आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात अनेक जागतिक बदल झाले. वैज्ञानिक प्रगतीबरोबरच जगामध्ये भू-राजकीय बदल घडून येत होते. या बदलांमुळेच पुढच्या सुमारे दोनशे वर्षांचं भविष्य निश्चित होणार होतं. भारतीय उपखंडातही राजकीय अस्थिरता शिगेला पोहोचली होती. भारताच्या विविध समुद्र किनाऱ्यांवर युरोपीय लोकांच्या वसाहती होत्या.
पुद्दुचेरी किंवा पॉंडिचेरीमध्ये फ्रेंचांची वसाहत होती, तर दिव-दमण आणि गोव्यामध्ये पोर्तुगीजांचे राज्य होते. कोचीन, वेंगुर्ला अशा ठिकाणी डचांनी आपले पाय रोवले होते. ऑस्ट्रियामधील व्यापाऱ्यांनी निकोबार बेटे वर्चस्वाखाली आणली होती. या वसाहतींचा वापर फक्त व्यापारासाठीच न होता, अन्य गोष्टींसाठीही होत असे. वॉटरलूच्या विजयानंतर ब्रिटिशांनी नेपोलियनला भारतातील मद्रासमध्ये ठेवण्याचा विचार केला होता.
वॉटरलूच्या लढाईच्या शेवटाबरोबरच फ्रान्सचा सम्राट या नात्याने नेपोलियनचाही शेवट होत होता. नेपोलियनला ‘एक्झाइल’ किंवा निर्वासनासाठी कुठे पाठवायचे हा वाद विजयी पक्षामध्ये सुरु होता. याआधी नेपोलियनला ‘एल्बा बेटा’वर निर्वासनासाठी पाठवण्यात आले होते, पण तेव्हा तो निसटून फ्रान्सला परतला होता. यावेळी विजयी लोकांकडे अनेक पर्याय होते आणि एकाच पर्यायाने जोर धरला ते म्हणजे “मद्रास”.
मद्रास
मद्रास किंवा सध्याचे चेन्नई ही भारतातील सर्वांत जुनी ब्रिटिश वसाहत. भारतात व्यापार करण्यासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने ‘मसुल्लीपट्टणम’ येथे तात्पुरती ‘व्यापारी पोस्ट’ उभारली. वारंवार कोसळणारा पाऊस, अयोग्य हवामान आणि इतर युरोपियन प्रतिस्पर्ध्यांचा खूप जवळचा सहवास यामुळे ईस्ट इंडिया कंपनीने स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.
शेवटी रिअल इस्टेटच्या शोधात, बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर जमिनीचा एक तुकडा भाडेतत्त्वावर ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला. थेम्स नदीने वेढलेल्या लंडनप्रमाणेच हे स्थान दोन नद्यांच्या मुखादरम्यान होते. ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारी पोस्टच्या संरक्षणासाठी किल्ला बांधण्याच्या परवानगीसह स्थानिक शासकाकडून मद्रासमधील काही जागा भाड्याने घेतली होती.
अर्थर वेलस्लीचा उदय
कालांतराने ईस्ट इंडिया कम्पनी दक्षिण भारतात कर संकलक बनली. या प्रदेशातील प्रतिष्ठित लोक आणि विशेषत: म्हैसूरचा राजा टिपू सुलतान यांच्यातील संघर्ष टोकाला गेला होता. टिपू सुलतानविरुद्ध लढल्या जाणाऱ्या कर्नाटक यु*द्धात सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने आर्थर वेलस्लीली साद घातली होती.
वेलस्लीचा जन्म डब्लिनमध्ये झाला होता आणि त्याच्या विजयी कारकिर्दीत तो जनरल बनला. वेलस्लीने श्रीरंगपट्टणम शहराला वेढा घातला, या वेढ्यात टिपू सुलतान अडकला होता. टिपू सुलतान वापरत असलेल्या रॉकेट्सने वेलस्लीच्या सैन्यात दह*शत माजवली होती. तरीही, टिपू सुलतानच्या दारूगोळ्याच्या डेपोमध्ये आग लागल्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या बाजूने यु*द्धाचा निकाल लागला. वेलस्लीने टिपू सुलतानच्या रॉकेटचे नमुने ब्रिटनला तपासणीसाठी पाठवले.
युरोपमध्ये, नेपोलियनमुळे पुन्हा यु*द्धाचे ढग एकवटून आले होते. नेपोलियनने एल्बा बेटावरून आपले निर्वासन सोडले आणि फ्रेंच सिंहासन परत घेतले होते. त्यामुळे वॉटरलूमधील निर्णायक लढाई युरोपच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब करणार होती. ब्रिटनने अर्थर वेलस्लीला या निर्णायक यु*द्धात योगदान देण्याचे आवाहन केले.
वेलस्लीला भारतातील त्याच्या कामगिरीबद्दल ‘ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ ही पदवी मिळाली होती. टिपू सुलतानकडून त्याने शिकून घेतलेल्या रॉकेट फायरिंगच्या कौशल्यामुळे त्याला नेपोलियनच्या सैन्यावर प्रतिहल्ला करण्यास मदत झाली आणि वॉटरलूच्या लढाईत ब्रिटनचा विजय शक्य झाला.
मद्रासमध्ये निर्वासनाचा प्रस्ताव
नेपोलियनला कुठे हद्दपार करायचे हे ठरवण्यासाठी ब्रिटन आणि विजयाच्या बाजूचे इतर लोक ठरवत होते. त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यातील दूरवरची जागा हवी होती. चर्चेतून एका विचित्र शहराचे नाव समोर आले ते म्हणजे “मद्रास”.
वेलेस्ली काही काळ मद्रासचा गव्हर्नर होता आणि त्याला या शहराची चांगली माहिती होती. त्याने नेपोलियनला मद्रासमधील ‘सेंट जॉर्ज फोर्ट’मध्ये बंदिस्त करण्याचा प्रस्ताव ठेवला. वेलस्लीने किल्ल्याची तटबंदी भक्कम केली होती आणि संपूर्ण भारत ब्रिटीशांच्या ताब्यात असल्याने नेपोलियन पळून जाऊ शकत नाही असा युक्तिवाद त्याने केला.
पण चर्चेत सहभागी असलेल्या अनेकांच्या मते “पॉन्डिचेरी” ही फ्रेंच वसाहत मद्रासच्या अगदी जवळ होती. नेपोलियनची सुटका करण्यासाठी फ्रेंच सैन्याने मद्रासवर स्वारी केली तर ईस्ट इंडिया कंपनीला परिस्थिती हाताळणे अवघड होऊन बसेल. तसेच, नेपोलियनने टिपू सुलतान आणि ब्रिटनच्या विरोधात असलेल्या इतर स्थानिक राज्यकर्त्यांना यापूर्वी पाठिंबा दिला होता, त्यामुळे नेपोलियनला भारतात हद्दपार करणे सुरक्षित नाही असा निर्णय झाला.
शेवटी, नेपोलियनला कैदी म्हणून ‘सेंट हेलेना’ या बेटावर ठेवण्यात आले. अटलांटिकच्या मध्यभागी एक दुर्गम बेट आहे. नेपोलियनने येथेच आपले शेवटचे दिवस व्यतीत केले आणि ५ मे १८२१ रोजी वयाच्या ५१व्या वर्षी त्याचे याच ठिकाणी निधन झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.