आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
रामाच्या विजयात रावणावर अन्याय झाला असेल तर? चतुर कृष्णाने सो कॉल्ड धर्माचं राज्य आणायला पांडवांच्या मदतीने कौरवांवर अन्याय केला असेल तर? स्वातंत्र्य मिळालेल्या समाजात स्वाभिमानाने जगण्याच्या न्यूनतम गरजेसाठी कायदा मोडला जात असेल तर? वरवर योग्य वाटणाऱ्या गोष्टींना असं आपण आपलाच दृष्टिकोन बदलून बघितलं तर? तर आपण साजरं करतो ते सोयीस्कर सत्य बाजूला पडेल आणि दिसेल तो आपला सत्य बघण्याचा दुटप्पी चष्मा.
त्यातून काय दिसतं तर घटनेत नसलेल्या सामाजिक बंधनात अडकलेल्या गटाने विद्रोह केला तर? तर आपण त्याला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला (रिव्हेन्ज) न म्हणता त्यांचा असभ्यपणा (savage) म्हणतो. ज्यांच्या जिवंत राहण्याच्या संघर्षालाही मान मिळत नाही तिथं कर्णन तलवार घेऊन उभा राहतो. त्याची पिढी संघर्षात गेली तरी तिथून पुढच्या पिढीला तो वर बघायला शिकवतो, स्वाभिमानाने जगायला शिकवतो. हे दाखवायला दिग्दर्शकाने असंख्य रुपकांच्या मदतीने भाकडकथांकडे आणि पर्यायाने त्यातून निर्माण झालेल्या आपल्या मूल्यव्यवस्थेकडे बघायला ही सव्वादोन तासांची संधी दिली आहे.
दिग्दर्शक मारी सेलव्हाराज आणि अभिनेता धनुष यांनी असा काही इंटेन्सली जड, तात्विक गोंधळ घालणारा “सोशल इशूजवरचा सिनेमा” प्रथेप्रमाणे स्लो बर्न, बोरिंग न करता एकदम मेनस्ट्रीम मसाला पद्धतीने सादर केलाय. मांडणी जरी मनोरंजक असली तरी त्यातला कंटेंट खूप गंभीर आहे.
मुळातच असलेलं दारिद्र्य आणि त्यात भर घालायला सामाजिक अन्याय अशा परिस्थितीत दिवस ढकलणारं एक गाव या सिनेमाचं केंद्र आहे. कच्च्या घरात राहणारे, डुकरांचा व्यवसायातून, तुटपुंज्या शेतीतून पोटापुरतं कमवून खाणाऱ्या लोकांची ही वस्ती. त्यांचा स्वाभिमान एवढा चिरडला गेलाय की त्यांचा देवसुद्धा बिना मस्तकाचा आहे. स्वाभिमान आणि जीवाची भीती यात ते नेहमी भीती निवडून जगत असतात. या सगळ्यातून तत्वतः आणि शब्दशः बाहेर पडायला त्यांच्या गावात बसही येत नसते. रस्ताच नसतो. शेजारच्या गावात बस पकडायला जावं तर तिथले लोक यांच्याशी भांडतात. या सगळ्यात आठ वर्ष मानकरी न मिळाल्याने तशीच असलेली गावातली पारंपरिक तलवार बाळगण्याचा मान आपल्या हिरोला (धनुष) मिळतो, त्यांचं नाव कर्णन.
रोजरोजच्या बसच्या वादातुन होणारं भांडण, रोजगार मिळविण्यासाठीचा संघर्ष, सततचा भेदभाव, यातून कर्णनचा वाढत जाणारा राग त्याच्या सामाजिक बंधनाच्या दोऱ्या कमकुवत करत असतो. त्याच्या आत धुमसणारी चीड आणि हतबलता दाखवायला एका गाढवाचं रूपक घेतलं आहे. त्याच्या पायाला बांधलेली दोरी फक्त त्याचा मालक सोडू शकत असतो, पण कर्णन ती दोरी आणि स्वतःचेही बंधनं ठेचून तोडतो. इथून पुढे होणाऱ्या संघर्षाची आणि त्यातून उघड्या पडणाऱ्या आपल्या समाजव्यवस्थेची ही गोष्ट.
चित्रपटाच्या पहिल्याच सीनमधे एक लहान मुलगी रस्त्याच्या मधोमध फिट येऊन पडलेली असते, बसेस तिच्या दोन्ही बाजूने जातात पण कोणीही थांबत नाही. ही कर्णनची बहीण असते. ती आणि अशा कित्येक हतबल निरपराध मृतांच्या आत्मा कर्णनकडे आशेने बघत असतात. मुखवटे घातलेली लहान मुलं टेकडीवरून गावाकडे बघातानाचे सिन या कथेला एक दैवीपणा देतात.
अंगणातून कोंबडीचं पिल्लू उचलून नेणारी दुष्ट घार, स्वातंत्र्याचं-विजयाचं प्रतीक असणारा घोडा, गाढव, कुत्रे, अशा बऱ्याच प्राणांचा समावेश रुपकांतून कथा सजवायला केला आहे. सुरुवातीला होणाऱ्या स्पर्धेतून हाच आपला हिरो, सेव्हीअर, नायक आहे हे सिद्ध होतं. ही गोष्ट सांगण्याची पारंपरिक चौकट आहे, अगदी अलेक्झांडरपासून तर अर्जुनापर्यंत.
