आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
चंगेझ खानने स्थापन केलेल्या मंगोल साम्राज्य इतिहासातील काही बड्या साम्राज्यांपैकी एक होते. आशिया आणि युरोपमध्ये झालेल्या अनेक युद्धात मंगोल राजांनी आपला पराक्रम दाखवला होता. मंगोलांचे नाव जरी काढले तरी त्याकाळातील अनेक राजांना धडकी भरत असे. मंगोल राजांना आणि सैनिकांनाही आपली हार कधीच मान्य होत नसे.
त्यांनी केलेली युद्धे आणि त्यात मिळालेला विजय पाहिल्यास यांच्या युद्धनीतीमध्ये असे काय वैशिष्ट्य होते की ज्यामुळे यांना विजयाची इतकी खात्री वाटत असे? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मंगोल राजांच्या या ताकदीचे आणि त्यांच्या विजयामागे नेमके काय रहस्य होते जाणून घेऊया या लेखातून.
१३ व्या शतकातील मंगोल सैन्य हे संख्याबळाने जास्त नसले तरीही शक्तिशाली सैन्य मानले गेले. या सैन्याकडे असणारी गतिशीलता, युद्धातील छोट्याछोट्या युक्त्या आणि शिस्तबद्धता हेच त्यांच्या विजयाचे कारण मानले गेले.
मंगोल राजांचे सैन्यबळ तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील विजिगीषू वृत्ती, हार न मानण्याची वृत्ती अफाट होती. हीच त्यांची खरी शक्ती होती.
त्याच्याशी तोंड देण्यासाठी नवी रणनीती आखत असत. १२६० मध्ये त्यांनी ऐन जलुतवर हल्ला केला होता. या युद्धात त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र बरोबर ४० वर्षांनी त्यांनी पुन्हा एकदा या प्रदेशावर हल्ला केला आणि हा प्रदेश जिंकून घेतला. त्यांची ही जिद्दच त्यांच्या विजयाचा शिल्पकार होती.
त्यांनी कायम स्वतःला बदलासाठी सिद्ध केले. मंगोल आपल्यातील लहानातील लहान मुलांनाही युद्धकला शिकवत असत. एखाद्यावेळी शत्रूशी गाठ पडलीच तर लहान मुलालाही स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे हा त्यामागील हेतू असे. लहानपणापासूनच युद्धकला शिकल्याने मोठेपाणी ही मुले एक शूर आणि निपुण योद्धा बनत असत.
मंगोल सैन्यातील शिस्तदेखील वाखाणण्याजोगी होती. त्यांच्या या शिस्तबद्ध विभागणीमुळेच त्यांचे सैन्य मजबूत आणि अभेद्य राहिले. इटलीचा इतिहास अभ्यासक गिओवानी द पेन डेल कॅप्रीयन याच्या मते मंगोल सैन्यासारखे शिस्तबद्ध सैन्य संपूर्ण जगात नव्हते. मंगोल सैनिक आणि अधिकारी कधीच आपल्या वरिष्ठांचा अपमान करत नसत. वरिष्ठांचा शब्द पाळणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब होती. प्रत्येक सैनिक आपल्या अधिकाऱ्याशी संपूर्ण निष्ठेने वागत असे.
मंगोल सैनिकांची रचनाही खूपच प्रभावी होते. त्यांनी आपल्या सैन्यातील दहा-दहा सैनिकांचे गट केले होते. अशा दहा-दहाच्या गटानेच त्यांचे सैन्य विभागलेले असे.
दर दहा सैनिकामागे एक अर्बन, दर शंभर सैनिकामागे एक जाग, हजार सैनिकांमागे एक मिघन, दहा हजार सैनिकांमागे एक ट्युमेन, अशी दशांश पद्धतीने त्यांनी आपल्या सैन्याची विभागणी केली होती.
मंगोल सैन्यातील प्रत्येक सैनिकाला ही व्यवस्था अमलात आणावीच लागे. प्रत्येक खालच्या अधिकाऱ्याला त्याच्या प्रदेशात आणि त्याच्या सैन्यात काय चालले आहे त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याला द्यावीच लागे. ट्युमेस आणि मिघन यांच्यावर बॉयन नावाचे अधिकारी असत. प्रत्यक्ष युद्धाच्या वेळीही मंगोल आपल्या सैनिकांना दहा-दहाच्या गटात विभागात असत. एका गटाने एकाच वेळी शत्रूला घेरणे किंवा शत्रूच्या तावडीत सापडलेल्या आपल्या सैनिकांना सोडवणे हेच या गटांचे उद्देश असे.
