आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मित्रांनो, आपण शाळेमध्ये शिकत असताना इतिहासाच्या तासाला कोलंबस, वास्को-द-गामा ही नावं नक्कीच ऐकली आहेत. अमेरिकेसारख्या खंडप्राय देशाचा शोध लावणारा महान संशोधक ही आपल्याला कोलंबसाची ओळख आहे. ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला’ ही ‘कोलंबसाचे गर्वगीत’ नावाची कुसुमाग्रजांची कवितादेखील आपण अभ्यासली आहे. कोलंबसाप्रमाणेच वास्को-द-गामा या संशोधकाच्या कार्याची सुद्धा आपण आपल्या शालेय शिक्षणामध्ये ओळख करून घेतली आहे.
वास्को-द-गामा हा जगाच्या इतिहासात अजरामर झालेला संशोधक असून त्यानं व्यापार वाढवण्यासाठी व आपल्या ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याकरिता युरोपमधून आशिया खंडातील भारत देशात प्रवेश केला. एक क्रूर योद्धा, कट्टर धार्मिक व कुशल व्यापारी अशी त्याची ओळख होती. त्याने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रवेश केला व तिथे आपला प्रभाव निर्माण केला. भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात आजदेखील त्याच्या खुणा पहायला मिळतात. बरेचसे रस्ते, म्युझियम्स इतकंच काय तर चक्क त्याच्या नावाचं ‘वास्को’ हे अख्खं शहर आपल्याला गोव्यात पहायला मिळतं.
तर मूळचा पोर्तुगीज असलेला हा वास्को-द-गामा नेमका कुठून आणि कसा काय भारतात आला, त्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की कुणी मदत केली तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
वास्को-द-गामा हा दि. ८ जुलै १४९७ रोजी ४ जहाजं व त्यांमध्ये एकूण १७० खलाशांना घेऊन पोर्तुगालच्या लिस्बेन या शहरातून समुद्राच्या प्रवासाला निघाला. समुद्रमार्गे फिरत फिरत वाटेतल्या प्रतिस्पर्धी अरब आणि आफ्रिकन व्यापाऱ्यांचा सामना करत करत तो दि. २२ एप्रिल १४९८ रोजी पूर्व आफ्रिकेतील मालिंदी बंदरात पोहोचला.
इथंच त्याची भेट झाली ती त्या माणसासोबत, ज्यानं त्याला भारतात येण्याचा मार्ग दाखवला आणि इथं यायला मदतही केली. त्या माणसाचं नाव होतं कानजी मालम. कानजीभाई हा एक गुजराती व्यापारी होता.
गुजरातचे व्यापारी तेव्हा वास्को-द-गामा यायच्या कित्येक वर्षं आधीपासून समुद्री मार्गाने आफ्रिका तसेच इतर देशांत फिरून व्यापार करत असत. कानजीभाई हा गुजरातमधील कच्छचा रहिवासी होता, तो लवंगा, काळीमिरी, हस्तिदंत, सोनं तसेच कापडाचा व्यापार करत असे.
कानजीभाईला भारताच्या नजीकच्या समुद्री मार्गांचं अगदी अचूक ज्ञान होतं. वास्को-द-गामाला नेमक्या याच गोष्टीचा फायदा मिळाला. त्यावेळी तेथे एक तीन दिवसांची सागरी परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात फ्रान्स, पोर्तुगाल, चीन, सिंगापूर तसेच श्रीलंका अशा अनेक देशांमधले जाणकार आणि संशोधन संस्था हे सर्व सहभागी झाले होते. कानजीभाई हा देखील याच परिषदेला उपस्थित राहण्याच्या निमित्ताने त्या काळात आफ्रिकेला आला होता. इथं त्याला अनेक देशविदेशातले व्यापारी, दर्यावर्दी भेटले, ज्यामधला एक वास्को-द-गामा हादेखील होता.
या भेटीच्या दरम्यान वास्को-द-गामा आणि कानजी मालम यांच्यामध्ये चर्चा झाली. वास्को-द-गामाची अडचण लक्षात आली, तेव्हा कानजीभाईनं त्याला मदत करायची तयारी दर्शवली. त्या दोघांच्या दरम्यान झालेल्या बोलणीनुसार वास्को-द-गामाच्या जहाजातला एक खलाशी कानजीच्या ताफ्यात येऊन मिळाला आणि भारताकडील मार्गाने त्यांचा प्रवास सुरु झाला.
