आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
अंदमान निकोबार बेट म्हणजे निळ्याशार समुद्रावर पसरलेली पाचूची बेटे. इथले रमणीय किनारे, समुद्रातील अनोखी जीवसृष्टी बघण्यासाठी, येथील जलक्रीडांचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी येथे हजारो पर्यटक भेट देत असतात. वास्तविक हे अनेक बेटांचे बनलेले द्वीपसमूह आहेत. त्यापैकीच एक बेट म्हणजे नॉर्थ सेंटिनेल.
काही वर्षांपूर्वी तिथल्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिम जमातींशी संपर्क साधू पाहणाऱ्या एका अमेरिकन मिशनरीचा इथे खू*न करण्यात आला होता. हे बेट बंगालच्या उपसागरातील दुर्गम बेट. बाहेरच्या लोकांसाठी तसे प्रवेश करण्यास कठीणच. त्या पार्श्वभूमीवर तिथे गेलेला अमेरिकन मिशनरी तिथल्या स्थानिकांना उपरा, शत्रू वाटला आणि त्यांनी त्याला थेट यमसदनाला धाडले. मात्र या निमित्ताने सेंटिनेली बेटाच्या शिकारी आणि आदिम जीवन कंठणाऱ्या भटक्या रहिवाशांच्या भवितव्याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, अंदमान आणि निकोबार बेटांचा कारभार सांभाळणाऱ्या भारत सरकारने या सेंटिनेल लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली.
(१९७० च्या दशकात अंदमानवर नॅशनल जिओग्राफिक चॅनेलने एक डॉक्युमेंटरी बनवायला घेतली होती. त्यावेळी त्या लघुपटाचा दिग्दर्शक चित्रीकरण करताना या आदिवासी लोकांच्या तावडीत सापडला होता. त्यावेळी त्या लोकांनी त्याच्यावर भाल्याने ह*ल्ला चढवत त्याला जखमी केले होते).
या आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे सरकारचे बहुतेक प्रयत्न अयशस्वी ठरले. यात एकदाच अंधुकसा आशेचा किरण दिसला तो १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला. त्यावेळी मानववंशशास्त्रीय सर्वेक्षणासाठी मानववंशशास्त्रज्ञांचा समावेश असलेला चमू या बेटाच्या दौऱ्यावर होता. या चमूकडून सेंटिनेलीजनी त्यांनी देऊ केलेले नारळ स्वीकारले. इतिहासात असे पहिल्यांदाच घडत होते.
कुणा परक्या माणसांशी प्रथमच कुठल्यातरी स्वरूपाची देवाणघेवाण झाली होती. ही नवीन संवादाची नांदी होती का? नक्की काय झाले होते त्यावेळी? आणि याचे श्रेय एका महिलेला जाते हे तुम्हाला माहिती आहे का?
मधुमाला चट्टोपाध्याय ही त्या मानववंशशास्त्रज्ञांच्या टीममध्ये असलेली एकमेव महिला होती. अंदमान आणि निकोबार बेटांवरील जमातींचा अभ्यास करायचा असे तिचे अगदी लहानपणापासूनचे स्वप्न होते. पुढे एक प्रौढ मानववंशशास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी तब्बल सहा वर्षे संशोधन केले आणि कालांतराने या विषयावर २० रीसर्च पेपर्स तसेच ट्राइब्ज ऑफ कार निकोबार हे पुस्तक प्रकाशित केले.
Anthropological Survey of India (AnSI) या संस्थेत पीएच.डी. फेलो या नात्याने चट्टोपाध्याय यांना जानेवारी १९९१ साली नॉर्थ सेंटिनेलला जाणाऱ्या टीममध्ये सामील होण्याची संधी मिळाली. पहिलीवहिली संधी! कित्येक दिवसांपासून उराशी बाळगलेले स्वप्न साकार होणार होते. पण यात एक मेख होती: बेटांवरील “त्या” (शत्रुपक्षातल्या) जमातींशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी तयार केल्या गेलेल्या गटांमध्ये स्त्रियांचा समावेश नव्हता. हे म्हणजे काशीला जाऊन विश्वेश्वराचे दर्शन न घेण्याचाच प्रकार होता.
मधुमाला चट्टोपाध्याय यांनी मग कंबर कसली. त्यांनी, “मला संबंधित सर्व धोक्यांबद्दल माहिती आहे आणि कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्यास त्याबद्दल मी सरकारकडून नुकसान भरपाईचा दावा करणार नाही.” असे लेखी दिले. त्यांच्या आईवडिलांनाही तसेच लिहून द्यावे लागले.
अखेरीस आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या. एक अडथळा पार झाला आणि चट्टोपाध्याय यांचा सेंटिनेलीजशी संपर्क साधण्याचा मार्ग मोकळा झाला. एवढेच नाही तर त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करू शकणाऱ्या मधुमाला या पहिल्या महिला मानववंशशास्त्रज्ञ बनल्या. पण हे सगळे कसे घडून आले?
तरंगते नारळ
चट्टोपाध्याय म्हणतात, “जानेवारी १९९१ च्या मोहिमेदरम्यान आम्ही सर्वजण जरा घाबरलो होतो. याचे कारण काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने पाठवलेल्या टीमला नेहमीच्या शत्रुत्वाचा सामना करावा लागला होता.” तिचा गट एका छोट्याशा बोटीने बेटाजवळ आला. त्याच वेळी हातात धनुष्यबाण घेऊन ह*ल्ला करण्यासाठी सज्ज असलेली काही सेंटिनेली माणसं किनाऱ्याकडे गेली.
