आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
भारत हा शौर्य पराक्रम आणि साहसाची परंपरा असणारा देश आहे. इथल्या मातीत जगजेत्त्यांना पाणी पाजणारे महापराक्रमी वीर जन्माला आले. इथल्या स्त्रियांनी देखील वेळ प्रसंगी हातात तलवार घेऊन रणांगण गाजवले आहे. वीरता आणि शौर्याची अनेक उदाहरणे भारतीय इतिहासाच्या पानापानांत सापडतील.
आपल्या सैनिकांच्या पराक्रमाच्या कथा ऐकून तर आपली छाती अभिमानाने भरून येते. पाकिस्तान असो वा चीन आपल्या शत्रूंसोबत झालेल्या लढाईत भारतीय सैन्याने आपल्या पराक्रमाचा अनेकदा पुरावा दिलेला आहे. भारतीय सैन्यांशी उघडपणे पंगा घेणे शक्य नसल्यानेच पाकिस्तान, घुसखोर आणि दहशतवाद्यांच्या सहाय्याने भारतात अशांतता माजवण्याचा प्रयत्न करत असतो.
अर्थात केवळ पाकिस्तानच नाही तर भारतीय सैन्याने चीनच्या सैन्याला देखील पराजित करून आपली ताकद दाखवली आहे. शिवाय पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक देशांना भारतीय सैन्याने मदत केली आहे.
स्वातंत्र्य मिळण्याआधीही भारतीय सैन्याने कित्येक मोठी युद्धे लढली आहेत. इराक, बर्मा, मलय, हॉंगकॉंग, कोरिया, जपान आणि युरोप, पॅलेस्टाईन, इस्राईल अशा अनेक देशाच्या युद्धात भारतीय सैन्याने योगदान दिले आहे. इस्राईलमधील हाईफा शहरातील युद्धात भारतीयांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल आजही इस्राईलचे नागरिक कृतज्ञता व्यक्त करतात.
भारतात सैन्याच्या तुकडीच्या वेगवेगळ्या रेजिमेंट्स आहेत. गोरखा रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट, मराठा रेजिमेंट या सगळ्या रेजिमेंटचे लक्ष्य शत्रूला भारताच्या सीमेवरच अडवून देशाची सुरक्षितता आणि शांतता अबाधित ठेवणे हेच आहे.
आज आपण माहिती घेणार आहोत सैन्यातील अशाच एका रेजिमेंटची. कुमाऊ रेजिमेंट!
कुमाऊ रेजिमेंट निडर वृत्ती आणि पराक्रमासाठी प्रसिद्ध आहे. कुमाऊ रेजिमेंटची स्थापना ब्रिटीश काळात १८व्या शतकात झाली. इंग्रजांनी भारतात आपला विस्तार केला होता. त्यावेळी कुमाऊवर हल्ला झाला. तेंव्हा ब्रिटीश निवासी सर हेन्री रसेल यांनी हैद्राबाद रेजिमेंट वसवली. कुमाऊ रेजिमेंटची मुळे याच हैद्राबाद रेजिमेंटमध्येच आहे.
१७९४मध्ये या रेजिमेंटचे नाव रेमंट कोर होते. कुमाऊ रेजिमेंट हा तब्बल वीस वर्षे तरी हैद्राबाद रेजिमेंटचाच भाग होता. कुमाऊ रेजिमेंट, हैद्राबाद रेजिमेंट यांनी मिळून कितीतरी महत्वाच्या लढाईत सहभाग घेतला.
नंतर याचे नाव बदलले आणि निजाम रेजिमेंट ठेवण्यात आले. १९०३मध्ये ही रेजिमेंट भारतीय सैन्य दलाचा भाग बनली. २७ ऑक्टोबर, १९४५ रोजी याचे नाव बदलून कुमाऊ रेजिमेंट करण्यात आले.
हातात क्रॉस धरलेला वाघ हे कुमाऊ रेजिमेंटचे निशाण आहे. वाघ हा सगळ्यात बेडर प्राणी आणि जंगलाचा राजा मनाला जातो. म्हणूनच कुमाऊ रेजिमेंटचे अधिकृत चिन्ह वाघ आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीसुद्धा कुमाऊ रेजिमेंटच्या जवानांनी अनेक यु*द्धांत आपले शौर्य गाजवले आणि आपल्या प्राणांची आहुती देखील दिली आहे. आंग्ल-नेपाळ यु*द्धात या रेजिमेंटने गोरखा आणि इंग्रजांच्या वतीने भाग घेतला. १९व्या शतकाच्या सुरुवातीला या रेजिमेंटने इस्ट इंडिया कंपनीसाठी लढाईत सहभाग घेतला.
पर्यटन, धार्मिक स्थळ आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लढाऊ आणि धाडसी सैनिकांना लढाईचे प्रशिक्षण देणे. डोंगर दऱ्यांची राणी म्हणून ओळख असणाऱ्या रानीखेतमध्ये कुमाऊ रेजिमेंटचे मुख्यालय आहे.
