आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताच्या स्वातंत्र्यता संग्रामात आणि जडणघडणीत अनेक लोकांनी आपले अमूल्य योगदान दिले आहे. ज्यात पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही नावे प्रामुख्याने घेतली जातात. पण या बरोबरच अनेक नेते असे होते ज्यांनी या कार्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती, भारताच्या विकासासाठी त्यांच्याजवळ व्यापक दृष्टिकोन होता, अशाच नेत्यांपैकी एक होते तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री सी. राजगोपालाचारी.
सी. राजगोपालचारी यांचा जन्म तामिळनाडूच्या कृष्णानगरी जिल्ह्यातील थोरापल्ली या गावी १० डिसेंबर १८७८ रोजी झाला. पुढे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचंड पगडा असल्यामुळे ते सदैव काँग्रेसच्या विविध आंदोलनात सहभागी असत. रौलट कायदा, असहकार चळवळ, वायकोमचा अस्पृश्यांचा मंदिर प्रवेशासाठीचा सत्याग्रह, अशा वेगवेगळ्या जनआंदोलनात ते सहभागी झाले होते. यातूनच पुढे ते राजकारणात सक्रिय झाले. पुढे लोक त्यांना ‘राजाजी’ या नावाने संबोधू लागले.
पेशाने वकील असलेल्या राजाजींनी ब्रिटिश सरकारच्या काळात काँग्रेसकडून निवडणुका लढवल्या. ते मद्रासच्या प्रांतिक मंडळावर निवडून गेले. त्यांनी मद्रास प्रांताचे मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांनी बंगाल प्रांताचे गव्हर्नर म्हणून देखील कार्यभार सांभाळला होता.
माउंटबॅटननंतर ते भारताचे व्हाइसरॉय झाले. ते पद भूषविणारे ते एकमेव भारतीय होते.
अशा दीर्घ राजकीय कारकिर्दीत राजाजी ओळखले गेले ते त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि विलक्षण निर्णयक्षमतेमुळे!
१९४० साली जेव्हा दुसऱ्या महायु*द्धात ब्रिटन सहभागी झाला होता आणि मोहम्मद अली जिनांनी वेगळ्या पाकिस्तानचा घाट घातला. तेव्हा राजाजींनी दूरदृष्टीने जिनांच्या वेगळ्या पाकिस्तानच्या मागणी समर्थन दिलं होतं. मुस्लिमांसाठी वेगळं राष्ट्र निर्माण करू द्यावं, यासाठी ते आग्रही होते.
पण महात्मा गांधींपासून इतर सर्वच काँग्रेस नेते त्यावेळी हिंदू-मुस्लिम एकतेच्या माध्यमातून अखंड भारतासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे राजाजींना काँग्रेसमधून हद्दपार करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील राजजींवर टीकास्त्र सोडले. परंतु १९४७ साली राजाजींनी सांगितल्याप्रमाणेच देशाची फाळणी झाली आणि पाकिस्तान अस्तित्वात आले. राजाजींनी पूर्वीच वेगळ्या पाकिस्तानची गरज ओळखली होती, हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक होते.
राजाजी यांची जेव्हा फाळणीच्या काळात बंगाल प्रांताचे गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी बिहार आणि झारखंडला पश्चिम बंगाल यांना जोडण्याचा घाट घातला होता. यावेळी राजाजींना प्रखर विरोध झाला. सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधू सरतचंद्र बोस यांनी राजजींचा तीव्र विरोध केला होता.
राजाजी १९३९ साली तत्कालीन मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘मंदिर प्रवेश वटहुकूम’ आणला होता, ज्यामुळे सर्व जातीतील लोकांना मंदिरात प्रवेश देणे बंधनकारक करण्यात आले होते.
राजाजींनी गांधीवादाला आदर्शवत मानून आपलं जीवन व्यतित केलेलं असलं तरी त्यांनी आपला वैचारिक स्वतंत्रपणा सदैव जपला होता.
भारत स्वातंत्र्य झाल्यावर त्यांनी नेहरूंना १९५१ साली कम्युनिस्ट चीनच्या विस्तारवादी धोरणांची कल्पना दिली होती, पण नेहरूंनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे आणि नेहरूंनी स्वीकारलेल्या समाजवादी धोरणांनी भारताचे कल्याण होणार नाही, हे लक्षात आल्यामुळे पुढे त्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली होती.
