आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
लंडनच्या हायकोर्टात एक निकाल देण्यात आला असून त्यानुसार हैदराबादच्या निजामाकडून पाकिस्तानला देण्यात आलेली रक्कम त्यांना भारताला परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा किस्सा हैद्राबादच्या सातव्या निजामाशी संबंधित असून हा निजाम जगभरात आपल्या श्रीमंती थाटासाठी प्रसिद्ध होता.
एक किस्सा असा देखील आहे की एकदा १९६५ च्या यु*द्धावेळी या निजामाने भारतीय सैन्याच्या फंडाला ५००० किलो सोने दान केले होते. परंतु हा किस्सा खरा आहे की नाही, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असून अनेकांच्या मते हा निजाम फार कंजूष होता, त्यामुळे त्याने इतकी मोठी मदत भारताला केली असेल याची शक्यता कमीच आहे.
हैद्राबादची निजामाची राजवट ब्रिटीश काळात सर्वात श्रीमंत राजवट होती. या निजामाकडे शेकडो कोटींची धन दौलत होती. मीर उस्मान अली खान हा या राजवटीचा शेवटचा निजाम होता. तो जितका श्रीमंत होता तितका कंजूष होता, त्याला नमवून सरदार पटेलांनी हैद्राबाद संस्थान खालसा केले होते. भारतात समाविष्ट झाल्यानंतर देखील या निजामाकडे अमाप संपत्ती होती.
ज्यावेळी १९६५ यु*द्ध सुरु होते त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. सरकारजवळील धनाचे स्त्रोत्र आटले होते, त्यावेळी लाल बहादूर शास्त्रींच्या सांगण्यावरून या निजामाने भारतीय सैन्याला आर्थिक मदत केली होती.
पण या मदतीचा आकडा किती होता यावर अनेक तर्क लावले जातात. एका आख्यायिकेनुसार या निजामाने भारतीय सैन्याला ५००० किलो सोने दान केले होते, पण याबाबत अनेक इतिहासकरांमध्ये दुमत होते.
काही दिवसांपूर्वी याच प्रकरणावर एक माहितीच्या अधिकारांतर्गत याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत निजामाने दान केलेल्या सोन्याचा आकडा खरंच ५००० किलो इतका होता का? यावर सरकारकडून उत्तर मागवण्यात आले होते.
ज्यावेळी १९६५चे यु*द्ध झाले त्यावेळी तत्कलीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी भारतभर दौरा केला होता, यावेळी त्यांनी देशाच्या नागरिकांना सेनेसाठी तयार करण्यात आलेल्या सहायता फंडात दान करण्याची विनंती केली होती. ते हैद्राबादला जाऊन निजामाला देखील भेटले होते.
यु*द्धानंतर अर्थव्यवस्था पार रखडली गेली होती, अशावेळी कुठल्याही बाजूने मदत उभी करणे हे लाल बहादूर शास्त्रींच्या समोरील एक मोठे आव्हान होते. त्यावेळी हैद्राबादचा निजाम जगातील सर्वात श्रींमंत व्यक्तींपैकी एक होता, त्याने यु*द्धावेळी सहायता फंडाट अनेक पेट्या सोने दान केले होते, असे म्हटले जाते.
पण माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार हे असत्य असून त्याने कुठलंही सोनं भारतीय सैन्यासाठी दान केले नव्हते.
५००० किलो सोने दान केल्याचा आकडा देखील खोटा असून वास्तविक पाहता निजामाने फक्त ४२५ किलो सोने हे दान न करता राष्ट्रीय स्वर्ण योजनेत गुंतवले होते, यासाठी त्याला ६.५ टक्के व्याज मिळत होते.
११ डिसेंबर १९६५ च्या एका वृत्तपत्रातील बातमीनुसार पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ज्यावेळी हैद्राबाद विमानतळावर पोहचले, त्यावेळी म्हतारा झालेला निजाम त्यांना भेटायला आला होता. त्याने पंतप्रधानांचे स्वागत करून त्यांची भेट घेतली होती. त्याच्या भेटीनंतर एका जाहीर सभेत लाल बहादूर शास्त्रीजी म्हणाले होते की निजामाने भारत सरकारच्या गोल्ड स्कीममध्ये ४.२५ लाख ग्राम सोने गुंतवले असून त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, असे म्हटले होते.
निजामाने गुंतवलेल्या सोन्यात अनेक सोन्याच्या मोहरा होत्या, त्या सोन्याची शुद्धता तपासण्यात आली नव्हती. पण सरासरी नुसार त्या सोन्याची किंमत ५० लाख रुपये इतकी होती, असे शास्त्रींचे मत होते. शास्त्री त्या सोन्याला परदेशात विकणार होते.
एकीकडे निजामाने सैन्यासाठी सोने दिले हे खोटं सिद्ध झालं असलं तरी आंध्रप्रदेशातून एक संस्था आणि एक तेलगु अभिनेता होता, ज्यांनी भारतीय सैन्याच्या फंडाला आर्थिक मदत केली होती. ती संस्था होती तिरुमला तिरुपती देवस्थान होय, तिरुपती देवस्थानाने भारत सरकारला १२५ तोळे सोने दान केले होते, तर तेलगु अभिनेत्याने ८ लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.