आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
हुणांचा ज्यावेळी उल्लेख करण्यात येतो त्यावेळी हुण शासक आत्तीला हुण याचे नाव डोळ्यासमोर येते. याने सम्राट बनल्यावर आपल्या साम्राज्याचा विस्तार आशियापासून युरोपपर्यंत केला होता. इतकंच नाही त्याच्यामुळे हुण वंशाचा प्रसार संपूर्ण आशिया खंडात झाला होता. हा आत्तीला कधी भारतात येऊ शकला नाही पण भारतातील गुप्त वंशियांच्या राजवटीला त्याने हादरा दिला होता. त्याने एकावेळी आपले एकछत्री अंमल प्रस्थापित केले होते. यामुळेच लोक त्याला भारतातला ‘आत्तीला’ म्हणत.
मिहिरकुल हुणाच्या क्रूरतेमुळे हुण साम्राज्याचा मोठ्या वेगाने विस्तार झाला. युरोपानंतर आशिया खंडात त्याने आपले पाय रोवण्यास सुरुवात केली. हुण आक्रमक हे एका राज्यातून दुसऱ्या राज्याकडे मोठ्या जलदगतीने प्रवास सुरु करत. ते ज्या ठिकाणी जात तिथे ते स्थानिक धर्माचा स्वीकार करत. त्यांचा स्वतःचा कुठला धर्म नव्हता. त्यामुळे ज्याच्या संपर्कात ते यायचे, त्याच्या धर्माचा स्वीकार करायचे.
पाचव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांनी भारतात प्रवेश करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. परंतु प्रत्येक वेळा ते असफल होत होते.
राजा स्कंद गुप्ताने अनेकवेळा त्यांचा पराभव केला होता. इसवी सन ५००मधे श्वेत हुणांचा राजा तोरमण याने माळवा प्रदेश जिंकून घेतला होता. यातूनच त्यांचा भारतात विस्तार होण्यास सुरुवात झाली. ते हळूहळू मजबूत झाले. तोरमाणने आपल्या सैन्याला मजबूत करत मारवाड आणि पश्चिम राजस्थानवर हल्ला चढवला. एक एक करत त्यांनी तिथल्या सर्व राज्यांवर विजय संपादन केला. पण इथेच त्यांचा विजयरथ थांबला नाही, त्यांनी गुप्त राजांच्या साम्राज्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.
इसवी सन ५१५ मधे तोरमाणनंतर मिहिरकुल गादीवर विराजमान झाला. तोरमण हा एक कुशल शासक होता. परंतु भारतातील त्याचे विजयी अभियान त्याच्या सोबतच समाप्त झाले नाही. त्याचा मुलगा मिहिरकुल हा त्याहून क्रूर शासक होता. त्याने त्याची राजधानी पंजाबमधून सियालकोटला स्थलांतरित केली. इथेच त्याने त्याच्या विजयी अभियानाचा शुभारंभ केला. त्याचे हे अभियान अफगाणिस्तानापासून श्रीलंकेपर्यंत अविरत सुरु होते. त्याने आपल्या क्रूरतेचे एक वेगळे उदाहरण प्रस्तुत केले.
त्याला सर्व हूणांनी आत्तीला हे पदवी बहाल केली.
एकदा मिहिरकुलने बौद्ध धर्म समजून घेण्यासाठी बौद्ध भिक्षूंना आमंत्रित केले. मिहिरकुल हा एक क्रूर शासक होता, याच कारणामुळे बौद्ध भिक्षुकाने स्वतः न जात आपल्या सेवकाला त्याच्याकडे पाठवले. ज्यावेळी मिहिरकुलाला याची माहिती मिळाली त्यावेळी तो क्रोधाने पेटून उठला.
त्याने बौद्ध धर्मियांच्या सर्वनाशाची प्रतिज्ञा केली आणि यानंतर त्याने बौद्धांचा रक्तपात करण्यास सुरुवात केली. त्याने अनेक बौद्ध मंदिरांना नष्ट केले.
भारतात हुणांच्या राज्याची सुरुवात जरी तोरमाणच्या काळात झाली तरी त्याला धार आणायचे कार्य मिहिरकुलने पार पाडले. आपल्या क्रूर आणि हिंसक युद्ध पद्धतीच्या बळावर त्याने काश्मीरसहित अनेक भारतीय राज्यांवर विजय संपादन केला. सम्राट अशोक आणि विक्रमादित्य यांच्यानंतर तो भारताचा एकवेव चक्रवर्ती सम्राट बनला. मिहिरकुलाने आपल्या विजयी अभियानात प्रसिद्ध नालंदा विद्यापीठावर विजय संपादन केला. मिहिरकुलाने हा हल्ला स्कंदगुप्ताच्या शासन काळात केला होता. पुढे स्कंदगुप्ताच्या वंशजांनी या विद्यापीठाची पुन्हा उभारणी केली होती.
मिहिरकुलाने चारी दिशांना आपली दहशत निर्माण केली होती. त्याच्यासमोर कोणाचाच निभाव लागत नव्हता. यातूनच त्याला अहंकार चढला. यातूनच त्याचा अंताकडे प्रवास सुरु झाला. इसवी सन ५३३ मधे त्याला भावाकडून करण्यात आलेल्या विद्रोहामुळे पश्चिमेकडे यशोधर्मनकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. इतकेच नाही, त्याला यामुळे आपले राज्य सोडून पळ काढावा लागला होता.
मिहिरकुलाला पराभव सहन झाला नाही. त्याने आपल्या सैन्य शक्तीला एकत्र करत पटण्याच्या अवतीभवती नवीन साम्राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले. त्याला हे सहज वाटणारे कार्य मुळात प्रचंड कठीण होते.
राजा बालादित्यने त्याला तिथून हुसकावून लावले. यामुळे मिहिरकुलाला स्वतःचा जीव वाचावत पळावे लागले. असं म्हणतात की अंतसमयी तो काश्मिरात गेला होता. यानंतर त्याचे नाव कोणी ऐकले नव्हते. युद्धातील पराभवामुळे तो पार खचला होता. हेच त्याचा मृत्यूचे कारण बनले होते.
मिहिरकुल हा कुठल्या धर्म जातीचा नव्हता, त्याचे पूर्वज मध्य आशियातून भारतात आले होते. हुण लोक ज्या धर्माच्या संपर्कात आले त्याचेच अनुयायी बनले.
क्रूर असला तरीही मिहिरकुल हा एक कट्टर शिवभक्त होता. मंदोसर येथील एका शिलालेखानुसार त्याने यशोधर्मनशी झालेल्या युद्धाच्या आधी त्याने भगवान शंकरासमोर माथा टेकवला होता. त्याच्या काळातील नाण्यांवर जयतु वृष आणि जयतु नंदी लिहिलेले आढळून येते, त्याने काश्मिरातील महिरेश्वर मंदिर आणि इतर अनेक मंदिरे उभारली होती.
त्याचे एकच लक्ष्य होते ते म्हणजे विजय प्राप्त करणे. यासाठी त्याने अनेक लोकांच्या प्रेतांचे डोंगर रचले होते. त्याच्या याच हिंसक प्रवृत्तीने त्याला इतिहासात सन्मानाचे स्थान मिळाले नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.