कुमाऊ रेजिमेंटच्या जवानांना इथेच कठोर प्रशिक्षण दिले जाते. डोंगर दऱ्यात वसलेल्या या मुख्यालयात सीमेवर भारताचे रक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात येते आणि सुरक्षेतील सर्व बारीकसारीक धडे शिकवण्यात येतात. याठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सैनिकाला देशाच्या विविध भागात सेवेसाठी पाठवण्यात येते. या ठिकाणी हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसारख्या सपाट प्रदेशातून येणाऱ्या सैनिकांना देखील प्रशिक्षण दिले जाते.
भारतीय सैन्यातील सर्वात जुन्या रेजिमेंटमध्ये कुमाऊ रेजिमेंटचा समावेश होतो. भारतीय सेनेचे नाव अजरामर करणाऱ्या कित्येक लढायांमध्ये या रेजिमेंटने योगदान दिले आहे.
भारताचा पहिला परमवीर चक्र विजेता सैनिक याच रेजिमेंटने दिला होता. तसेच भारताचे तीन भूदल प्रमुख याच रेजिमेंटमधले आहेत. पाकिस्तानी सेनेला धूळ चारत सियाचीनच्या बर्फाळ डोंगरावर भारतीय सैन्याने तिरंगा फडकवला तो दिवस कुणीही विसरू शकणार नाही.
१३ एप्रिल, १९८४ रोजी भारताचे पाकिस्तानी सैन्याला हरवून काश्मीरच्या सियाचीनसारख्या अतिदुर्गम आणि भयानक थंड तापमान असणाऱ्या सियाचीनसारख्या खडतर प्रदेशात विजय मिळवला होता.
या ऑपरेशनला ऑपरेशन मेघदूत या नावाने ओळखले जाते. सियाचीनसारख्या बर्फाळ शिखरावर मिळवलेला हा विजय ऐतिहासिक विजय होता.
सियाचीन ग्लेशियर हे जगातील सर्वात उंच युद्ध क्षेत्र आहे. कुमाऊ रेजिमेंटने ऑपरेशन मेघदूतला सुरुवात केली आणि सियाचीन ग्लेशियरच्या परिसरातून शत्रूला पळवून लावले. कुमाऊ रेजिमेंट म्हणजे भारताच्या मुकुटातील एक हिरा आहे. जितका जुना इतिहास तितकीच त्यांनी चमक.
या रेजिमेंटमधील सोमनाथ शर्मा म्हणजे या रेजिमेंटच्या मुकुटातील हिरा आहेत. मेजर सोमनाथ शर्मा यांनी आपले नाव इतिहासाच्या सोनेरी पानावर कोरले आहे. सोमनाथ शर्मा हे पहिले परमवीर चक्र प्राप्त भारतीय सैनिक आहेत. त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
परमवीर चक्र हा भारतीय सैन्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारी कुमाऊ रेजिमेंट ही देखील पहिली रेजिमेंट आहे. मेजर सोमनाथ शर्मा यांनी बडगाम क्षेत्रातच शत्रूला रोखून धरले. यासाठी त्यांनी आपल्या जीवाची देखील बाजी लावली.
भारतीय सैन्यातील प्रत्येक रेजिमेंटची एक स्वतंत्र घोषणा किंवा नारा आहे. कुमाऊ रेजिमेंटचा नारा आहे – “पराक्रमो विजयते”. याचा अर्थ होतो पराक्रमी वीराचा विजय असो. काश्मीरच्या बडगामपासून कुमाऊ रेजिमेंटने आपल्या शौर्याचा आणि पुरस्काराचा इतिहास रचला. त्यानंतर या रेजिमेंटला असे कित्येक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
१९६२ साली चीन सोबत झालेल्या यु*द्धातदेखील कुमाऊ रेजिमेंटच्या चार्ली कंपनीने चीनी सैनिकांना सळो की पळो करून सोडले. या सैन्य तुकडीचे मेजर शैतान सिंग यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.
कुमाऊ रेजिमेंटला आतापर्यंत २ परमवीर चक्र, १३ महावीर चक्र, ८२ वीर चक्र, ४ अशोक चक्र, १० कीर्ती चक्र, ४३ शौर्य चक्र, ६ युद्ध सेवा पदक, १४पेक्षा जास्त परम विशिष्ट सेवा पदक, ३२पेक्षा जास्त अतिविशिष्ट सेवा पदक, ६९पेक्षा जास्त विशिष्ट सेवा पदक आणि एक अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय रेजिमेंटला दोन पद्म भूषण पुरस्कार देखील मिळाले आहेत.
गेल्या २२५ वर्षापासून देश सेवेत रत असलेल्या या रेजिमेंटच्या २१पेक्षा जास्त बटालियन आहेत. देशाच्या विविध भागात या बटालियन आपली सेवा बजावत आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.