आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आजवर अनेक दंतकथांमध्ये आपण शाप, वरदान यांसारख्या संकल्पना वाचल्या आणि ऐकल्या असतील. या संकल्पनांबद्दल आपल्या मनात अनेकदा प्रश्नचिन्हही उपस्थित झालं असेल, पण या जगामध्ये अशी एक शापित वस्तू उपलब्ध आहे, ज्या वस्तूने वेळोवेळी शाप ही संकल्पना खरोखरंच अस्तित्वात असल्याचं सिद्ध केलंय. ही कोणतीही साधी गोष्ट नसून एक अतिशय मौल्यवान खजिना आहे. तो म्हणजे सुमारे ७९८ कॅरेट्सचा कोहिनूर हिरा.
श्री कृष्ण चरित्र अर्थात भागवत् आणि विष्णू पुराणामध्ये ‘श्यामन्तक मणी’ म्हणून वर्णन आलेल्या या हिऱ्याचा उल्लेख पुराण पोथ्यांनंतर थेट ४ हजार वर्षांनी आढळतो. १३०४ साली हा हिरा माळव्याच्या राजेरजवाड्यांकडे होता आणि अद्याप या हिऱ्याला कोह-ए-नूर हे नाव मिळाले नव्हते. इसवी सन १३०४ साली हा हिरा अलाउद्दीन खिलजीने लुटला.
१३०६ सालच्या हिंदी भाषेतील एका लिखित वर्णनानुसार, याच कालखंडात हा एक शापित हिरा म्हणून प्रसिद्ध झाला. ‘जो कोणी या हिऱ्याचा मालक असेल तो जग जिंकू शकेल पण जगातील संपूर्ण दुर्दैव त्याच्याच वाटेला येईल. फक्त देव आणि स्त्रियाच या शापापासून मुक्त आहेत.’ असा या हिऱ्याला शाप होता.
इसवी सन १३३९ साली या हिऱ्याला समरकंद येथे नेण्यात आले. पुढच्या दोनशे ते अडीचशे वर्षांत हा हिरा तुघलक, सयीद आणि लोधी या सत्तांकडे होता. इसवी सन १५२६ साली बाबराने ‘बाबरनामा’ या आपल्या चरित्रात्मक ग्रंथामध्ये हिऱ्याचा उल्लेख केला आहे. सुलतान इब्राहिम लोधीने त्याला हा हिरा ‘नजराणा’ म्हणून दिला होता.
बाबरने या हिऱ्याची किंमत तत्कालीन जगाच्या उत्पन्नाच्या निम्मी असल्याचं सांगितलं होतं. बाबर हा हिरा आपल्या येणाऱ्या पिढ्यांकडे देत राहिला. शाहजहानने तो हिरा आपल्या सिंहासनामध्ये लावला आणि काही वर्षांतच मुघल साम्राज्याचा कारभार त्याच्या तिसऱ्या मुलाकडे अर्थात औरंगजेबाकडे गेला. सुरुवातीच्या काळात औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल साम्राज्य बहरलं होतं. पण औरंगजेबाच्या शेवटच्या कालावधीमध्ये त्याला दख्खनेत तब्बल २७ वर्षांचं यु*द्ध लढावं लागलं आणि तिथूनच मुघल साम्राज्याचा ऱ्हास सुरु झाला.
१७३९ साली नादिर शाहने दिल्लीवर आक्र*मण करून मुघल सम्राटाचा सपाटून पराभव केला आणि दिल्लीची प्रचंड लूट केली. या लुटीमध्ये नादीर शहाला हा हिरा सापडला आणि त्याने या हिऱ्याला पाहताच उद्गार काढले ‘कोह-ए-नूर’ अर्थात ‘प्रकाशाचा डोंगर’. त्यानंतर हा हिरा पर्शियामध्ये अर्थात सध्याच्या इराणमध्ये गेला. १७४७ साली नादीर शहाच्या साम्राज्यात फूट पडली आणि तो मारला गेला. कोहिनूरला नादीर शहानंतर त्याच्या पुढच्या पिढ्यांकडे देण्यात आले. त्याचे उत्तराधिकारीदेखील अंतर्गत संघर्षामुळे उ*द्ध्वस्त झाले.
पुढे यु*द्धादरम्यान हा हिरा अफगाणिस्तानचा राजा अहमदशहा अब्दालीकडे आला. पानिपतच्या तिसऱ्या यु*द्धानंतर अब्दालीच्या राज्यातही प्रचंड अस्थिरता आणि अंतर्गत कलह निर्माण झाले. अब्दालीचा नातू आणि तिमूर शहा दुर्राणीचा मुलगा शहा शूजा दुर्राणीने हा हिरा महाराजा रणजितसिंग यांना दिला. त्याबदल्यात शहा शूजा दुर्राणीला मिळाले अफगणिस्तान!
१८३९ साली महाराजा रणजितसिंग यांच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने अंतर्गत फूट पाडण्यात आली आणि अवघ्या तीन लढायांमध्ये शीख साम्राज्याचा अंत झाला. १८४९ साली कोहिनूर हिरा ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या हाती लागला, पण १८५७ च्या स्वातंत्र्य समराने कंपनीचे न भूतो न भविष्यती असे प्रचंड नुकसान झाले. भारताचा तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर-जनरल डलहौसीच्या मदतीने ब्रिटीश राजघराण्याने कोहिनूर हिरा ताब्यात घेतला.
१८५१ साली दुलदीप सिंग यांच्या हस्ते ब्रिटनच्या राणीला कोहिनूर हिरा देण्यात येईल अशी योजना डलहौसीने केली. त्याप्रमाणे लंडनमधील हायड पार्कमध्ये ब्रिटिश लोकांना कोहिनूर दाखवण्यासाठी एक मोठे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामुळे सन १८५१ पासून कोहिनूर ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. १८५२ साली प्रिन्स अल्बर्टने कोहिनूर हिऱ्याचा आकार १८६ कॅरेट्सवरून कमी करून १०५ कॅरेट्सचे करण्याची आज्ञा दिली. राणी व्हिक्टोरिया अधूनमधून कोहिनूर हिरा परिधान करत असे.
कोहिनूर फक्त स्त्री राणीने परिधान केला पाहिजे असे राणी व्हिक्टोरियाने आपल्या मृत्यूपत्रात लिहिले. जर राज्याचा प्रमुख पुरुष असेल तर त्याची पत्नी हा हिरा परिधान करू शकते. राणी व्हिक्टोरियाच्या मृत्यूनंतर, कोहिनूर हिरा ब्रिटिश राजघराण्याच्या मुकुटाचा भाग बनला. आजही कोहिनूर हिरा कोणताही पुरुष परिधान करीत नाही.
कोहिनूर हिरा भारताच्या समृद्धपणाचे एक प्रतीक आहे. किंबहुना प्राचीन काळातील भारताच्या सर्वांगीण विकासाची ती एक झलकच म्हणावी लागेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.