांगितले नाही. त्यामुळे त्यांचे हे सूचक मौन म्हणजे होकारच आहे असे पकिस्तानने गृहीत धरले. राजा हरी सिंहवरील पाकिस्तानचा दबाव वाढू लागला. काही दिवसानंतर तर पाकिस्तानची दादागिरी वाढतच गेली. राजा हरी सिंह आपल्या दबावांना भिक घालत नाहीत, याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी कश्मीरवर हल्ला करून कश्मीर बळकावण्याचे ठरवले.
त्यावेळी कश्मीरमध्ये बहुसंख्य लोकसंख्या ही मुस्लीम होती. शिवाय श्रीनगर आणि पाकिस्तानदरम्यान रस्ता निर्माण केल्यास वाहतुकीचा सुलभ मार्ग बांधला जाऊ शकतो. झेलम घाटातून पाकिस्तानच्या इतर शहरांशीही या राज्यामुळे संपर्क राखणे सहज शक्य होते. म्हणूनच हे राज्य पाकिस्तानला त्यांच्या ताब्यात हवे होते.
राजा हरी सिंह ऐकणार नाहीत हे लक्षात आल्यावर पाकिस्तानने कश्मीरवर ह*ल्ला करण्याची योजना आखली. याला त्यांनी ‘ऑपरेशन गुलमर्ग’ असे नाव दिले होते. बंदु*कीच्या ताकदीवर कश्मीर पाकिस्तानात विलीन करून घेणे हेच या ऑपरेशनचे ध्येय होते.
इतर कोणत्याच मार्गाने कश्मीर आपल्या ताब्यात येऊ शकत नाही. हे लक्षात आल्यावर त्यांच्याजवळ दह*शत निर्माण करणे एवढा एकच मार्ग उरला होता. या ऑपरेशनसाठी पाकिस्तानने जय्यत तयारी केली होती. परंतु तरीही कश्मीर बळकावणे पाकिस्तानला शक्य झाले नाही. कश्मीर प्रश्नी भारताने हस्तक्षेप केल्याने पाकिस्तानला तिथून अंशतः का होईना पण पळ काढावा लागला होता. ऑपरेशन गुलमर्गने पाकिस्तानला असा उलटा धडा शिकवला होता जो पाकिस्तान अजूनही विसरला नसेल.
ऑपरेशन गुलमर्गसाठी पाकिस्तानने त्याच्या सीमावर्ती प्रांतातीलच आफ्रिदी लोकांचा, ज्यांना कबालीवाले म्हटले जाते अशांचा जमाव जमवून त्यांना ह*ल्ला करण्यासाठी भडकावले. यासाठी पाकिस्तानी सरकारने त्यांना राय*फल्स, मशीन*गनसारखी मोठमोठी शस्त्रे पुरवली. या ह*ल्लेखोर जमातीचे नेतृत्व मेजर जनरल अकबर खानकडे देण्यात आले. मेजर जनरल खान बरोबर ब्रिगेडियर शेर खानसुद्धा होता. अकबर खानला मदत लागेल तेंव्हा शेर खान त्याला मदत करणार असे ठरवले गेले.
शेवटी २२ ऑक्टोबरचा तो दिवस उजाडला जेव्हा पाकिस्तानने ५ हजार ह*ल्लेखोर शस्त्रानिशी कश्मीरमध्ये घुसवले. कश्मीर हडपणे एवढे एकच लक्ष्य त्यांना देण्यात आले होते. त्यांनी कश्मीरमध्ये घुसताच प्रचंड नासधूस करण्यास सुरुवात केली. सर्वत्र हिं*साचार उसळला. कश्मीरच्या मुझफ्फराबाद, डोमेल आणि उरी या शहरांवर त्यांनी नियंत्रण मिळवले. हल्लेखोरांच्या या जमावाने सगळीकडे दह*शत माजवली होती.
बारामुल्लामध्ये तर त्यांनी प्रचंड हिंसाचार केला. मेजर खुर्शीद अन्वर बारामुल्लामधील हिंदू आणि शीखांच्या ह*त्या, बला*त्कार आणि लुटमारीचे निरीक्षण करण्यासाठी नेमण्यात आला होता. शेकडो हिंदू, शीख आणि मुस्लिम महिलांवर देखील बला*त्कार करण्यात आले, अनेकांचे अपहरण करून रावळपिंडी, पेशावर आणि पाकिस्तानच्या इतर शहरांमध्ये नेण्यात आले. पुढील अनेक दिवस संपूर्ण बारामुल्ला जिल्ह्यात हिंदू आणि शीखांची लूट आणि हत्या*कांड सुरूच होते.
हे ह*ल्लेखोर संख्येने जास्त होते, त्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या बनवण्यात आल्या आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या दिशेने कूच करण्यास सांगितले. यातील काही तुकड्या गुलमर्गच्या दिशेला गेल्या तर काही हंडवाडा, सोपोर आणि बंदीपूर या दिशेला गेल्या.
राजौरी, पुंछ आणि पुढे जम्मू-कश्मीरवर कब्जा करण्यासाठीही दहा-दहा ह*ल्लेखोरांच्या तुकड्या बनवण्यात आल्या.
अचानक झालेल्या हा ह*ल्ल्याने कश्मीर हडबडून गेला. राजा हरी सिंहांना एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यात शिरलेले घुसखोर आवरणे शक्य झाले नाही. ब्रिगेडियर राजिंदर सिंग यांना कश्मीरचे तारणहार मानले जाते. २४-२५ ऑक्टोबरला त्यांनी हल्ला सुरु केला, पण कश्मीरच्या सैन्यातले अनेक मुस्लिम सैनिक पाकिस्तानी हल्लेखोरांना जाऊन मिळाले. पण हिंमत न हारता त्यांनी उरीचा एक पूल उद्धवस्त केला. यामुळे पाकिस्तानी सैन्याला कश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दाखल व्हायला उशीर लागला. याचाच फायदा भारतीय सैन्याला झाला, जेणेकरून विमानतळ तरी सुरक्षित राहिले.