सैनिकांच्या क्षमतेला सतत धार देण्यासाठी मंगोल राजे मोठमोठ्या शिकारीच्या स्पर्धा आयोजित करत. यातून सैनिकांसाठी मोठ्या प्रमाणावर धान्य गोळा केले जात असे आणि सैनिकांच्या युद्धकलेची परीक्षाही घेतली जात असे. या स्पर्धेत हरणाऱ्या सैनिकाची इतर सैनिकांकडून मुद्दाम थट्टा केली जात असे. ज्यामुळे पुढच्या वेळी अधिक चांगली कामगिरी करून दाखवण्याची इर्षा त्याच्यात निर्माण होत असे. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सैनिकाला फक्त एकच बाण दिला जात असे. एकाच बाणात शिकार टिपणे म्हणजे सोपी गोष्ट निश्चितच नव्हती.
मंगोलांना वैयक्तिक जीवन फारसे नव्हतेच. हा समाज सततच युद्धात व्यस्त असे. जणू युद्ध करणे हाच त्यांचा धर्म होता. जन्मलेल्या प्रत्येक मंगोलाला एक तर सैनिक व्हायचे असते किंवा सैनिकांचा सेवक यशिवाय त्यांच्याकडे तिसरा काही पर्यायच नव्हता.
मंगोल सैन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे असणारे कमी उंचीचे पण वेगवान, शक्तिशाली आणि चपळ घोडे. लुट करून पळ काढणे आणि निश्चित वेळेत ठरलेल्या ठिकाणी पोहोचणे हे त्यांना या घोड्यांमुळेच शक्य होते.
मंगोल सैनिकांचे धनुष्यही आकाराने लहान असे. ज्यामुळे त्यांना धनुष्य हाताळणे सोपे जाई. हे धनुष्य प्राण्याची शिंगे, स्नायू आणि लाकडापासून बनवलेले असत. त्यामुळे ते मजबूत आणि लवचिक असत. या धनुष्याने एक मंगोल सैनिक २०० मीटर अंतरावर तीर मारू शकत असे. इतर धनुर्धरांची क्षमता फक्त १५० मीटर इतकी होती. या वैशिष्ट्यपूर्ण धनुष्यामुळे मंगोल सैनिकांना शत्रू सैन्यावर दुरूनही मारा करणे शक्य होते. त्यामुळे ते कधीच शत्रूच्या टप्प्यात येत नसत. आकाराने छोटे असलेले धनुष्य आणि चपळ घोडे ही त्यांच्या सैन्यातील एक जमेची बाजू होती.
१३ व्या शतकात झालेल्या लेग्निकाच्या युद्धात २०,००० घोडेस्वार धनुर्धरांनी शत्रूच्या ३०,००० घोडेस्वारांना मात दिली होती.
युद्धात जितकी महत्वाच भूमिका सैन्याची असते तितकीच महत्त्वाची भूमिका सैन्याच्या गुप्तचर यंत्रणेचीही असते. मंगोलांचे गुप्तहेर शत्रूच्या गोटातील सगळी माहिती तपशीलवार काढून घेत. युरोपवर हल्ला करण्यापूर्वी मंगोल गुप्तहेरांनी दहा वर्षे युरोपमध्ये वास्तव्य केले. युरोपातील गावांचे, शहरांचे नकाशेही त्यांनी तयार केले होते. शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर हे गुप्तहेर बारीक नजर ठेवून असत.
मंगोल जेव्हा एखाद्या प्रदेशावर हल्ला करत तेव्हा त्या आधी प्रदेशातील छोट्या छोट्या गावांतून, शहरातून लुट करत. ज्यामुळे या सैन्याची शत्रूवर आणि त्या प्रदेशातील नागरिकांवर जबरदस्त दहशत निर्माण होत असते. शत्रूचे मानसिक खच्चीकरण करणे हाही त्यांच्या युद्धनीतीचाच एक भाग होता.
जिथे आपण जिंकू शकत नाही अशी त्यांना आशंका वाटे तिथे ते बिनदिक्कत समर्पण घोषित करत, हार स्वीकारत आणि पुन्हा एकदा हल्ल्यासाठी सज्ज होत. दुसऱ्यांदा मात्र ते शत्रूवर हल्ला करून त्यांना जिंकून घेत असत.
सैन्यातील शिस्तबद्धता, आज्ञाधारकपणा, लढावूवृर्त्ती, कठोर परिश्रम करण्याची तयारी, चलाख गुप्तहेर, प्रसंगावधान राखून केलेले समर्पण, आत्मपरीक्षण आणि स्वसुधारणा या गुणांमुळेच मंगोल त्यांच्या काळातील शक्तिशाली राजे ठरले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.