आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सुपरस्टार यशच्या वाढदिवसानिमित्त केजीएफ सिनेमाचं टीजर प्रदर्शित झालं होतं.अवघ्या ४८ तासांत १०० मिलियन्स व्ह्यूज घेऊन हा व्हिडीओ युट्युबवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
त्यावेळी तुलनेने छोट्या असणाऱ्या दाक्षिणात्य स्टारने नवख्या दिग्दर्शकाला घेऊन दोन भागात येणारा एवढा हाय बजेट सिनेमा करणं याकडे फार प्रेक्षकांचं लक्ष गेलं नव्हतं. त्यात सिनेमाची तयारी बाहुबलीच्या आधीच सुरू झालेली असली तरी हा रिलीज बाहुबली नंतर झाला. त्यामुळे बाहुबली नंतर “असाच दोन भागात येणारा फायटिंगवाला साऊथ इंडियन मुव्ही येणारच” या धारणेमुळे सिनेमाबद्दल फार काही वातावरण निर्मिती झाली नव्हती. युट्युबवरसुद्धा दोन छोटेखानी व्हिडीओज सोडून फार मार्केटिंग झालं नव्हतं.
त्यात शाहरुख खानचा झिरो त्याच विकेंडला रिलीज झाला होता. त्यामुळे प्रेक्षकांचा सगळा विकेंड शाहरुखकडून पुन्हा एकदा निराश होऊन परतण्यात गेला. पण विकेंडनंतर ‘वर्ड ऑफ माऊथ’ पब्लिसिटीमुळे प्रेक्षकांचा ओघ वाढला आणि सिनेमा हाऊसफुल्ल होऊ लागला. पण फॅनबेस तयार झाला तो हा सिनेमा थिएटरमधून गेल्यावर मोबाईल आणि लॅपटॉपवर बघूनच.
यातल्या बारकाव्यांमुळे आणि स्पीडमुळे या सिनेमाला रिपीट व्ह्यूवर्स खूप आहेत. पुन्हापुन्हा बघूनही सगळ्या खाचखळग्या समजल्यात असं वाटत नाही, एवढी ही गोष्ट गुंतागुंतीची आहे. “केजीएफ नेमका एवढा ग्रेट सिनेमा का आहे ?” एका टिपिकल दाक्षिणात्य मारधाड सिनेमाला हे वेगळेपण कुठल्या गोष्टींनी दिलं?
१. मूळ कथा
सामान्यतः भारतीय चित्रपटाच्या कथेत दोन हाय पाँईट असतात. एक इन्टर्व्हलला आणि दुसरा क्लायमॅक्सला. सुरुवातीलाच मूळ बलस्थान, प्रेरणा या अधोरेखित केलेल्या असतात. केजीएफच्या बाबतीत मात्र या चौकटी तोडून लेखकाने कथा सांगण्याच्या पद्धतीत काही धाडसी बदल केले आहेत.
मुळ केजीएफची कथा आणि रॉकी यांचा संबंध येण्याच्या आधीच रॉकीचं पात्र नीट उभारायला कथा दिलावर, मुंबई, शेट्टी असे तीन वळणं घेऊन पुढे जाते. रॉकीवर दबाव टाकणारा शेट्टी अँड्र्यूव्हच्या डोक्यावर छत्री धरायला पळत जातो. रॉकी बँगलोरला गेल्यावर पुढचं पॉवर सेंटर राजेंद्र देसाई समोर येतं आणि या सगळ्यातून इंटरव्हल होईपर्यंत “गरुडा”ची जरब आपल्याला कळते. इथून पुढे येणारे वानरम, गार्डस आणि नराचीचा अभेद्य किल्ला या सगळ्या गोष्टी पावलोपावली सिनेमातली बलस्थान बदलत राहतात.