पण कर्ण वेगळा आहे. त्याचा जन्म राजकुळात झाला असला तरी तो वाढला सामान्य लोकांमधे. त्यालाही वर्गसंघर्ष सोसावा लागला, पण त्याने स्वतःच्या जिद्दीनं आपलं हक्काचं स्थान मिळवलं. तो युद्धात सर्वश्रेष्ठ होता पण तरी त्याला हरावं लागलं. जगात फक्त एकाच माणसाने त्याला स्नेह दिलं तो म्हणजे दुर्योधन. त्या दुर्योधनालाही तो वाचवू शकला नाही.
तसंच आपल्या सिनेमातला कर्णन सगळं जिंकूनही मित्र दुर्योधनाच्या मृत्यूने आतून हरलेला असतो. दोन्ही गोष्टीत (महाभारत आणि हा सिनेमा) कर्णाची चूक एवढीच की तो चुकीच्या (?) बाजूने होता. आपल्या नायकालाही सैन्यातून पत्र येतं पण तो जात नाही आणि कर्णसुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या बाजूने लढत नाही. पण नेमकी कोणती बाजू बरोबर आणि कोणती चुकीची हे महाभारताच्या मांडणीत सरळसरळ हे करणं म्हणजे “धर्म” ही संज्ञा लावून ठरवलं गेलं. वास्तवात मात्र हे तितकंसं सोपं नाही.
तुमचा जीव, स्वाभिमान जपायला जर व्यवस्थेने तुमच्याकडे कायदा मोडायला काही पर्यायच सोडला नसेल तर? तर केलेला अधर्म, मोडलेला कायदा बरोबर की चूक हे कसं ठरवणार? त्यामुळं इथे कर्णन कौरवांच्या बाजूने असला तरी ही बाजू चुकीची (अधर्माची) आहे असं म्हणता येत नाही. इथे दुर्योधनाचा युद्धात वध होत नाही तर हतबलतेने आत्महत्या होते. या संघर्षात कायदा आणि थोरांनी केलेली शिकवण कशी डावलावी लागते हे एका मारधाडीत डगमगणाऱ्या आंबेडकरांच्या फ्रेममधून कळतं. अशाप्रकारे लेखकाने महाभारत, पारंपरिक गोष्टीची ठेवण आणि कायदा तोडणाऱ्या क्रांतीला एका वेगळ्या दृष्टीने सादर केलं आहे. यातून आपल्याला पडणारे प्रश्न विचारांती आपल्याच मूल्यांना समृद्ध करतील इतकं हे प्रभावशाली आहे.
गंभीर गोष्ट आणि रंजक मांडणी असली तरी सादरीकरणात सगळं वास्तववादी आहे. यातलं काहीच खरं असू नये अशी भीती आपल्याला वाटत असते पण ते जास्तच खरं वाटावं यावर भर दिलाय. झोपड्या बाहेरची घाण, कपडे, नावं, रोमान्सपासून तर फायटिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट वास्तववादी आहे.
उगाच हिरो आहे आणि हातात तलवार आहे म्हणून कित्येक लोकांना कापत सुटलाय असं नाहीए. ही मर्यादा ठेवूनही हिरोगीरीने हाय पॉईंट गाठणं हे ऐकायला जितकं अशक्य वाटतं तितकंच बघायला सुंदर. सिनेमॅटोग्राफरने हिरोचं हे रिअल असणं मिड शॉट्समधून साकारलंय. कॅमेरा पात्रांना मोठं किंवा छोटं करत नाही पण त्यांच्यातली हिम्मत दाखवत राहतो.
सुरुवातीला येणारं गाणं तर लूप वर ऐकावं इतकं मस्त आहे. क्लायमॅक्सनंतर आपण पुन्हा गाणं बघावं इतकं ते त्या सगळ्या सिनेमाचा सार असल्यासारखा फील देतं.
माझ्या स्मरणात धनुष हा एकटाच असा अभिनेता दिसतोय की ज्याला सुपरस्टार आणि कॅरॅक्टर ऍक्टर या दोन्ही जबाबदाऱ्या समान कौशल्याने सांभाळता येतात, आणि त्याला त्या शोभतातही. मार खाणारा, रडणारा पण हिम्मत न हरणारा हिरो, थोडक्यात ते इंजेक्शन टोचण्याआधीचा कॅप्टन अमेरिका म्हणजे आपला धनुष. इतका तो खरा आणि तरी हिरोईक असतो.
खटकणारे मुद्दे नमुद करायचेच झाले तर बाकी पात्रांत नसणारी खोली, आहेत त्या बाजूच्या पात्रांच्या गोष्टी न रंगवण, कारण नसताना टाकलेला रोमान्स अशा काही गोष्टी सांगता येतील.
जातीवाद, वर्ग संघर्षाच्या कथा, या सगळ्या विभागांमध्ये दाक्षिणात्य सिनेमे विषय मांडणीच्या बाबतीत बॉलिवूडपेक्षा खूप पुढे निघून गेलेत. वेट्रीमरण, धनुष, मारी सेलव्हाराज आणि मराठीत नागराज मंजुळे हे समाजाला आणि सिनेमाला गरजेचं असणारं वास्तव स्क्रीनवर आणतायत, ते ही मेनस्ट्रीम मांडणीतून. आसुरण, पेरियरम पेरुमाल, वाडा चेन्नई, फँड्री हे अजून काही असे सिनेमे. यातल्या व्हिज्युअल इम्पॅक्टसाठी जमेल तेवढ्या मोठ्या स्क्रीनवर आणि मोठ्या आवाजात हा सिनेमा बघा. हायली रेकमंडेड.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.