आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्या भारतीय संस्कृतीत ‘गुरू’ या संकल्पनेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आईवडिलांनंतर आपण गुरुलाच आदराचं स्थान देतो. मातृ, पितृ आणि गुरुऋण हे कधीही फिटत नाही, असं समजलं जातं. आपण आपल्या शाळेतले शिक्षक किंवा इतर कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण देणाऱ्यांना सुध्दा गुरूच समजतो, पण खरंतर गुरू या शब्दाची व्याख्या ही खूप वेगळी व तितकीच सखोल आहे. त्या अर्थाने जर बघायला गेलं तर कोणी दत्तगुरु किंवा स्वामी समर्थांना गुरू मानतो. कोणी नवनाथ, साईबाबा किंवा गजानन महाराज. तसे तर प्रत्येकाच्या श्रद्धास्थानी असलेले गुरू हे वेगवेगळेच असतात. अशाच एका गुरूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत, यांचं नाव ‘महावतार बाबाजी’ असं आहे. अनेकांनी त्यांचा फोटो किंवा चित्र पाहिलं असेल, मात्र ते महावतार बाबाजी हेच आहेत याबद्दल त्यांना निश्चित खात्री नसेल. ते नक्की कोण? कुठले? याबद्दल काहीही माहीत नसेल. तर चला घेऊया जाणून.
महावतार बाबाजींचा जन्म कुठे, कधी झाला याबाबत ठोस पुरावे सध्या उपलब्ध नाहीत. बाबाजींचं वय हे सध्या सुमारे २००० वर्षं असल्याचं काही ठिकाणी सांगितलं जातं. त्यांचा जन्म तामिळनाडूतील चिदंबरमच्याजवळ परंगीपेट्टाई इथं झाला असल्याचा अंदाज वर्तवला जातो. महावतार बाबांनी आपल्या काही शिष्यांना सांगितल्याप्रमाणे इ.स. २०३ च्या ३० नोव्हेंबरला त्यांचा जन्म झाला होता व आईवडिलांनी त्यांचं नाव नागराज ठेवलं होतं. वडील हे गावच्या मंदिरात पुजारी म्हणून काम करीत. बाबाजी चार वर्षांचे असताना एकदा त्यांच्या आईने घरातील काही कार्यासाठी म्हणून एक मोठा फणस आणून बाहेरच्या बाजूस ठेवला होता. एकदा बाबांनी आई घरात नसताना तो अख्खा फणस एकट्यानेच खाऊन संपवला. आईने परत आल्यावर हे पाहिलं, आणि रागाने तिने एक कापडाचा बोळाच त्यांच्या तोंडात कोंबला, अगदी श्वास गुदमरेल इथपर्यंत, पण बाबाजी मात्र त्यातूनही सुखरूप वाचले.
अकराव्या वर्षी बाबाजी एका संन्याशांच्या समूहासोबत पायी व बोटीतून प्रवास करत श्रीलंकेला कटरगाम येथे गेले. तिथे त्यांची भेट त्यांचे गुरू सिद्ध भोगरनाथ यांच्यासोबत झाली. त्यांनी बाबाजींना महर्षी अगस्त्यांची प्रेरणा असलेला क्रिया कुंडलिनी प्राणायाम शिकवला. त्यातली अनेक रहस्ये त्यांना समजावून सांगितली. त्यानंतर बाबाजी बद्रीनाथला गेले, तिथे त्यांनी गुरूंनी शिकवलेल्या विद्येचा साधारण दीड-दोन वर्षं अभ्यास केला.
महावतार बाबाजींची पहिली भेट १८६१ साली श्यामाचरण लाहिरी (ज्यांना लाहिरी महाशय म्हणूनही ओळखलं जातं) यांच्याशी झाली. मुळात लाहिरी हे इंग्रजांच्या चाकरीत होते. त्यांची बदली त्यावेळी राणीखेतमध्ये झाली. एकेदिवशी ते तिथल्याच एका निर्जन डोंगरातून जात असताना त्यांना त्यांच्या नावाने कुणीतरी मारलेली हाक ऐकू आली, त्यांनी पाहिलं तर एक उंचापुरा असा तेजस्वी योगी पुरुष त्या तिथं डोंगराच्या अगदी उंच टोकावर होता. क्षणार्धात तिथून तो लाहिरी यांच्यासमोर प्रकट झाला व त्यानं त्यांना सांगितलं की, “तुला इथं आणायची योजना माझीच होती. मागील जन्मी मी तुझा गुरू होतो”. ते योगी पुरुष म्हणजे महावतार बाबाजीच होते. त्याच दिवशी संध्याकाळी श्यामाचरण यांना बाबाजींनी क्रिया योग दीक्षा दिली आणि पश्चिम भारतात त्याचा प्रसार करण्याची आज्ञा केली. त्यांनी आपल्याबद्दल कोणत्याही स्वरूपाची माहिती न दिल्यानं लाहिरींनीच त्यांचं नाव ‘महावतार बाबाजी’ असं ठेवलं. मुळात आपल्याकडे बाबाजी, महाराज या अशा नावांचे अनेक संतपुरुष आजवर होऊन गेलेत, त्यामुळे या नावातदेखील बऱ्याचदा लोकांचा गोंधळ होतो.
