आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारतात १९६९ साली झालेली राष्ट्रपती निवडणूक एका वेगळ्याच कारणामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली होती. आजही राजकीय क्षेत्रात या निवडणुकीची चर्चा होत असते. कॉंग्रेस सिंडीकेटच्या वतीने नीलम संजीव रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी इंदिरा गांधी आणि कॉंग्रेस सिंडीकेट यांच्यातील संबंध बिघडत चालले होते. पक्षावर इंदिरा गांधी ज्याप्रमाणे आपली हुकुमत गाजवत होत्या आणि पक्षाच्या या सिंडीकेट सदस्यांना विश्वासात न घेता त्यांनी एकतर्फी निर्णय घेण्याचा जो सपाटा चालवला होता त्यामुळे कॉंग्रेस सिंडीकेटचे सदस्य इंदिरा गांधींवर नाराज होते.
सिंडीकेटने नीलम संजीव रेड्डी यांना आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. पण, इंदिरा गांधींना हे अजिबात आवडले नव्हते. त्यांनी यावेळी स्वतःचा उमेदवार उभा केला आणि त्याला निवडून देखील आणले. नीलम संजीव रेड्डी हे खरे तर पक्षाचे एक ज्येष्ठ सदस्य होते, नेहरूंच्या निकटवर्ती वर्तुळातही त्यांचा समावेश होता. परंतु या राष्ट्रपती निवडणुकीत आलेले अपयश त्यांना अधिक तीव्रतेने झोंबले कारण, स्वतः इंदिरा गांधींनी त्यांच्याविरोधात काम केले होते. या अपयशानंतर त्यांनी राजकीय संन्यास जाहीर केला आणि ते आपल्या आंध्रप्रदेशातील मूळ गावी परतले.
राजकीय जीवनापासून दूर राहून त्यांनी आपल्या शेतीवाडीत लक्ष घालणे जास्त सोयीस्कर समजले. याचवेळी पक्षात कॉंग्रेस (ओ) आणि कॉंग्रेस (आय) अशी फुट पडली.
१९६७ साली त्यांना लोकसभेच्या अध्यक्षपदी बसवण्यात आले होते मात्र, या पराभवामुळे राजकारणातून त्यांचे मनच उडाले. त्यांनी राजकीय संन्यास जाहीर केला असला तरी, नियतीच्या मनात मात्र त्यांच्याविषयी काही वेगळेच होते. पाच वर्षानंतर त्यांच्याही ध्यानीमनी नसताना ते पुन्हा राजकीय जीवनात सक्रीय झाले आणि यावेळी राष्ट्रपती पदावर विराजमानही झाले.
यावेळी त्यांची राष्ट्रपती पदासाठीची निवड बिनविरोध झाली होती. राष्ट्रपतीपदावर बिनविरोध निवडून येणारे ते भारतातील पहिलेच राष्ट्रपती ठरले.
नीलम संजीव रेड्डी हे भारताचे सहावे राष्ट्रपती होते. एकदा राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर ते पुन्हा राजकारणात कसे सक्रीय झाले आणि राष्ट्रपतीपदासाठी सर्वानुमते त्यांच्या नावावर कसा शिक्कामोर्तब करण्यात आला याविषयी त्यांनी आपल्या आत्मकथेत लिहिले आहे.
‘विदाऊट फियर ऑर फेवर’ या आपल्या आत्मकथेत ते लिहितात, “१९७५ साली आणीबाणी लागू करण्यात आली होती. हैद्राबादमध्ये जेपींनी एक सभा बोलावली होती. योगायोगाने मी देखील तेंव्हा हैद्राबादमध्येच होतो. जेपींचे भाषण ऐकण्यासाठी म्हणून मीही श्रोत्यांच्यात जाऊन बसलो. सामान्य लोकांसोबत बसून मी कार्यक्रम ऐकत होतो. इतक्यात जेपींसोबत बसलेल्या एका व्यक्तीने मला ओळखले आणि मी या कार्यक्रमासाठी हजर असल्याचे त्याने जेपींच्या लक्षात आणून दिले. मग जेपींनी माझी इच्छा नसतानाही आग्रहाने मंचावर बोलावले.”