१९५२ साली ते तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी हिंदी भाषा तमिळनाडूवर लादली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि ते जातीय शिक्षणाचा पुरस्कार करत आहेत असं म्हणून त्यांना तमिळी लोकांनी प्रचंड विरोध केला. पुढे त्यांनी १९५४ साली मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
१९५९ साली राजगोपालचारींनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली, स्वतंत्र पक्ष आणि त्याची ध्येय धोरणे दोन्ही प्रगतिशील होते. स्वतंत्र भारतात आर्थिक उदारमतवादाचा पहिला पुरस्कार केला तो राजाजींनी, त्यांचे इतर समकालीन नेते जेव्हा समाजवादाच्या पगड्याखाली वावरत होते तेव्हा राजाजी उद्योगसंपन्न भारताचे स्वप्न बघत होते.
त्यांनी मिनिमम गव्हर्नमेन्ट आणि मॅक्सिमम गव्हर्ननन्सचं तत्त्व त्याकाळी अंगिकारलं होतं, ज्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ साली केला.
राजाजींनी सांगितलेल्या आर्थिक उदारमतवादी भूमिकेला भारताने १९९१ साली अंगिकारलं आणि भारताची औद्योगिक क्षेत्रात प्रगती झाली.
राजाजींनी १९६० साली स्वराज्य नावाच्या मुखपत्रात पाकिस्तानसोबतच्या सीमावादावर काही महत्वपूर्ण टिप्पणे केले होते. ज्याचा उपयोग पुढे जाऊन २००३ साली भारत पाकिस्तान सीजफायर करताना झाल्याची आठवण तत्कलिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नोंदवली होती. यावरून राजाजींचा, अभ्यासाचा आणि भविष्यकालीन परिस्थितीचा वेध घेणाऱ्या व्यापक राजकीय दृष्टिकोनाचा अंदाज येतो.
राजाजी तमिळनाडू असो वा भारताचे राजकारण, प्रत्येकवेळी भूमिकेवर ठाम असत, त्यांची व त्यांच्या पक्षाची श्रीमंत व उच्च वर्णियांचा पक्ष म्हणून सदैव विडंबना झाली तरी शेवटपर्यंत त्यांनी आपली भूमिका बदलली नाही, यामुळे त्यांना राजकीय यश मात्र मिळवता आलं नाही. पण त्यांच्या धोरणांनी भविष्यात यश मिळवलं हे मात्र निर्विवाद सत्य आहे.
राजाजी जसे राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते तसेच ते एक उत्तम साहित्यिक व लेखक ही होते.
महात्मा गांधींच्या ‘यंग इंडिया’ या वृत्तपत्राचे ते संपादक होते.
त्यांनी तमिळ भाषेत रामायण आणि महाभारत भाषांतरित केले. त्यांनी लिहलेल्या रामायणावर आधारित चक्रवर्ती थिरुमगन या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार १९५८ साली देण्यात आला.
त्यांनी १९१५ साली विज्ञान, इतिहास, तत्वज्ञान या विषयांची पुस्तके तमिळमध्ये भाषांतरीत केली होती. ते भारती विद्या भवन या भारतीय तत्वज्ञानाचा व संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या शाळेच्या संस्थापक मंडळाचे सदस्य होते.
राजाजींचे आपल्या विरोधकांशी प्रचंड मैत्रीपूर्ण संबंध होते. नेहरू आणि अण्णादुराई तसेच डॉ. आंबेडकर यांच्याशी वाद असून ही त्यांनी मैत्रीचा ऋणानुबंध जपला. त्यांनी एक जबाबदार व संयमी विरोधक कसा असावा याचे उदाहरण घालून दिले. राजाजी हे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून सर्वांना प्रिय होते. टोकाचे मतभेद असूनही रामस्वामी पेरियारांच्या ते खूप निकटचे होते. त्यांनी शेवटपर्यंत अंगिकारलेला गांधीवाद त्यागला नाही.
त्यांना १९५४ साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राजाजींचे २५ डिसेंबर १९७२ साली वयाच्या ९४ वर्षी निधन झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.