आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आज फेसबुक माहिती नाही असा माणूस खचितच सापडेल. कायमच विवादित असलेल्या फेसबुकच्या युजर्सची संख्या सतत वाढतेच आहे. एवढ्या मोठ्या संख्येत वापरकर्ते असल्यामुळे फेसबुक ॲप्लिकेशनला व्यवस्थितपणे कार्यरत ठेवण्यासाठी फेसबुकने एक मोठी टीम नेमली आहे. या टीमच्या सदस्यांची संख्या ही हजाराच्या घरात आहे. हे तंत्रज्ञ कोण आहेत आणि कसे दिसतात याची आपल्याला माहिती देखील नसते पण हे लोक आपल्या फेसबुक वापराला अधिक उपयोगी बनवत असतात.
याच टीममध्ये काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या कीर्तीगा रेड्डी यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर आज फेसबुकमध्ये मोठ्या पदापर्यंत मजल मारली आहे. भारतात फेसबुकची वाढ होण्यास आणि त्याचा सर्वदूर प्रसार होण्यात कीर्तिगा रेड्डी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. असंख्य अडचणींवर मात करून कीर्तिगा यांनी हे यश मिळवले आहे.
जुलै २०१० साली कीर्तिगा रेड्डी यांची फेसबुक इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांची निवड झाल्यावर त्यांचे नाव सर्वत्र चर्चेत आले होते.
कीर्तिगा यांचा जन्म १९७२ मध्ये चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील हे सरकारी कर्मचारी होते. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढल्यामुळे त्यांचे राहणीमान अत्यंत सामान्य होते. लहानपणापासून त्यांच्याजवळ असामान्य प्रतिभा होती. आपल्या बरोबरीच्या मित्र मैत्रिणींसोबत खेळण्याच्या वयात त्या पुस्तकात डोके घालून बसायच्या.
मुंबईच्या महात्मा गांधी मिशन इंजिनीअरिंग कॉलेजमधून त्यांनी कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. सिरॅक्स युनिव्हर्सिटीतुन त्यांनी कॉम्प्युटर सायन्सच्या क्षेत्रात उच्चशिक्षण घेतले.
त्यांनी १९९५ साली आपले शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीच्या शोधात लागल्या. त्यांनी आपला पहिला जॉब सिलिकॉन ग्राफिक्स या कंपनीत केला. याठिकाणी त्यांनी ६ वर्षे काम केले. चांगला पगार आणि जॉब सिक्युरिटी असली तरी त्या सतत नवनवीन संधीच्या शोधात होत्या. याच काळात त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाचा घाट घातला. कीर्तिगा यांनी लग्नाला होकार दिला पण एक अट ठेवली. त्यांचा नवऱ्याने त्यांच्या करियरमध्ये कुठलाच अडथळा आणायचा नाही. देव नावाच्या एका मुलाने त्यांच्या अटी मान्य केल्या आणि दोघे विवाहबद्ध झाले. विवाहानंतर दोघेही अमेरिकेतच स्थायिक झाले.
याकाळात कीर्तिगा यांनी मोटोरोला, गुड टेक्नोलॉजी, फोनेक्स टेक्नोलॉजी इत्यादी नामांकित कंपन्यांत नोकरी केली. त्यांच्या कौशल्याने प्रभावित होऊन फेसबुकने त्यांच्यावर एक मोठी धुरा सोपविली. कीर्तिगा यांना संपूर्ण भारताच्या फेसबुकचा इन्चार्ज म्हणून नेमण्यात आले. कीर्तिगासोबतच त्यावेळी तिथे अनेक पुरुषांनी या नोकरीसाठी अर्ज केला होता.
पण या सर्वांना नाकारून कीर्तिगा यांची या आव्हानात्मक कामासाठी नेमणूक करण्यात आली होती. कीर्तिगा यांना त्यावेळी अनेकांनी टोमणे मारले. अनेक लोक त्यांना म्हणाले की महिला कधीच एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी हाताळु शकणार नाही. पण कीर्तिगा यांनी सर्वांचे म्हणणे खोटे ठरवून दाखवले.
कीर्तिगा यांची निवड फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी केली होती, यामुळे त्यांच्यावर इतरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याला काहीच अर्थ नव्हता. आपल्या स्टाफशी जुळवून घेण्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागली होती.
