आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१९६५ सालचे भारत पाकिस्तान युद्ध कोणीच विसरू शकत नाही. किमान, या युद्धात ज्यांनी ज्यांनी आपली तरुण मुले गमावली ते तर अजिबातच नाही. ज्या घरची तरुण मुले आणि मुली सीमेवर शहीद होतात, त्यांच्यासाठी कुठल्याही युद्धाच्या आठवणी विसरणे तसे अशक्यच.
१९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात अनेकांनी आपली प्राणाहुती देऊन भारतमातेच्या गळ्यात विजयमाला घातली. पाकिस्तानच्या भूमीवर तिरंगा फडकावला. अब्दुल हमीद, मेजर भूपेंद्र सिंह, हवालदार जस्सा सिंह, मेजर जनरल सलीम क्लेब, लेफ्टनंट कर्नल ए. बी. तारापोर, लेफ्टनंट जनरल ह्नुत सिंह, रणजीत सिंह दयाल आणि जनरल हरबख्श सिंह अशी कित्येक नावे घेता येतील ज्यांनी या युद्धात स्वतःचे समर्पण देऊन भारताला विजयी केले.
याच शूर पुत्रांच्या मालिकेतील अजून एक नाव म्हणजे, आसा राम त्यागी!
डोगरईच्या जमिनीवर लढताना त्यांनी दाखवलेली हिंमत असाधारण होती.
शत्रूच्या सैनिकांनी त्यांच्यावर इतक्या गोळ्या झाडल्या होत्या की, त्यांच्या शरीराची चाळण झाली होती. तशाही अवस्थेत ते पाकिस्तानी टँक्स उध्वस्त करण्यासाठी हातात ग्रेनाइड बॉम्ब घेऊन पुढे गेले आणि त्यांनी शत्रूचे टँक्स उध्वस्त करूनच श्वास सोडला.
युद्धभूमीवर अतुलनीय शौर्य गाजवणारे आसा राम त्यागी यांचा जन्म २ जानेवारी १९३९ रोजी उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद जिल्यातील फतेहपुर गावात झाला. घरी पुत्ररत्नाचा लाभ झाल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्या वडिलांनी तर अगदी धुमधडाक्यात आणि जल्लोषात त्यांच्या जन्माचं स्वागत केलं.
आसा राम यांचे बालपणही एखाद्या सर्वसामान्य मुलाप्रमाणेच होते. लहान असताना ते अंगापिंडाने मजबूत होते शिवाय चलाख आणि चपळ होते. त्यांच्या गावातील काही ज्येष्ठ मंडळी त्यांच्या वडिलांना नेहमी म्हणत, की तुझा हा मुलगा मोठा झाल्यावर कुटुंबाचे नाव गाजवेल. गावातील ज्येष्ठ मंडळींचा हा होरा अगदीच अचूक होता हे नंतर सिद्ध झालेच.
तरुणपणी आपण सैन्यातच भरती होऊ असा त्यांचा निश्चय कधीचाच झाला होता. त्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी जोरात तयारी सुरु केली. शेवटी त्यांच्या मेहनतीला फळ मिळालेच. १७ डिसेंबर १९६१ रोजी जाट रेजिमेंटमध्ये भरती होऊन त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले होते.
१९६५ साली पाकिस्तानने भारतावर दुसऱ्यांदा हल्ला केला. त्यांच्या बटालियनने लगेचच पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देणे सुरु केले. आसा राम यांना मोहिमेवर जायचे आदेश मिळताच ते तातडीने तयार झाले. त्यांच्यातील उत्साह द्विगुणीत झाला होता.
२१ सप्टेंबर १९६५ चा दिवस होता. जाट रेजिमेंटला पाकिस्तानच्या डोगरइ गावात जाऊन त्यांच्या सैन्याला थोपवण्याचे आदेश देण्यात आले होते.
आसा राम यांनी आपल्या रेजिमेंटसह डोगरइकडे कूच केली. शत्रूची स्थिती चांगली होती. तरीही पुढे जात राहण्याचा निश्चय त्यांनी सोडला नाही.
