आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
शाळेच्या गणितातील ते गळके हौद, नळ, बादल्या, ते भिंत बांधणारे कामगार यांची उदाहरणे आठवतात? त्या काळात त्या गळक्या हौदांनी आपल्या डोळ्यांतून पाणी काढले आहे. तेव्हा कदाचित अनेकांना काळ-काम-वेगाची ही उदाहरणे कशाला अभ्यासायची? त्याचा पुढे काय उपयोग? असेही प्रश्न पडले असतील. पण त्याचा रोजच्या आयुष्यात बराच उपयोग आहे. जास्त माणसे काम करत असतील तर ते काम लवकर होते यामागे हेच लॉजिक आहे. पण त्यापलीकडेही त्याचे बरेच महत्त्व आहे.
व्यवसाय चालवायचा किंवा विशिष्ट गोष्टीचे उत्पादन करायचे तर अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. अगदी साधीसुधी कामे करतानाही ती वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी व्यवस्थापन करावे लागते. एका चांगल्या व्यवस्थापकाला काळ- काम- वेग यांचे गणित जमणे गरजेचे असते. अगदी साधे उदाहरण; उपलब्ध असलेले लाकूड, मनुष्यबळ आणि वेळ यांची सांगड घालून जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी किती खुर्च्या आणि कपाटे तयार करावीत हा प्रश्न ज्याला सोडवता येईल तो चांगला व्यवस्थापक. या अनुषंगाने उद्योग अभियांत्रिकी हे क्षेत्र उदयाला आले आहे.
निरनिराळ्या प्रकारचे कारखाने, गिरण्या, कार्यालये, रुग्णालये, उपाहारगृहे, निवास भोजनगृहे, विविध वस्तू भांडारे, शेती उद्योग इत्यादींची मुळापासून योजना, स्थापना, भांडवली खर्च, फायदा किती होईल हे सांगणे, होत नसल्यास तो का होत नाही व कसा होईल या सर्व गोष्टींबद्दल मार्गदर्शन करणारे शास्त्र, म्हणजे उद्योग अभियांत्रिकी होय.
दुसऱ्या महायु*द्धानंतर हे आधुनिक तंत्रविज्ञान जन्मास आले. सुरुवातीला उद्योग अभियांत्रिकी ही उत्पादन उद्योगांपुरतीच मर्यादित होती. त्या काळातही कार्यपद्धती, अभियांत्रिकी, कामाचे मापन, नियंत्रण चिकित्सा, वेतन आणि काम यांचा परस्पर संबंध, यंत्रसामग्रीचे नियोजन यांसारख्या गोष्टी विचारात घेतल्या जात असत. पण नंतर काळ, काम, वेग वगैरे मोजण्याच्या साधनांच्या रचनेत आणि कार्यात अनेक सुधारणा झाल्या. त्यामुळे त्यावेळच्या आणि आताच्या कार्यपद्धतीत बराच फरक पडला आहे.
एखाद्या उत्पादन केंद्रात विविध वस्तूंचे उत्पादन करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, कच्च्या मालाची उपलब्धता, स्पर्धेमुळे किंवा अन्य कारणांमुळे वस्तूंच्या किंमतींत होणारे बदल, उत्पादनासाठी वापरावयाच्या यंत्रांची कार्यक्षमता, ती यंत्रे नादुरुस्त होण्याची शक्यता, बाजारपेठेतील चढ उतार (विविध कालखंडात मालाची बदलणारी मागणी) या बाबींचा परस्परांवर काय आणि किती परिणाम होईल हे लक्षात घेऊन किती उत्पादन करायचे हे ठरवावे लागते. अशा परिस्थितीत गणिती प्रतिकृती तयार करून विविध बाबींचे होणारे परिणाम व पर्याप्त उत्पादन काढता येते.
कधीकधी या लाकूड आणि कपाटे यांच्यापेक्षा जास्त गुंतागुंतीच्या प्रश्नांची उकल करावी लागते. उदाहरणार्थ टेलिफोन्सच्या प्रचंड गुंतागुंत असलेल्या जाळ्याचा योग्य वापर करणे किंवा आंतरराष्ट्रीय विमानसेवांचे मार्ग ठरवणे अशा किचकट प्रश्नांची उत्तरे शोधणे लाकूड आणि कपाटे यांच्या उकलीपेक्षा कठीण असते. यासाठी सिम्प्लेक्स मेथडसारख्या पद्धती अस्तित्वात आहेत.