कीर्तिगाने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर जगातील टॉप ५० महिलांमध्ये स्थान पटकावले होते. ज्यावेळी कीर्तिगा यांच्या हातात भारताच्या फेसबुकची धुरा आली, त्यावेळी त्यांनी फेसबुकला सोशल मीडिया पुरता मर्यादित न ठेवता, त्याला व्यवसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक मोठ्या ब्रँडसला जोडण्याचा प्रयत्न केले.
२०१३ साली फेसबुकला अनेक मोठ्या कंपन्यांनी तसेच स्टार्टअप्सने जाहिराती दिल्या. फेसबुक जाहिरातींसाठी एक अतिशय उपयोगी माध्यम म्हणून उदयास आले. यामुळे फेसबुकला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला. कीर्तिगा म्हणतात त्यांचा फेसबुकचा प्रवास सोपा नव्हता. भारतात आल्यावर ज्यावेळी त्या पहिल्यांदा ऑफिसला गेल्या, त्यावेळी वॉचमन वगळता दुसरे कोणीच नव्हते. त्यांनी स्वतः ऑफिसचे शटर उघडले होते.
कीर्तिगा म्हणतात की, स्त्री असो की पुरुष जोवर परिवाराची साथ लाभत नाही. तोपर्यंत आयुष्यात प्रगती करणे कठीण असते. कीर्तिगा यांच्या पतीने त्यांना खूप साथ दिली. कामाचा व्याप जास्त असल्याने बऱ्याचदा कीर्तिगा उशिरा घरी यायच्या, त्यावेळी त्यांचे पती देव हे त्यांना घरकामात मदत करायचे. ऑफिसला जाण्यापासून परत येईपर्यंत सर्वच गोष्टींची काळजी देव घ्यायचे. तणावाच्या परिस्थितीत ते कायमच कीर्तिगा यांना चिअर करण्याचा प्रयत्न करायचे.
ज्यावेळी कीर्तिगा यांना फेसबुक इंडियाची जबाबदारी मिळाली, त्यावेळी त्या गर्भवती होत्या. यामुळेच त्यावेळी लोक त्या काम करू शकणार नाही असे म्हणत होते. पण कीर्तिगा यांनी हार मानली नाही. या काळात त्यांच्या नवऱ्याने कधीच त्यांना एकटं सोडलं नव्हतं. आज कीर्तिगा यांना दोन मुलं आहेत. कीर्तिगा यांनी एक पत्नी आणि आई म्हणून आपली जबाबदारी तितक्याच यशस्वीपणे पार पाडली आहे.
कीर्तिगा आपल्या कठोर निर्णयक्षमतेसाठी ओळखल्या जातात. २०१० ते २०१६ या काळात त्यांनी फेसबुकची कमान सांभाळली होती. परंतु २०१७मधे त्यांनी अमेरिकेत परतण्याचा निर्णय घेतला. हे सर्व त्यावेळी घडत होते, जेव्हा फेसबुकचे आणि ‘ट्राय’चे भारतात फ्री बेसिक्स प्रोग्रॅमवरून वाद सुरु होते.
कीर्तिगा यांच्या निर्णयाने मार्क झुकरबर्ग यांना मोठा धक्का बसला होता. कीर्तिगा या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खंद्या पुरस्कर्त्या आहेत. त्यांचा काही धोरणांना विरोध होता त्यामुळे त्या अमेरिकेला परतल्या आणि त्या तिथे फेसबुकच्या मुख्यालयात काम करू लागल्या. त्या तिथे ग्लोबल क्लायंट पार्टनर आणि इमर्जिंग मार्केट ऑब्झर्व्हर या पदावर कार्यरत होत्या.
कीर्तिगा यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते की त्यांना भारतात काम करून मोठा आनंद मिळाला कारण भारत त्यांची मातृभूमी आहे. कीर्तिगा मानतात, फेसबुकमध्ये महिलांना कामाची संधी देताना कुठलाच दुजाभाव केला जात नाही, म्हणूनच त्या इतक्या यशस्वी होऊ शकल्या आहेत.
कीर्तिगा रेड्डी खऱ्या अर्थाने एक प्रेरणादायी व्यक्ती आहेत. संकटांना न घाबरता त्यांचा सामना करून स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या प्रत्येक मुलींसाठी त्या एक आदर्श आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.