आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारतातील अध्यात्मिक तत्त्वज्ञान आणि नैसर्गिक चमत्कार यांचे आकर्षण भारताबाहेरील लोकांनाही आहे. इथल्या आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आणि निसर्गाने घडवलेले चमत्कार पाहण्यासाठी कितीतरी परदेशी लोक दरवर्षी भारताला भेट देतात. आपली समृद्ध सांस्कृतिक विविधता या आकर्षणात अजूनच भर टाकत असते.
नैसर्गिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक विविधतेने नटलेले भारतातील मेघालय हेही असेच एक राज्य आहे, जे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या राज्यात नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.
इथले एक वैशिष्ट्य, ज्याचे पर्यटकांना मोठे आकर्षण असते ते म्हणजे इथल्या ओढ्या-नदी-नाल्यावर असलेले झाडांच्या मुळापासून तयार झालेले नैसर्गिक पूल. ज्यांना इथले नागरिक ‘जिवंत पूल’ अशी संज्ञा वापरतात.
वडाच्या, पिंपळाच्या पारंब्या म्हणजे त्यांची मुळेच असतात. ही मुळे झाडाच्या खोडाकडून जमिनीकडे वाढतात. ही मुळे पुन्हा जमिनीत रुजतात आणि तिथे पुन्हा एक नवे रोप उगवते. वड, पिंपळ ही दीर्घायुषी झाडे आहेत. एकेका झाडाचे आयुष्य शंभर वर्षाहूनही जास्त असते. या झाडांचा घेरही मोठा असतो आणि यांची मुळेही जमिनीत खोलवर पसरलेली असल्याने मजबूत असतात.
ओढा किंवा नदीच्या, दरीच्या एका काठावर जरी असे मोठे वडाचे किंवा पिंपळाचे झाड असेल तर त्याच्या पारंब्या दुसऱ्या टोकापर्यंत न्यायाच्या आणि तिथल्या मातीत गाढायच्या, अशा एकेक पारंब्या दुसऱ्या बाजूला नेल्या की मधल्या जागेत खूप साऱ्या पारंब्यांचा गठ्ठा तयार व्हायचा. या मधल्या जागेत एकत्र आलेल्या पारंब्यांना पुन्हा बारीक फट फुटून ती छोटी-छोटी बारीक मुळे पुन्हा एकमेकांत गुंफली जातात. त्यांची एक उभी आडवी वीण तयार होते.
पारंब्यांचा एक जाडजूड पूल आपसूकच तयार होतो. ज्यावरून एकावेळी आरामात दहा-पंधरा जण ये-जा करू शकतात. कधी कधी एकाच ठिकाणी एकाच झाडापासून दोन पूल तयार केले जातात. याला डबल डेकर पूल म्हटले जाते. यामुळे एका पुलावरून दहा जण आणि दुसऱ्या पुलावरूनही तितकेच लोक एकावेळी ये-जा करतात. काही ठिकाणी ट्रिपल डेकरही असतात. पण घनदाट जंगलात असे पूल क्वचितच सापडतात.
मेघालयात आणि ईशान्य भारतात अनेक ठिकाणी असे नैसर्गिक पूल तयार केलेले आढळून येतात. हे पूल मजबूतही असतात. पण, एक पूल तयार व्हायला कमीत-कमी दहा ते तीस वर्षे लागतात.
त्यानंतरही पुलाची वाढ होतच राहते. त्यामुळे जितका काळ जाईल तितका पूल आणखी मजबूत होत जातो. निसर्गतः तयार होत असला तरी यासाठी मानवी कष्ट हे लागतातच. त्या पारंब्यांना किंवा मुळांना हातांनी दिशा द्यावी लागते. त्या मुळांना ज्या दिशेला वळवले जाईल त्या दिशेला ती वळतात. यासाठी सातत्याने मुळांच्या वाढीवर लक्ष ठेवावे लागते.
खोल दरीवर तयार करण्यात आलेल्या अशा जिवंत पुलावरून जाण्यासाठी अनेक ट्रेकर उत्सुक असतात. या टोकापासून त्या टोकापर्यंत अशा झुलत्या पुलावरून जाणे म्हणजे एखाद्या ॲडव्हेंचरपेक्षा कमी नाही. एकीकडे हे पूल मजबूत वाटत असले तरी त्यावर पावसाचे पाणी वगैरे पडून शेवाळ साचलेले असते. त्यामुळे पाय सटकण्याची जास्त शक्यता असते. जास्त खोल दरी असलेल्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला भीती वाटू शकते. म्हणूनच उंच ठिकाणी जाण्यास भीती वाटते किंवा कमजोर मनाच्या व्यक्तींना अशा ठिकाणी पुलावर जाऊ दिले जात नाही.