पण जटिल किंवा ज्यात अनेक घटक विचारात घ्यावे लागतात अशा प्रश्नांसाठी सिम्प्लेक्स पद्धत संगणकावरही दीर्घकाळ घेते. यावर उत्तर शोधले आहे मूळचे भारतीय अभियंता व गणितज्ञ असलेल्या डॉ. नरेंद्र करमरकर यांनी. त्यांनी त्यासाठी पूर्णतः नवीन गणिती पद्धत विकसित केली असून ती ‘करमरकर अल्गोरिदम’ म्हणून जगप्रसिद्ध झाली आहे. आज अनेक उद्योग व सेवा क्षेत्रांमध्ये ती वापरली जाते.
नरेंद्र करमरकर यांचा जन्म ग्वाल्हेरचा. त्यांचे शालेय शिक्षण इंदोरला झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजीमधून (आयआयटी), विद्युत अभियांत्रिकी शाखेत बीटेक ही पदवी घेतली. आयआयटीच्या अखिल भारतीय प्रवेश परीक्षेत पहिला क्रमांक आणि पदवी प्राप्त करतानाही भारतातील सर्व आयआयटीमध्ये पहिला क्रमांक, त्यासाठी राष्ट्रपतींचे सुवर्णपदक एवढ्यावरून त्यांच्या बुद्धिमत्तेची कल्पना यावी. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एमएस केले. शिवाय रिचर्ड एम. कार्प यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक विज्ञान विषयात पीएच्.डी. मिळवली.
नंतर त्यांनी अमेरिकेत ए.टी. आणि टी. बेल लॅबोरेटरीमध्ये काम करायला सुरुवात केली. लिनिअर प्रोग्रामिंगसाठी सिम्प्लेक्स मेथड ही अभिजात पद्धत आहे. येथे कार्यरत असताना त्यांनी गणिती प्रश्नांची उकल करण्यासाठीची आपली कार्यपद्धती प्रसिद्ध केली. ती सिम्प्लेक्स मेथड या अस्तित्वात असलेल्या पद्धतीपेक्षा विशेषत: आकाराने प्रचंड मोठ्या प्रश्नांकरता जास्त कार्यक्षम असल्याचेही त्यांनी गणितीरित्या सिद्ध केले. त्याबाबत त्यांनी एक शोधलेख प्रसिद्ध केला. यामुळे त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. ही उकल पद्धत करमरकर अल्गोरिदम या नावाने ओळखली जाते.
अतिशय गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट व महाकाय प्रश्नांसाठी (क्लिष्ट दळणवळणाच्या जाळ्यांचे नियोजन, आंतरराष्ट्रीय विमानसेवा निर्धारित करणे) ही पद्धत अत्यंत उपयोगी ठरली आहे. यामुळे व्यावसायिक आणि धोरणात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया जलद होऊ लागली आहे.
नरेंद्र करमरकर यांनी टाटा समूहासाठी पुण्यात गणन संशोधन प्रयोगशाळेंची (Computational Research laboratories) स्थापना केली. २००६-०७ दरम्यान त्यांची टाटा समूहाच्या अध्यक्षांचे शास्त्रीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. सध्या ते प्रगत गणितातील फायनाईट आणि प्रोग्रेसिव्ह जॉमेट्री यांच्या मदतीने संगणकाची कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहेत. तुलनेने जास्त प्रगत महासंगणक संरचनेसाठी ते काही नवीन गणिती संकल्पना विकसित करत आहेत.
अनेक पुरस्कारांवर करमरकर यांनी आपले नाव कोरले आहे. ऑपरेशन्स रिसर्च सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेचे फ्रेड्रिक डब्ल्यू. लँचेस्टर पुरस्कार, अमेरिकन मॅथेमॅटीकल सोसायटी आणि मॅथेमॅटीकल प्रोग्रॅमिंग सोसायटी या दोन्ही संस्थांचे संयुक्त फुल्कर्सन पुरस्कार, भारत सरकारचे श्रीनिवास रामानुजन जन्मशताब्दी पारितोषिक आणि असोसिएशन ऑफ कॉम्प्युटींग मशिनरी या संस्थेचे पॅरिस कॅनेल्स्कीस पुरस्कार हे त्यातील काही उल्लेखनीय पुरस्कार.
पण करमरकरांच्या कामाचा उच्च दर्जा आणि उपयुक्तता यांबद्दल खात्री असल्याने, किंवा त्याची पावती म्हणून आज त्यांच्या संशोधनाचा संदर्भ इतर संशोधक आपल्या शोधलेखात देतात, खरेतर ISI (Institute for Scientific Information) च्या सर्वात जास्त संदर्भ घेतल्या जाणाऱ्या संशोधकांच्या यादीमध्ये नरेंद्र करमरकरांचे नाव आहे, याहून मोठा पुरस्कार तो कोणता?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.