आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारत-पाकिस्तान, भारत-चीन यांसारखाच भारत-श्रीलंका यांच्यातील सीमावादही खूप जुना आहे. गेल्या अडीच हजार वर्षापासून या दोन्ही देशांत सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक आदानप्रदानाचा वारसा चालत आला आहे. भारताप्रमाणेच श्रीलंकेतही हिंदू धर्म आणि बौद्ध धम्माचा प्रभाव आढळतो. दोन्ही धर्म अहिंसेचे पुरस्कर्ते असले तरी श्रीलंका गेली अनेक वर्षे रक्तरंजित संघर्ष अनुभवतो आहे. आजही सिंहली आणि तामिळ हिंदू यांच्यातील वाद सुरूच आहे.
पुराणकथांच्या मान्यतेनुसार श्रीलंकेची स्थापना भगवान शिवाने केली होती. रामायणातील लंकेचा उल्लेख तर सर्वश्रुतच आहे. आजही तिथे रामायणाच्या खाणाखुणा सापडतात. रामायणकालीन अभ्यासासाठी तिथे रामायण स्टडी सेंटर चालवले जाते. या अभ्यास केंद्राच्या वतीने तिथे रामायणकालीन स्थळांचा आणि अवशेषांचा शोध घेतला जात आहे. रावणाची लंका इथेच वसली असल्याचेही पुरावे इथल्या अभ्यासावरून आढळून आले आहेत. श्रीलंकेतही प्रभू श्रीरामाशी निगडीत अनेक लोककथा आणि साहित्य प्रचलित आहे.
फक्त रामायणच नाही तर दक्षिणेकडील इतर राजे श्रीलंकेवर हल्ला करत आणि श्रीलंकेतील राजे दक्षिण भारतावर हल्ला करत अशा अनेक गोष्टी ज्ञात आहेत. मौर्य काळात श्रीलंका हा भारताचाच एक भाग होता.
आजही दक्षिणेतील राजकारणाचा प्रभाव श्रीलंकेवर जाणवतो तर श्रीलंकेतील राजकारणाचा प्रभाव दक्षिणेवर जाणवतो. इथल्या भाषेवरही भारतीय भाषांचा प्रभाव जाणवतो. या दोन्ही देशाच्या दरम्यानच्या संबंधाचा इतिहास हा समृद्ध असला तरी सद्य स्थितीत मात्र या दोन्ही देशांत कमालीचा तणाव आहे.
अठराव्या शतकापासून श्रीलंका हा इंग्रजांची स्वतंत्र वसाहत बनला. इंग्रजांच्या आधी या देशावर डच आणि पोर्तुगीजांची सत्ता होती.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी म्हणजे फेब्रुवारी १९४८ मध्ये श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारत-श्रीलंका सीमावाद सुरूच आहे.
श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन्ही देश चर्चने आणि समोपचाराने आपल्या सीमांचा वाद मिटवण्याबाबत आग्रही राहिले असले तरी कधीकधी या दोन देशातील वाद विकोपाला जातात.
कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण भारत आणि श्रीलंकेदरम्यान तणाव निर्माण होण्याचे नेमके कारण आहे एक छोटेसे बेट. पाल्कच्या सामुद्रधुनीतील या छोट्याशा बेटाच्या मालकी हक्कावरून दोन्ही देशांत नेहमीच संघर्षजन्य परिस्थिती उद्भवते. ज्याचे नाव आहे कच्चीथवू!
पाल्कच्या समुद्रधुनीतील कच्चीथवू हे छोटेसे बेट रामायण काळात बांधले असल्याचे मानले जाते. याच बेटावरून श्रीरामांनी लंकेकडे कूच केली होती असे म्हणतात.
आकाराने अगदी छोटेसे असलेले हे बेट समुद्री जीवांनी समृद्ध आहे. ज्या देशाच्या ताब्यात हे बेट असेल तिथल्या समुद्रावरही त्याच देशाचे आधिपत्य असेल. १९७२ साली दोन्ही देशांत या बेटाबाबत सोक्षमोक्ष लावण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. आश्चर्य म्हणजे या बेटावर श्रीलंकेचा हक्क असल्याचे भारताने मान्य केले. यावेळी भारतात श्रीमती इंदिरा गांधी यांचे सरकार होते आणि त्यांनीच या हस्तांतरणाला मान्यता दिली. त्यामुळे हे बेट श्रीलंकेच्या ताब्यात जाण्यासाठी कॉंग्रेसच जबाबदार आहे असे मानून याचे खापर आजही कॉंग्रेसच्याच माथ्यावर फोडले जाते.