लाहिरी महाशयांची बाबाजींसोबत बऱ्याचदा भेट झाली. त्यांचे काही शिष्यसुद्धा बाबाजींना भेटले असल्याचे उल्लेख सापडतात. यात युक्तेश्वर गिरी, प्रणवानंद गिरी, केशवानंद गिरी, केवलानंद गिरी, परमहंस योगानंद यांचा समावेश आहे. यातील बऱ्याच जणांनी बाबाजींच्या भेटीबद्दल लिहून ठेवलं आहे. या सर्वांना वेगवेगळ्या कालखंडात महावतार बाबाजी भेटले होते, पण या सगळ्यांनाच भेटीच्या वेळी ते फक्त २५ ते ३० वयाच्या दरम्यानचे आढळले होते. हा काळ साधारणपणे १८६१ ते १९३५ दरम्यानचा आहे. लाहिरी महाशयांच्या मते महावतार बाबाजी हे पूर्वजन्मी भगवान श्रीकृष्ण होते. परमहंस योगानंद हेदेखील नेहमीच “बाबाजी-कृष्ण” असे म्हणत त्यांची प्रार्थना करत असत. आज आपण महावतार बाबाजींचं जे चित्र पाहतो, तेसुद्धा परमहंस योगानंद यांच्या पुढाकारानेच तयार झालेलं आहे.
महावतार बाबाजींची एक बहीण गेल्या अनेक शतकांपासून जीवंत असून भूमिगत राहून साधना करत आहे. तिचं नाव ‘माताजी’ आहे, असा उल्लेख योगानंद यांच्या आत्मचरित्रात आढळतो. प्रत्यक्षात संपूर्ण पुस्तकात केवळ तीनच पानं या माताजी वर आहेत. महावतार बाबाजींनी आदिशंकराचार्य व नंतर संत कबीर यांना क्रिया योगाची दीक्षा दिली. नंतरचे त्यांचे शिष्य म्हणजेच लाहिरी महाशय असं म्हटलं जातं. बाबाजींची मुख्य बोलीभाषा हिंदी असली, तरी कोणत्याही भाषेत ते संवाद साधू शकतात असं म्हणतात.
बाबाजींच्या संदर्भात दोन रोचक किस्से प्रसिद्ध आहे.
एकदा महावतार बाबाजी आपल्या काही शिष्यांसह शेकोटीपाशी बसले होते. अचानक त्यांनी शेकोटीतलं एक जळकं लाकूड घेऊन एका शिष्याच्या खांद्यावर मारलं. याला बाकीच्या शिष्यांनी विरोध करताच बाबाजी म्हणाले, “मी त्याचा आज होणारा मृत्यू टाळला आहे”.
तर एकदा, बाबाजींकडे एकजण आला आणि म्हणू लागला की, मला तुम्ही शिष्य करून घ्या नाहीतर मी आता इथून उडी मारून जीव देईन. बाबाजी शांतपणे म्हणाले, “मार उडी” आणि त्याने खरोखर उडी मारून जीव दिला. बाबाजींनी शिष्यांना त्या माणसाचं प्रेत घेऊन यायला सांगितलं, त्याप्रमाणे शिष्य ते प्रेत घेऊन आले. बाबाजींनी प्रेताला स्पर्श करताच ते छिन्नविच्छिन्न प्रेत पूर्ववत होऊन तो माणूस पुन्हा जीवंत झाला. बाबाजींनी त्याला सांगितलं की, “तुझी ही शेवटची परीक्षा होती. आता यापुढे तू माझा शिष्य आहेस.”
आपल्या भारतीय इतिहासात परशुराम, हनुमान, बिभीषण, व्यास, कृपाचार्य, अश्वत्थामा व बली हे सप्तचिरंजीव मानले जातात. महावतार बाबाजी यांपैकी नसूनदेखील बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहेत. महावतार बाबाजींची गुहा आजही उत्तराखंडमध्ये अलमोरा जिल्ह्यामधील कुकुछीना पासून १३ किमी दूर असलेल्या दूनागिरी येथील पांडुखोली येथे आहे. आजदेखील ते आपल्या निस्सीम भक्तांना दर्शन देतात. बाबाजींचं वय आजही २५पेक्षा जास्त दिसत नाही. ते गोरेपान, उंचपुरे, मध्यम बांध्याचे आहेत. त्यांचे केस लांब, तांबूस रंगाचे आहेत. त्यांचे डोळे काळेभोर आणि शांत असे आहेत. ते केवळ कधीकधीच भक्तांच्या प्रेमाखातर ते फलाहार किंवा दूध घेतात, असं म्हणतात.
सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांत, अभिनेत्री जूही चावला हे महावतार बाबाजींचे भक्त असून ते नियमितपणे त्यांच्या दर्शनाला येत असतात. २००२ मध्ये रजनीकांत यांनी ‘बाबा’ नावाचा एक चित्रपट लिहिला होता, हा चित्रपट महावतार बाबाजींवरच आधारित होता. बाबाजींनी आजवर अनेक योग्यांना दर्शन दिलं आहे, मात्र त्यासाठी साधकही तितक्या उच्च कोटीचा असावा लागतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.