आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
‘तलवारीपेक्षा लेखणी जास्ती धारदार असते’
हे वाक्य महाश्वेता देवी यांना तंतोतंत लागू पडते. त्यांनी आपल्या लेखणीने जातिभेद, आदिवासी व वंचितांचे शोषण अशा विषयांवर मुबलक लिखाण केले. घरातल्या चार भिंतींच्या मर्यादा ओलांडून त्यांनी लोकांमध्ये जाऊन लिखाण केले. समाजातील सर्वात वंचित घटकाचा आवाज म्हणून महाश्वेता देवी लिखाण करत होत्या.
महाश्वेता देवी यांचा जन्म १९२६ साली ढाका येथे झाला. फाळणी झाल्यानंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. त्यांचे वडील मनीष घटक, कल्लोल आंदोलनाशी जोडले गेले होते. हे बंगाली साहित्याच्या इतिहासातील फार महत्वाचे आंदोलन होते. त्यांच्या आई धरित्री देवी देखील समाजसेविका आणि लेखिका होत्या. महाश्वेता देवी यांनी कोलकाता येथील विद्यापीठातून एम.ए. चे शिक्षण घेतले होते. त्यांच्यावर रवींद्रनाथ टागोरांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता.
१९४८ मध्ये त्या बिजोन भट्टचार्य यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. भट्टाचार्य हे इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनचे संस्थापक होते. दहा वर्षांच्या संसारानंतर त्यांनी आपल्या पतीला सोडचिट्ठी दिली आणि त्यांनी १९५९ला घटस्फोट घेतला. बिजोन आणि त्यांना एक मुलगा झाला, नाबरून भट्टाचार्य देखील लेखकच आहे. त्यांना बंगाली साहित्यातील मोठे नाव मानले जाते.
महाश्वेता देवी यांचे नाव आघडीच्या बंगाली लेखकांमध्ये घेतले जाते. फिक्शन आणि आपल्या राजकीय लेखनाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवले.
१९६४ साली त्यांनी बिजॉयगड कॉलेजमध्ये शिकवण्यास सुरुवात केली. त्याकाळी कॉलेजात फार कमी स्त्रियांना संधी मिळायची. त्यांनी एका पत्रकार आणि रचनात्मक साहित्यिक म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
त्यांच्या लेखनामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली, आजही लोकांच्या तोंडावर त्यांचे नाव आहे. त्यांनी लघुकथा, बालकथा आणि कादंबऱ्यांचे लेखन केले. महाश्वेता देवी फक्त त्यांच्या राजकीय लिखाणासाठी ओळखल्या जात नाहीत. त्यांनी भारतातील भूमिहीन मजुरांच्या प्रश्नावर त्यांनी काम केले होते. त्यांचे गरीब आणि वंचित परिवारांशी असे नाते विकसित झाले होते की त्यांच्या व्यतिरिक्त त्या परिवारांच्या समस्या दुसरी कुठलीच व्यक्ती समजून घेऊ शकत नव्हती. त्यांनी परिस्थितीचे वास्तविक दर्शन आपल्या लिखाणातून घडवले.
महाश्वेता देवी यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिले पुस्तक हे झाशीच्या राणीवर लिहिले होते. खरे तर त्यांच्या जवळ झाशीच्या राणीच्या इतिहासाबाबत फार अत्यल्प माहिती होती. त्यांनी झाशीच्या राणीविषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यांनी इतिहास संस्थांमध्ये जाऊन ऐतिहासिक संदर्भ तपासून बघितले. ज्या लोकांनी झाशीच्या राणीला पाहिले होते अशा लोकांकडून त्यांनी किस्से ऐकून घेतले. याविषयावर फार तन्मयतेने आपला अभ्यास पूर्ण केल्यावर त्यांनी आपल्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन केले.
महाश्वेता देवी यांनी वयाच्या तेराव्या वर्षांपासून लिखाणास सुरुवात केली होती, पण त्यांना खरी प्रसिद्धी ही वयाच्या तिसाव्या वर्षी मिळाली.
महाश्वेता देवी यांचे लेखन तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे वाचन करणाऱ्या एका रिक्षावाल्याने एकदा त्यांनाच त्यांच्या पुस्तकातील एका शब्दाचा अर्थ त्यांना विचारला होता. देवी यांना हे इतकं फार आवडलं की त्यांनी त्याला आपल्यासोबत काम करायला आमंत्रित केले होते.
तो रिक्षावाला आधी नक्षलवादी चळवळीत होता. पण पुढे त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्याठिकाणी त्याने लिहायला-वाचायला सुरुवात केली. तो रिक्षावाला दुसरा कोणी नाहीतर आजच्या बंगाली साहित्यातील प्रसिद्ध दलित लेखक मनोरंजन ब्यापारी होते. आजवर ब्यापारी यांनी १०० लघुकथा आणि ९ कादंबऱ्यांचे लेखन केले आहे.
महाश्वेता देवी यांच्या लिखाणात भावनिकतेचा लवलेश देखील नव्हता. त्या अत्यंत परखडपणे आपले विचार लिहायच्या. त्यांना आयुष्यात आलेल्या अनेक अनुभवांना त्यांनी लिहून काढले होते. त्यांची भाषाशैली ही सर्वसामान्य वाचकाला सहज वाचता येईल अशी होती. त्यांच्या लेखनात सामाजिक परिस्थिती, सत्ताकेंद्रे, राजकारण आणि सामान्य माणसाच्या आयुष्याचे सुंदर चित्रण करण्यात आलेले आहे.
त्यांच्या द्रौपदी या कादंबरीत त्यांनी आदिवासी समाजातील महिलांच्या विदारक परिस्थिती व लैंगिक शोषणावर भरभरून लिहिले होते. ‘1084 की माँ’ ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी आहे.
१९८४ साली महाश्वेता देवी यांनी शिकवण्यातून निवृत्ती घेतली आणि लेखनाकडे वळल्या. महाश्वेता देवी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार लेखनासाठी नाहीतर त्यांच्या सामाजिक कार्यासाठी बहाल करण्यात आला होता. पश्चिम बंगालच्या पुरुलिया आणि मेदिनीपुर भागात त्यांनी आदिवासी हिताची अनेक कामे केली होती.
१९८८मधे महाश्वेत देवी यांना बहुमूल्य ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. १९९७ साली त्यांना मॅगसेसे पुरसजार मिळाला होता. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे. महाश्वेता देवी यांनि आयुष्यभर गरिबांच्या सेवेसाठी काम केले. १८ जुलै २०१६ ला त्यांचे निधन झाले आणि वंचितांचा आवाज हरपला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.