प्रवास करत करत ते २० मे १४९८ रोजी भारताच्या दक्षिण किनाऱ्याजवळील ‘कालिकत’ या बंदरापाशी येऊन पोहोचले.
कालिकत हे केरळमधील एक बंदर होतं. सागरी मार्गाने चालणाऱ्या व्यापारासाठी हे बंदर अतिशय महत्त्वाचं मानलं जात होतं. वास्को-द-गामानं तिथं आपल्या चतुर बुद्धी व व्यवसायिक कौशल्य या दोन्हींच्या बळावर आपलं बस्तान तर बसवलंच, त्याशिवाय आपल्या ख्रिस्ती धर्माचा प्रचारही बऱ्याच प्रमाणात केला. कालिकत शहराचं नाव आता ‘कोझिकोडे’ असं बदलण्यात आलेलं असून ते आता केरळ राज्याच्या उत्तर भागामधल्या प्रमुख शहरांपैकी एक मानलं जातं.
वास्को-द-गामानं भारतात चांगलाच जम बसवल्याचं पाहून पोर्तुगालचा राजा किंग जॉन (तिसरा) यानं त्याची भारताचा व्हॉईसरॉय म्हणून नेमणूक केली. त्यानंतर बराच काळ तो आपल्या मायदेशी परत गेला नाही. त्याने भारतातच एका प्रसिद्ध स्त्रीसोबत लग्न केलं. त्याच्या पत्नीचं नाव कॅटरिना असं होतं. या जोडप्याला सहा मुलगे आणि एक मुलगी अशी एकूण सात मुलं झाली.
पुढे भारतामधल्या वाढत्या भ्रष्टाचारामुळे इथं होऊ लागलेली पोर्तुगीजांची बदनामी थांबवण्यासाठी तो गोव्यात आला, आणि अखेरपर्यंत तो गोव्यातच होता. शेवटी मलेरियाने ग्रस्त होऊन इ.स. १५२४ मध्ये ख्रिसमसच्या आदल्या दिवशीच तो हे जग सोडून गेला. त्याच्या पार्थिवावर प्रथम कोची इथं अंत्यसंस्कार झाले, पण नंतर त्याचे अवशेष पोर्तुगालला परत नेण्यात आले.
खरंतर वास्को-द-गामा भारतात यायच्या पूर्वीपासून भारत आणि युरोपचे व्यापारी संबंध होते. त्यावेळी रस्त्यावरील वाहतुकीद्वारे मालाची ने-आण केली जात केली. परंतु यात अडथळा निर्माण व्हायला कारणीभूत झाले अरेबिक लोक. त्यांनी इस्तंबूल शहराच्या जवळ हा रस्ता बंद केला. त्यामुळे पर्यायी मार्गाची गरज भासू लागली म्हणून अनेक युरोपियन सागरी मार्गाने भारताकडे येण्याचा रस्ता शोधून काढण्याच्या मोहिमेवर निघाले.
पण त्यात यशस्वी झाला तो मात्र एकमेव वास्को-द-गामाच!
काही जणांच्या मतानुसार वास्को-द-गामाला ज्यानं भारतात आणलं होतं, तोही त्याच्यासारखा एक ख्रिश्चन होता किंवा मग एखादा मुसलमान होता तर काही जण म्हणतात की, त्याचं नाव हे इब्न मजिद होतं ज्याला ‘द प्रिन्स ऑफ द सी’ किंवा ‘द लायन ऑफ द सी’ अशा वेगवेगळ्या नावांनीसुद्धा ओळखलं जात असे. पण या गोष्टीचे सध्या कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत की, ज्यांतून हे सिद्ध होईल की, इब्न मजिद आणि वास्को-द-गामा यांची भेट झाली होती. या दोघांचा त्या काळात कोणत्याही प्रकारे एकमेकांशी संबंध आला नव्हता. इब्न मजिद हा एक कवी, लेखक होता. वेगवेगळ्या प्रकारचं भरपूर लेखन त्यानं केलं होतं. साधारणतः इ.स.१५०० च्या दरम्यान इब्न मजिदचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते.
मात्र, कानजी मालम आणि वास्को-द-गामा यांच्या भेटीचे पुरावे आजही कोचीमधल्या इंडियन नेव्ही म्युझियममध्ये ‘आयएनएस द्रोणाचार्य’च्या रुपात पहायला मिळतात!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.