सर्वात आधी त्यांनी डोगरइच्या पूर्वेकडील शत्रू सैन्याचा खात्मा केला. तो भाग आपल्या ताब्यात मिळवल्यानंतर ते अत्यंत वेगाने पुढचे निर्णय घेऊ लागले. अगदी कमी वेळात ते आपल्या निर्दिष्ट ठिकाणी पोहोचले. कसलाही उतावळेपणा न करता आधी त्यांनी शत्रू सैन्याचा अंदाज लावला. मग आपल्या जवळ काय साधने आहेत. त्याचा कोणत्या परिस्थिती कसा वापर केला जाऊ शकतो याचाही विचार केला. मगच त्यांनी शत्रू सैन्यावर हल्लाबोल केला.
भारतीय सैन्य इतक्या आत घुसल्याचे पाहून पाकिस्तानी सैन्य पूर्णपणे हडबडून गेले. त्यांनी मेजर आसा राम यांच्या बटालियनवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. मेजर आसा राम आणि त्यांचे सहकारी देखील अगदी तोडीस तोड उत्तर देत होते. या सगळ्या गदारोळात त्यांना शत्रू सैन्याच्या दोन गोळ्यांनी जखमी गेले. शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागला. अशा अवस्थेत पुढे जाणे त्यांना अशक्य वाटत होते. पण, तरीही त्यांनी माघार घेतली नाही.
शत्रू सैन्याकडील टँक्स उध्वस्त झाले तर आपले मिशन पूर्ण होण्यास मदत होईल अशा विचाराने हातात दोन हातबॉम्ब घेऊन ते शत्रूच्या दिशेने जाऊ लागले. शत्रूला याची खबर लागण्याआधीच त्यांनी त्यांचे दोन टँक्स उध्वस्त केले. यामुळे शत्रूची आणखी पीछेहाट झाली.
यावेळी त्यांना तीन गोळ्या लागल्या होत्या, भरपूर रक्तस्त्राव झाला होता. या जखमांमुळे ते बेशुद्ध पडले. त्यांचे सहकारी त्यांना बेस कॅम्पपर्यंत घेऊन आले.
मेजर आसा राम यांनी शत्रूला खिळखिळीत केल्याने उर्वरित सैनिकांनी हे मिशन यशस्वीपणे तडीस नेले होते. बेस कॅम्पपर्यंत नेतानाही मेजरचे लक्ष युद्धभूमीकडेच होते. अधून मधून ते बेशुद्ध होत होते.
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या मनात विजयाचाच ध्यास होता. शेवटी डोगरइवर तिरंगा फडकालाच. परंतु देशाचा एक दमदार बहाद्दूर वीर जवान हरवला.
बेस कॅम्पकडे नेताना ते म्हणत होते की, मी काही आता जगणार नाही. त्यापेक्षा तुम्हीच मला गोळ्या घालून मारून टाका. परंतु त्यांच्यासोबतच्या शिपायांनी त्यांना धीर देत बेस कॅम्पपर्यंत नेले. त्याच्या सहकाऱ्यांनाही आपला जाबज सैनिक जगाला पाहिजे असेच वाटत होते. परंतु २५ सप्टेंबर १९६५ रोजी मेजर आसा राम यांना वीरमरण प्राप्त झाले. विजयाचा जल्लोष करावा की मेजर आसा राम यांच्या जाण्याचे दु:ख करावे असा संभ्रम निर्माण करून ते या जगातून अत्यंत अभिमानाने निघून गेले.
त्यांच्या अफाट शौर्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना मरणोत्तर महावीर चक्र देऊन सन्मानित केले. आसा राम यांची ही शौर्यगाथा नेहमीच भारतीयांना प्रेरणा देत राहील. आज अनेक तरुण त्यांची प्रेरणा घेऊन सैन्यात उतरत आहेत. त्यांच्यासारखेच शौर्य गाजवत आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.