२४ ऑक्टोबर १९४७ रोजी राजा हरी सिंग यांनी भारताच्या गव्हर्नरला एक इमर्जन्सी टेलिग्राम पाठवला आणि या हल्लेखोरांपासून कश्मीरचे रक्षण करण्यासाठी सेना पाठवण्याची विनंती केली. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटनने एक अट ठेवली, कश्मीरला भारत संरक्षण देईल पण एकाच अटीवर, ते म्हणजे कश्मीर भारतात विलीन होणार. राजा हरिसिंग यांनी होकार कळवला, पण निर्णय घ्यायला लॉर्ड माउंटबॅटनने उशीर केला आणि २५ ऑक्टोबरच्या रात्री इन्स्ट्रुमेंट ऑफ अक्सेशनवर सही केली. त्यामुळे विलीनीकरणाची तारीख झाली २६ ऑक्टोबर. २६ ऑक्टोबर १९४७ रोजी राजा हरी सिंह आणि भारत सरकार यांच्यात काश्मीरच्या विलीनीकरणाचा करार पार पडला.
यानंतर लगेचच भारतीय सैन्य कश्मीरमध्ये पाठवण्याची तयारी सुरु झाली. त्याकाळी भारताच्या दिशेने कश्मीरमध्ये जायचे झाल्यास विमानांचाच वापर करावा लागत असे. कारण तेव्हा आज अस्तित्वात असलेला मुघल हायवे नव्हता. त्यामुळे दिल्ली विमानतळावरून ६ डकोटा विमानांतून भारतीय सैन्य रवाना झाले आणि त्यांनी २७ ऑक्टोबरच्या सकाळी श्रीनगर विमानतळावर लँड केले. आजही तुम्ही कधी कश्मीरला विमानाने गेलात तर विमानतळावर बाहेर पडल्यावर तुम्हाला सर्वांत आधी दिसते ते, मेजर सोमनाथ शर्मा यांचे स्मारक. मेजर सोमनाथ शर्मा, प्रथम मरणोत्तर परमवीर चक्र विजेते.
भारतीय भूदलाने आणि वायूसेनेने या हल्लेखोरांना हुसकावून लावण्यात यश मिळवले. भारताच्या शीख बटालियनला श्रीनगरच्या हवाई क्षेत्रावर ताबा घेण्यास सांगितले गेले तर १३ फिल्ड रेजिमेंटमधील सैन्याच्या एका तुकडीला श्रीनगरकडे रवाना केले गेले.
पठाणकोट आणि जम्मू यांच्यातील मार्ग सुरक्षित करण्यासाठी सैन्याची एक तुकडी इथेही तैनात करण्यात आली. पाकिस्तानचे ह*ल्लेखोर छोट्याछोट्या तुकडीत विभागले होते. गोरिला नीती वापरून ते भारतीय सैन्याला पराभूत करण्याचे स्वप्ने पाहत होते. परंतु भारतीय सैन्याने त्यांना असे काही उत्तर दिले की त्यांचे हे मनसुबे हवेतच विरून गेले. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या या ह*ल्लेखोरांना पळवून लावले. त्यांची संख्या जास्त असली तरी भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे त्यांचा टिकाव लागू शकला नाही. २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत भारतीय सैन्याने श्रीनगरवर कब्जा मिळवला.
त्यानंतर २६ जून रोजी भारतीय सैन्याने ऑफेन्सिव्ह ऑपरेशन इरेज सुरु केले. या ऑपरेशनअंतर्गत भारतीय सैन्याने त्या ह*ल्लेखोरांनी बळकावलेली एकेक जमीन पुन्हा हस्तगत करण्यास सुरुवात केली आणि ८,४२,५८३ वर्गकिमी. क्षेत्रफळावर पुन्हा कब्जा मिळवला.
नेहरू युनायटेड नेशन्समध्ये गेले तेथे यु*द्धबंदीचा आदेश देण्यात आला. जे सैन्य जेथे होते तेथे थांबवले गेले. भारतीय सैन्य ज्या सीमारेषेवर होते त्यालाच सिजफायर लाईन असे नाव देण्यात आले. कारण येथून पुढे गोळी*बार होणार नव्हता. पुढे १९७१ साली झालेल्या करारात याच सीमारेषेचे नाव लाईन ऑफ कंट्रोल ठेवण्यात आले.
पाकिस्तानचे ऑपरेशन गुलमर्ग यशस्वी झाले असते तर आज कश्मीर पाकिस्तानचाच भाग असता. परंतु भारतीय सैन्याने हे घडण्यापासून रोखले. पाकिस्तानने मात्र याबाबतीत अजूनही हार मानलेली नाही. १९४७ पासून सुरु झालेला हा संघर्ष दिवसेंदिवस चिघळत होता. कश्मीर सीमेवर अनेकदा यु*द्धबंदी घोषित केलेली असतानाही पाकिस्तानकडून वारंवार ही यु*द्धबंदी तोडत असत. पण आजमितीस पाकिस्तान द*हश*तवादाच्या माध्यमातून कश्मीर हस्तगत करण्याच्या प्रयत्नात आहे.
भारतीय सैन्यानेही पाकिस्तानच्या या मनसुब्यांना अनेकदा धुळीस मिळवले आहे. भारतीय सैन्याने वारंवार पाकिस्तानी सैन्याला जशास तसे उत्तर दिले आहे. भारतीय सैन्याच्या शौर्यामुळेच आजपर्यंत कश्मीर सुरक्षित आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.