भारत सरकारने जरी हे बेट श्रीलंकेला दिले असले तरी तामिळनाडूला मात्र भारत सरकारचा हा निर्णय अजिबात मान्य नव्हता. प्रादेशिकदृष्ट्या विचार केला तर हे बेट म्हणजे तामिळनाडूचाच एक भाग आहे. तामिळनाडूने भारत सरकारच्या या निर्णयाला आव्हान देत सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आजही तामिळनाडूतील प्रादेशिक राजकारणात या बेटाचा मुद्दा खूप गाजतो.
या बेटावर ज्या देशाची मालकी त्या देशाचे लोक याच्या सभोवतालच्या समुद्रावर अधिकार गाजवू शकतात. मासेमारीसाठी हा भाग अतिशय समृद्ध असल्यानेच हे बेट भारताच्या ताब्यात असावे असे तामिळनाडूचे मत आहे. समुद्र किनाऱ्यावरील लोकांचे जीवन हे समुद्री जीवांवरच तर अवलंबून असते.
भारतीय मच्छिमार जेव्हा या प्रदेशात मासेमारीसाठी जातात तेव्हा श्रीलंकन सरकार त्यांना अटक करून तुरुंगात डांबते. दोन देशांच्या या सीमा वादात स्थानिक मच्छिमार नाहक बळी ठरत आहेत.
या बेटा संदर्भात तामिळनाडू राज्याने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका अजूनही प्रलंबित आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही असला तरी आता जर त्या बेटावर ताबा मिळवायचा असेल तर युद्ध हाच एक पर्याय आहे. न्यायालयाचे मत आहे की, युद्ध हा न्यायालयाच्या अखत्यारीतील विषय नाही. या छोट्याशा बेटावर श्रीलंकेने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. या बेटावर एक जुने चर्च आहे. भारतीय नागरिकांना वर्षातून एकदाच या चर्चमध्ये जाण्याची परवानगी दिली आहे, इतरवेळी त्यांना या बेटावर प्रवेश करण्यास मनाई आहे. तरीही तिथे जाणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाची कसून तपासणी केल्याशिवाय त्याला या बेटावर प्रवेश दिला जात नाही.
दोन्ही देशादरम्यान झालेल्या करारानुसार भारतीय मच्छिमारांना या बेटावर त्यांची जाळी सुकत घालण्याची परवानगी दिली होती. मात्र ही परवानगी फक्त कागदावरच राहिली. मात्र, इथल्या काटेकोर सुरक्षा व्यवस्थेमुळे मच्छिमारही या प्रदेशात प्रवेश करण्यास कचरतात.
बड्या कार्पोरेट कंपन्यांनी मासेमारीच्या क्षेत्रात पाउल टाकल्यापासून छोट्या मच्छिमारांचा व्यवसायच धोक्यात आला आहे. याचा फटका तामिळनाडूतील मच्छिमारांनाही बसला आहे. किनाऱ्यालगतच्या प्रदेशात जेव्हा या छोट्या मच्छिमारांना मासे मिळत नाहीत तेव्हा हे अधिक खोल पाण्यात शिरण्याचा प्रयत्न करतात. यात त्यांच्या जीवाला दुहेरी धोका असतो, एक तर समुद्री पाण्याची भीती आणि दुसरी चुकून जर श्रीलंकन समुद्री सीमेत त्यांची छोटी होडी गेलीच तर अटक होण्याची भीती. दोन्हीकडून त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहेच. कधी कधी तिकडचे मच्छिमारही असेच चुकून भारताच्या सागरी प्रदेशात प्रवेश करतात आणि भारतीय सैन्य त्यांना पकडून तुरुंगात डांबते.
स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतरही भारताला आपल्या कोणत्याच शेजाऱ्यांशी असलेले सीमावादावर तोडगा काढता आलेला नाहीच, पण नजीकच्या काळातही यावर काही निश्चित तोडगा निघेल अशी चिन्हे दिसत नाहीत. शेवटी सीमाप्रश्नांचे हे घोंगडे असे किती काळ भिजत ठेवणार हाच मोठा प्रश्न आहे!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.