आपला हिरो त्या सगळ्या मजुरांमध्ये खूपच वेगळा दिसत असतो. त्याचा गोरा वर्ण, उंची या सगळ्यांतून त्याचं वेगळेपण बघता त्याच्यावर संशय घेण साहजिक होतं. पण आपण कथेत आतापर्यंत आपण एवढे गुंगलेले असतो की ही साधी गोष्ट आपल्या डोक्यात पण येत नाही. या सगळ्याची मूळ प्रेरणा गरुडाला मारणे, श्रीमंत होणे पासून तर आईला दिलेलं वचन पूर्ण करणे इथपर्यंत मागे जाते, यामुळे या सगळ्या मारधाडीला एक न संपणार कारण मिळतं, अगदी एकट्यानेच भांडायचंही कारण यात स्पष्ट होतं.
२. कास्टिंग
यात केजीएफशी संबंधित असणारे सगळे लोक जवळपास एकसारखे दिसतात. उंच, दाढी, लांब केस. मूळ हिरो, व्हिलन गरुडा, राजेंद्र देसाई, वानरम, गार्ड्स अशा एवढ्या सगळ्या सारख्या लोकांना शोधण्यासाठी कास्टिंग टीमला विशेष पुरस्कार दिला गेला पाहिजे. यामुळे हिरो आणि व्हिलन हे एका पातळीचे पात्र वाटायला लागतात. हिरोने व्हिलनला मारणं तितकसं सहाजिक वाटत नाही. मुळात ८० कोटी बजेट असणाऱ्या कथेत यशसारख्या कमी ओळखीच्या हिरोला घेणे हाच एक खूप धाडसी निर्णय आहे. पण यशचा साजेसा अभिनय, देहबोली यामुळे त्याला नेहमीसाठी “रॉकी भाय” याच नावाने ओळखल जाईल असं वाटतंय.
यशचा बॉडीगार्ड “राम राजू” याची निवड दिग्दर्शकाने “गरुडा” या पात्रासाठी केली. चित्रपटात रॉकीच्या तुलनेने गरुडाचं पात्रही लोकांना आवडलं. सोबतच वेशभूषेतही एक समानपणा जपला गेला आहे. कथा, बजेट, प्रोड्युसर ऐकून कुठलाही बॉलीवूडचा स्टार हा सिनेमा करायला तयार झाला असता पण तरीही निर्मात्यांनी या धाडसी कास्टिंगवर विश्वास ठेवला, यामुळे आपल्याला ही पात्र याप्रकारे बघता आली.
३. ॲक्शन, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, कलर पॅलेट, म्युजिक
याआधी भारतात बाहुबली, जोधा अकबर, रॉकस्टार, रंग दे बसंती, आर्टिकल 15 असे काही मोजके सिनेमे सोडले तर दुसरं कोणी कलर पॅलेट इतक्या खुबिने वापरलंय हे आठवत नाही. स्क्रीनवर दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या रंगातील सारखेपण किंवा गरजेप्रमाणे एखादा विशेष मूड सेट करायला रंगाशी खेळणे, विरुद्ध बाजू दाखवायला रंगात केलेले बदल या सगळ्या गोष्टी कथानकाचा भाग म्हणून वापरणे याला मी “कलर पॅलेटिंग” मध्ये मोजतोय.
केजीएफ मधल्या ॲक्शनचं वेगळेपण असं की मूळ मारधाडीला स्लोमोशनमध्ये दाखवण्याची जुनी पद्धत सोडून फक्त मारधाडीचे परिणाम यात जास्त दाखवले गेलेत, आणि त्यातून त्याबद्दलची दह*शत अधोरेखित केली गेली आहे. इथे सिनेमॅटोग्राफीला एडिटिंगपासून वेगळं करता येऊ शकत नाही. सबंध चित्रपटभर अर्ध्या-एक सेकंदच स्क्रीनवर दिसणारे सुंदर सुंदर दृश्य नीट दिसायच्या आधीच जेव्हा नजरेआड होतात तेव्हा असं वाटत की एडिटर शेजारी बसून सांगत असेल, “हां. बस झालं अर्धा सेकंद, आता अँगल बदला”. असं नसेल केलं गेलं तर किमान अडीच तासाचा सिनेमा कट करायला एडिटरला ‘रॉ कट’च चार तासाचा बनवावा लागला असेल.
