आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळात बरीच छोटीमोठी संस्थानं होती. तिथल्या राजामहाराजांचे रंजक किस्से आजही ऐकवले जातात. त्यांच्या पराक्रमांच्या किस्स्यांसोबातच त्यांची अफाट संपत्ती, त्यांच्या चित्रविचित्र सवयींबद्दलही अनेक कथा तिथले लोक सांगतात.
असाच एक राजा गुजरातमध्ये होऊन गेला. त्याचं नाव होतं महमूद शहा. तो राजा महमूद बेगडा या नावाने देखील ओळखला जाई. हा महमूद शहा प्रचंड पराक्रमी होता पण तेवढाच विचित्र. अगदी लहान वयातच आपल्या वडिलांचे छत्र हरपल्यामुळे त्याच्यावर सिंहासनाची जबाबदारी येऊन पडली. त्याने ती उत्कृष्टपणे सांभाळली.
महमूद बेगडा गुजरातचा सर्वात शक्तिशाली राज्यकर्ता मानला जातो. अल्पावधीतच, त्याने जुनागड आणि पावागडवर ताबा मिळवून आपल्या राज्याचा सीमाविस्तार केला. असं म्हणतात की हा विजय मिळवल्यावर त्याने ज्या राजांना बंदी बनवलं होतं त्यांना इस्लाम स्वीकारण्याची आज्ञा दिली आणि हे अमान्य केल्यास त्यांना ठार मारण्याचा आदेश दिला होता.
१४७२ मध्ये यानेच गुजरातमधील द्वारकाधीश मंदिर फोडून टाकले होते.
महमूद शहाला मोठ्या मोठ्या मिशा ठेवायची हौस होती. काही पोर्तुगीज पर्यटक राजाच्या मिश्यांबद्दल असे सांगायचे की त्या मिश्या इतक्या लांब आणि रेशमी होत्या की त्यांना राजा त्याच्या मस्तकावर पगडीसारखं बांधायचा. राजाची दाढीही कंबरेपर्यंत होती.
असं म्हणतात की त्याच्या मोठ्या मिशांप्रमाणेच त्याची भूकही तितकीच मोठी होती. हा राजा एका दिवसात सुमारे ३५ किलो जेवण करायचा, ज्यात साडेचार किलोपेक्षा जास्त गोड पदार्थ असायचे.
काही आख्यायिका असेही सांगतात की राजा झोपी जातानाही दोन्ही बाजूला खाद्यपदार्थ ठेवत म्हणजे जर कधी रात्रीतून राजाची झोप उघडली आणि भूक लागली की लगेच त्यांना खायला मिळेल.
इटालियन प्रवासी लुडोव्हिको दि वर्थेमा यांनीही आपल्या पत्रांतून राजाच्या आहाराविषयी लिहीले आहे. एका पत्रात ते म्हणतात की, राजा त्याच्या रोजच्या नाश्त्याला एक ग्लास मध आणि १५९ केळी खातो.
पोर्तुगीज पर्यटक डुआर्ते बार्बोसा याने १४ व्या शतकाच्या उत्तरार्धात गुजरातला भेट दिली. यावेळी त्याने या राजाचे आयुष्य जवळून पाहिले. हा प्रवासी Duarte Barbosa या आपल्या पुस्तकात नमूद करतो की हा राजा दररोजच्या अन्नाबरोबर विष खायचा.
असे म्हणतात की राजघराण्यातील काही लोकांनी विषप्रयोग करून राजाला ठार मारण्याचा कट रचला होता. पण, त्वरित उपचार केल्यामुळे तो वाचला. राजवैद्यांनी अन्नात सापडलेल्या विषाबद्दल सांगितले पण ज्यांनी विषप्रयोग केला ते मात्र हाती लागले नाहीत.
त्यानंतर राजा दररोज काही प्रमाणात विष खायला लागला. दिवसेंदिवस जेवणातील विषाचे प्रमाण वाढत गेले. राजाचं असं मत होतं की विष खाल्ल्यावर विषाने शरीरात फेरबदल होतात त्यामुळे जर एखाद्याने मारण्याची योजना आखली तरीही ती यशस्वी होणार नाही.
पण हे असं विष खाणारा महमूद एकमेव राजा नव्हता, त्याकाळात अनेक राजेमहाराजे विष सेवन करायचे.
दररोज विषबाधा न होता विषसेवन करण्याची ही प्रक्रिया मिथ्रिडॅटिझम म्हणून ओळखली जाते.
हळूहळू शरीराला विषाची सवय होते आणि विषबाधेचा धोका कमी होतो. या शब्दाचा इतिहास देखील मनोरंजक आहे. ही पद्धत आर्टेनियाच्या पोंटस आणि किंग मिथ्रिडेट्स सहाव्याच्या भीतीने तयार झाली अशी मान्यता आहे. मिथ्रिडेट्सच्या वडिलांना विषप्रयोग करुन ठार मारण्यात आले. यामुळे राजा इतका घाबरला की भविष्यात हे होण्यापासून टाळण्यासाठी तो दररोज स्वत: थोडं विष खाऊ लागला.
पण तेव्हा सर्व प्रकारचे विष घेऊन मिथ्रिडायटिजमचा वापर केला जात नव्हता. यासाठी केवळ असे विष घेतले गेले जे अधिक जटिल आहे कारण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्यावर प्रतिक्रिया देते. एकदा विष दिल्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचे विष दिल्यानंतर यकृत कंडिशनिंग होते आणि ते अधिक एंजाइम बनवते, जेणेकरुन विष व्यवस्थित पचेल.
सायनाइडच्या उदाहरणावरून हे समजू शकते. सफरचंद किंवा इतर बरीच फळांच्या दाण्यांमध्ये सायनाइड असते, जे आपण बर्याचदा खातो. हे शरीरात कमी प्रमाणात जात असल्याने आपले शरीर त्याला सहज पचवते.
अशा अनेक कथा सम्राट महमूद बेगडा या राजाबद्दल लिहिल्या गेल्या आहेत. या सुलतानासारखे असे अनेक राजे होऊन गेले आहेत. त्यांच्या अशाच रंजक कथा वाचण्यासाठी ‘द पोस्टमन’ वाचत रहा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.