मधुमाला यांच्या टीमने त्या आदिवासी लोकांना देण्यासाठी पाण्यात काही नारळ सोडले. तेव्हा चक्क काही सेंटिनेली हे तरंगणारे नारळ गोळा करण्यासाठी पाण्याकडे धावले. ही आश्चर्यकारक गोष्ट होती. हे अद्भुत होते!
त्यानंतरच्या दोन ते तीन तासांत, सेंटिनेली पुरुष वारंवार समुद्रकिनाऱ्यावरून पाण्यात जात होते, नारळ गोळा करत होते, आणि परत येत होते. हे नारळ म्हणजे त्यांच्यासाठी एक अनोखी चीज होती. अशी गोष्ट जी त्यांच्या बेटावर पैदा होत नव्हती. स्त्रिया आणि मुले त्यांना नारळ गोळा करताना दुरून पाहत होती. तरीही त्यांच्या चमूवर ह*ल्ला होण्याचा धोका अजूनही कायम होता.
सुमारे १९-२० वर्षांचा एक तरुण मुलगा समुद्रकिनाऱ्यावर एका स्त्रीबरोबर उभा होता. त्याने अचानक आपले धनुष्य उंचावले. उपस्थित लोकांचा श्वास अडकला. त्यावेळी पूर्वी त्या भागातल्या इतर जमातींबरोबर काम करताना शिकलेले काही शब्द मधुमाला यांच्या मदतीला आले. त्यांनी त्यांना ओरडून नारळ गोळा करायला सांगितले. मग त्या बाईने त्या मुलाला एक धक्का दिला आणि त्याचा बाण पाण्यावर पडला. त्या बाईच्या सांगण्यावरून तोही पाण्यात आला आणि नारळ उचलायला लागला. नंतर त्या लोकांची भीड थोडी चेपली.
त्यांच्यापैकी काही आदिवासींनी थोडे पुढे येऊन बोटीला स्पर्श केला. जणू ते आता या वेगळ्या दिसणाऱ्या शत्रूला घाबरत नव्हते. त्यांच्यातली दरी जशी कमी होऊ लागली होती. तरी ती पूर्ण मिटली नव्हती. कारण मानववंशशास्त्रज्ञांची टीम किनाऱ्यावर आली, पण जमातीच्या कोणीही त्यांना आपल्या वस्तीत नेले नाही.
एका महिन्यानंतर मधुमाला अजून मोठ्या टीमबरोबर येथे परत आल्या. यावेळी टीम मोठी होती कारण प्रशासनाला टीममधल्या सर्व सदस्यांना सेंटिनेलीजची ओळख करून द्यायची होती. सेंटिनेलीजनी या टीमला जवळ येताना पाहिलं आणि त्यांच्या शस्त्रांशिवाय ते या लोकांना भेटायला आले. यावेळी फक्त तरंगते नारळ गोळा करण्यावर संतुष्ट न होता सेंटिनेलीज नारळाची संपूर्ण पिशवी घेण्यासाठी टीमच्या बोटीत चढला. ते जवळ आल्याची अजून एक खूण!
पोलिसांची राय*फल ही धातूचा तुकडा असल्याचा त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी तो उचलण्याचा प्रयत्न केला. मग टीममधल्या एका सदस्याने एका सेंटिनेली माणसाने घातलेला पानांपासून बनवलेला दागिना घेण्याचा प्रयत्न केला. तो माणूस रागावला आणि त्याने एकदम आपला चाकूच बाहेर काढला. नंतर त्याने टीमच्या सदस्यांना ताबडतोब निघा म्हणून इशारा दिला आणि तेही निघाले.
वाईट हवामानामुळे तिसऱ्या वेळची मोहीम रहित झाली आणि ती काही महिन्यांनंतर पार पडली. समुद्रकिनाऱ्यावर कोणीही नव्हते आणि टीमचे सदस्य कोणालाही न भेटता परत गेले. त्यानंतर, प्रवाशांना नॉर्थ सेंटिनेल बेटाला वारंवार भेट देण्यापासून रोखण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. ज्याविरुद्ध त्यांची प्रतिकारशक्ती विकसित झालेली नव्हती अशा रोगांपासून रहिवाशांचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले.
सध्या मधुमाला भारताच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात कार्यरत आहेत. गेल्या १९ वर्षांत त्या अंदमान आणि निकोबारला गेलेल्या नाहीत आणि नॉर्थ सेंटिनेलला जाण्यात तर त्यांना बिलकुल स्वारस्य नाही. “तिथल्या जमाती शतकानुशतके कोणतीही अडचण न येता बेटांवर राहत आहेत. बाहेरच्या लोकांशी संपर्क आल्यानंतर त्यांच्या अडचणी सुरू झाल्या,” असे त्यांचे मत आहे.
वास्तविक बेटांवरील जमातींना त्यांचे संरक्षण करण्यासाठी बाहेरच्या लोकांना गरजच नाही, ते एकटे हे काम करण्यास सक्षम आहेत हेही खरेच. बाहेरील लोकांचा हस्तक्षेप म्हणजे त्यांच्या वैभवशाली परंपरांचा अस्त होण्याची नांदी असेच त्यांना आजही वाटते.
तुमचे काय मत आहे?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.