मग नीलम रेड्डी यांनी जेपींसोबत सर्वानाजिक मंचावरून भाषणे देण्यास सुरुवात केली. आणीबाणी रद्द केल्यानंतर १९७७ मध्ये झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. यावेळी जनता दलाचे सरकार केंद्रात स्थानापन्न झाले. आता राष्ट्रपतींची निवड करण्याची संधी जनता दलाकडे होती. याचवेळी नीलम रेड्डी हे पहिल्यांदा बिनविरोध राष्ट्रपती म्हणून निवडून आले. पण, ही गोष्ट तितकीशी सोपी नव्हती. जनता दलातच त्यांच्या नावावर सहमती नोंदवताना अनेकांनी का-कू केली. अनेकांना त्यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी योग्य वाटत नव्हते. परंतु खुद्द जेपींनीच त्यांच्या नावाची शिफारस केल्याने कोणालाच त्याला थेट विरोध करून डावलणे शक्य नव्हते.
जेपींमुळेच मोरारजी देसाई पंतप्रधान पदावर बसू शकले होते. हे खरे असले तरी मोरारजी देसाई आणि जेपी यांच्यातही काही कारणावरून बिनसत होते.
नीलम रेड्डी हे जेपींच्या अगदी जवळचे होते. म्हणून मोरारजी त्यांच्या नावाला सहमती देण्यासाठी नाखूष होते. पण, मोरारजी सरकारला बाहेरून पाठींबा देणाऱ्या पक्षांची मात्र नीलम रेड्डी यांच्या नावाला सहमती होती. म्हणून मोराराजींचाही नाईलाज झाला.
नीलम रेड्डी एक असे राष्ट्रपती होते ज्यांनी आपल्या वेतनातील ७०% वाटा सरकारी तिजोरीत जमा केला. इतर राष्ट्रपतींप्रमाणे त्यांनी नोकरांचा लवाजमाही नाकारला. भल्या मोठ्या राष्ट्रपती भवनातील फक्त एकच खोली ते वापरत असत. अत्यंत साधे राहणीमान हेच त्यांचे खास वैशिष्ट्य होते. सामान्यातील सामान्य माणसालाही त्यांना थेट भेटता आले पाहिजे असे त्यांचे मत होते.
आंध्रप्रदेशच्या अनंतपुर जिल्ह्यातील इल्लूर या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब एक समृद्ध जमीनदार कुटुंब होते. घरी भरपूर मोठी शेती होती. गावात त्यांच्या वडिलांचा सन्मान केला जात असे. परंतु नीलम रेड्डी यांना मात्र घरी असलेल्या समृद्धीचा थोडाही हव्यास नव्हता. तरुणपणी ते स्वातंत्र्य लढ्यात उतरले. महात्मा गांधींच्या विचारांनी त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पाडला होता. स्वातंत्र्यानंतर ते नेहरूंचेही विश्वासू सहकारी बनले.
१९६२ साली आंध्रप्रदेशची निर्मिती झाली तेंव्हा ते आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनीच त्यांना आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. त्यांनतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री देखील होते. इंदिरा गांधीं सरकारमध्येही ते कॅबिनेट मंत्री होते. तेंव्हा कॉंग्रेसमध्ये सिंडीकेटचे पारडे थोडे जड होते.
१९७७ साली राष्ट्रपती पदावर निवडून आल्यानंतर १९८२ पर्यंत ते या पदावर राहिले. त्यांच्या या कारकिर्दी दरम्यान त्यांनी तीन सरकार बदलताना बघितले. पहिले मोरारजी देसाई, त्यानंतर चरण सिंह आणि पुन्हा सत्तेत आलेल्या इंदिरा गांधीं सरकार.
जनतेच्या भल्यासाठी कामे करण्यात या तिन्ही सरकारांना सपशेल अपयश आल्याचे ते नेहमी म्हणत. राष्ट्रपती पदावरून निवृत्त होताना केलेल्या भाषणातही त्यांनी या तिन्ही सरकारांवर टीका केली.
राष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यावर ते पुन्हा आपल्या गावाच्या सध्या वातावरणात रमून गेले. लहानपणापासून घरी श्रीमंती आणि ऐश्वर्य पाहिलेल्या नीलम रेड्डी यांनी त्यांची ६० एकर जमीन सरकारकडे सुपूर्द केली.
१ जून १९९६ रोजी न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाला.
साधे राहणीमान असलेले, फक्त गरजेपुरतेच मानधन स्वीकारून उर्वरित रक्कम सरकारी खजिन्यात दान करणारे एक साधेसुधे राष्ट्रपती म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.