सिनेमाची स्पीड बघता दिग्दर्शकापेक्षा एडिटरलाच जास्त श्रेय द्यावसं वाटतं. शेवटचा गुहेतला सीन तर निव्वळ कमाल आहे. एवढ्या कमी उजेडात क्लायमॅक्स शूट करत असताना कॅमेराच्या मागे ते तंत्र कोळून पिलेला माणूसच लागतो. खूप उच्च पातळीची तांत्रिक टीम असणं पुरेसं नसतं, तर कलात्मक दृष्टी असणारा लीडर हे तंत्र कसं वापरतोय यावर परिणाम ठरत असतो. यामुळेच शाहरुख खानचा रावण, प्रभासचा साहो हे सिनेमे तांत्रिक बाबतीत सरस असतानाही चालले नाही.
केजीएफचं म्युझिक हे भारतीयाने बनवलंय असं वाटतच नाही, या तुलनेचं दुसरं कुठलं भारतीय बॅकग्राउंड म्युजिक शोधायला बराच विचार करावा लागेल.
मुळातच दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतल्या कथा, तांत्रिक कामातलं त्यांचं कौशल्य हे इतर भारतीय कलाकारांपेक्षा सरस आहेच. उगाच त्यांचे चांगले सिनेमे घेऊन त्याचे वाईट रिमेक बनविण्यापेक्षा त्यांचेच सिनेमे डब करून भारतभर रीलीज करण्याची ही योजना त्यांच्या प्रगतीसाठी खूप गरजेची आहे. मोठा प्रेक्षकवर्ग असल्याने वाढणारं बजेट आणि आत्मविश्वास यातून जास्त चांगल्या कलाकृती मिळतील हे नक्की.
फरहान अख्तर आणि रितेश सिध्वानी यांचं “एक्सेल इंटरटेन्मेंट” सुरुवातीपासूनच आगळ्यावेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करून भारतातल्या सिनेमाचा प्रवाहच बदलत आहेत. दिल चाहता है, रॉक ऑन ,डॉन २, फुक्रे, गली बॉय, मिर्झापूर या सगळ्याच प्रोजेक्ट्नी आतापर्यंत मूळ ट्रेंड बदलत नवीन ट्रेंड्स आणले आहेत.
सगळ्या प्रोडक्शन कंपन्या ऐतिहासिक सिनेमे बनविण्याच्या घाईत असताना एक्सेलने अशा अतरंगी कथेत रस दाखवलाय. त्यांनी या तुलनेने कमी अनुभव असलेल्या टीमच्या पाठीशी उभं रहायचा निर्णय घेतला आणि त्यामुळे “केजिएफ” ला पाहिजे असणारी भारतभर प्रसिद्धी मिळाली.
अशी केजीएफ इतकीच केजीएफ विषयीची गोष्ट पण खूप रंजक आहे. समीक्षेच्या दृष्टीने बघितलं तर तांत्रिक बाबीत आणि परिणामातही बाहुबलीच्या जवळ जाणारा अजून एक ग्रेट ऍक्शन-थ्रिलर आपल्याला मिळालाय हे नक्की. टिपिकल अवास्तव मारधाड असणं यासाठी काही गुण कमी केले पाहिजेत पण मूळ परिणामात यामुळे अडथळा निर्माण होत नाही. इन्फिनिटी वॉर सारख्या टिपिकल कमर्शियल सिनेमाला सुद्धा स्पेशल इफेक्टससाठी ऑस्कर नामांकन मिळालंच होतं. जर ‘केजीएफ’ला असं वेगळं करून बघितलं तर भारतातले सगळे तांत्रिक क्षेत्रातले पुरस्कार केजीएफलाच द्यावेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.