मेघालयातील आणखी एक आकर्षण म्हणजे मॉलनॉंग गाव. आशियातील सर्वांत स्वच्छ गाव म्हणून या गावाला ओळखले जाते. भारतासारख्या देशात आशियातील सर्वांत स्वच्छ गाव असणे म्हणजे थोडे कुतूहल वाटणारच, पण मेघालयाची राजधानी शिलॉंग असून १०० किमी अंतरावर, उंच डोंगरात हे गाव वसलेले आहे.
२००३ साली या गावाला आशिया खंडातील सर्वांत स्वच्छ गाव असल्याचा पुरस्कार मिळाला होता. या गावातील परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक असावा यासाठी या गावातील नागरिक विशेष प्रयत्न करतात. याठिकाणी सर्वांत जास्त जिवंत पूल आढळतात आणि ट्रेकिंग करण्यासाठी हे पूल एकमद परफेक्ट असल्याचे मानले जाते. ट्रेकसोबतच इथे आजूबाजूचा परिसर हिरवळीने दाटलेला आणि एकदम स्वच्छ असल्याचे पाहायला मिळेल. या गावाला देवाची बाग असेही म्हटले जाते. इडन गार्डनच्या धरतीवर या गावाला हे नाव देण्यात आले आहे.
हे जिवंत पूल तयार करण्यात विशेषत: खासी आणि जैंतिया या आदिवासी समाजातील लोकांचा खूप मोठा वाटा आहे. ज्याकाळी पूल बांधण्याचे कोणतेच तंत्र अस्तित्वात नव्हते त्याकाळापासून या परिसरात असे जिवंत पूल बांधले जात आहेत.
इथे अगदी चारशे ते पाचशे वर्षे जुने पूल देखील आढळले आहेत. दोन डोंगरांना जोडण्यासाठी त्यांना हे तंत्र उपयोगी पडत असे. जुन्या काळातील असे जिवंत पूल आजही तेथे पाहायला मिळतात.
यातील अनेक पूल खूप वर्षांपूर्वीचे असले तरी त्याबद्दल कोणत्याही प्रकारची लिखित माहिती आढळत नाही. त्यामुळे स्थानिक लोकांनाही या जिवंत पुलाच्या इतिहासाबाबत फारशी माहिती नाही. १८०० सालापासून अशा पुलांची नोंद ठेवण्यात येऊ लागली. निसर्गाच्या या अद्भुत शक्तीचा शोध लावून त्याचा अशाप्रकारे वापर करण्याची पद्धत कुणी आणि कधी शोधून काढली याबाबत आजही कसलीही माहिती मिळालेली नाही.
खासी आणि जैंतिया जमातीच्या लोकांच्या दाव्यानुसार त्यांच्याच पूर्वजांनी अशा प्रकारच्या तंत्राचा शोध लावला आहे. ओढे, नाले आणि नद्या जेव्हा पावसाळ्याच्या दिवसात पूर्ण क्षमतेने भरून वाहत असतात तेव्हा या पुलाच्या सहाय्यानेच ते पार केले जातात. आजही या पुलांशिवाय इथल्या जंगलात अशा दऱ्या, नदी, ओढे पार करण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय नाही.
वड, पिंपळ याशिवाय अशा प्रकारचा पूल तयार करण्यासाठी काही ठिकाणी रबराच्या झाडाच्या मुळांचाही उपयोग केला जातो. पायनुर्सला या गावात अशा प्रकारचा सर्वात मोठा पूल आढळतो, जो ५० मीटर लांबीचा आहे. या जिवंत पुलांनी भारतीय मिथकांत, पुराण कथेत आणि साहित्यातही विशेष स्थान पटकावले आहे.
मेघालयाला भेट देणारे पर्यटक आवर्जून या जिवंत पुलांना भेट देतात. त्यावरून ये-जा करतात आणि काही धाडसी पर्यटक या पुलावरून ट्रेकिंगही करतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.