आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
२१ वर्षांच्या वयात बरेच तरुण स्वतःच्या आयुष्याला चांगले वळण देऊन ते सुखासुखी कसे जगता येईल यासाठी प्रयत्नशील असतात. अनेक नवयुवक याच साचेबद्ध प्रणालीवर चालतात. काही नवीन करण्याच्या विचारानेच त्यांना धडकी भरते. जगात असे फार कमी लोकं आहेत, ज्यांनी साचेबद्ध चौकट मोडून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांनी हा प्रयत्न करून यश कमावले, ते अनेकांसाठी प्रेरणेचे स्रोत बनले आहेत.
अशाच काही चौकट मोडून नवीन काहीतरी करू पाहणाऱ्या लोकांपैकी एक म्हणजे रितेश अग्रवाल. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने सुरु केलेल्या ओयो रूम्स या स्टार्टअपने अल्पवधीत मोठे यश कमावले.
कुठल्याही सामान्य मुलाप्रमाणे रितेशने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पण इथूनच त्याच्या आयुष्याला वेगळं वळण लागायला सुरुवात झाली होती. रितेश एका मारवाडी कुटुंबातून आला आहे. त्याच्या परिवाराने अनेक पिढ्यांपासून व्यापार करणाऱ्यावरच भर दिला आहे. रितेशच्या आई-वडिलांची इच्छा होती की त्यांच्या मुलाने देखील पारंपरिक व्यवसाय करावा अथवा एखाद्या दुकानाची सुरुवात करावी. रितेशची मात्र दुकान उघडून बसायची अजिबात इच्छा नव्हती. त्याचं मन हे पुस्तकं वाचण्यात आणि फिरस्तीत रमत होते.
पुढे रितेश कोट्याला आला आणि याठिकाणी त्याने आयआयटीच्या परीक्षेसाठी तयारी करायला सुरुवात केली. कोचिंगबरोबरच तो वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या बिझनेस सेमिनार्सला देखील जाऊ लागला. याच ठिकाणी त्याला असे लोक भेटले जे स्वतःच्या रोजच्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायाचा शोध घेत होते.
रितेशच्या मनात त्यावेळी असंच काहीतरी करण्याचा विचार सुरु होता. त्याला तेव्हाच कळून चुकलं होतं की रसायनशास्त्रातील डिग्री घेऊन तो लोकांच्या समस्या काही सोडवू शकणार नाही, मात्र तो हे एखाद्या बिझनेसच्या माध्यमातून नक्की करू शकेल.
यामुळे त्याने कोटा येथील आयआयटी ट्रेनिंग सोडून दिल्लीला एका बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेतला.
अनेक बिझनेस सेमिनार्स हे मोठ्या मोठ्या शहरात व्हायचे. रितेश त्या सेमिनार्सला जायचा, त्यावेळी त्याला महागड्या हॉटेल्समध्ये रहावं लागयचं. बऱ्याचदा मोठ-मोठ्या शहरात चांगले आणि स्वस्त हॉटेल्स मिळत नसत. महागड्या हॉटेल्समध्ये देखील चांगल्या सुविधा दिल्या जात नव्हत्या. याच वेळी रितेश यांच्या डोक्यात कल्पना आली की एका अशा प्लॅटफॉर्मची निर्मिती करावी, ज्याच्या मदतीने स्वस्त आणि चांगल्या हॉटेल्सचे पर्याय लोकांना सहज उपलब्ध होतील. भारतात त्यावेळी अनेक स्टार्टअप्सची सुरुवात होत होती. तंत्रज्ञानाच्या बाबतीत देखील देश प्रगती करत होता.
२०१२ साली रितेशने ‘ऑरवेल स्टेट्स’ नावाचं आपलं पहिलं स्टार्टअप सुरु केलं. या माध्यमातून तो लोकांना हॉटेल बुकिंगची ऑनलाईन सेवा पुरवू लागला. या स्टार्टअपला वेळ देण्यासाठी त्याने बिझनेस कॉलेजसुद्धा सोडलं. तर स्टार्टअप्सप्रमाणे ऑरवेल स्टेट्सला देखील भांडवलाची गरज भासली. त्यावेळी रितेश आपला बिझनेस प्लॅन घेऊन व्हेंचर नर्सरीजवळ गेला. कंपनीला त्याचा हा प्रस्ताव फारच आवडला.
कंपनीने रितेशच्या स्टार्टअपसाठी तीस लाख रुपयांचं भांडवल दिलं. तेव्हाच त्याला थील फेलोशिपची माहिती मिळाली. ही फेलोशिप कमी वयात व्यवसाय सुरु करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत देण्याचं काम करत होती.
या फेलोशिपच्या स्पर्धेत रितेशने दहावे स्थान मिळवले. यामुळे त्याला ६६ लाख रुपयांची फेलोशिप मिळाली.
सगळं काही व्यवस्थित सुरु होतं, रितेशने गुंतवणुकीतून उभा केलेला पैसा कंपनीला विकसित करण्यासाठी खर्च करण्यास सुरुवात देखील केली होती. पण काही काळातच त्याच्या गाडीला मोठा ब्रेक लागला. एवढा पैसा लावून देखील अपेक्षित नफा कमवता येत नसल्यामुळे ऑरवेल स्टेट्स घाट्यात जाऊ लागली. रितेशच्या घरच्यांनी हा नाद सोडून घरी येण्यास सांगितले, पण रितेश मागे हटला नाही.
त्याची सगळीकडे निंदा होऊ लागली आणि अर्थातच लोक त्याला फुकट सल्ले देऊ लागले, त्याच्या अपयशावर हसू लागले. पण रितेश ठाम होता. त्याला पूर्ण विश्वास होता की तो या चुकांमधून शिकून पुन्हा उभा राहील.
ज्यावेळी त्याने आपल्या या अपयशाची पडताळणी केली, त्यावेळी त्याला लक्षात आलं की लोकांना हॉटेल रूम नको आहेत, त्यांना कमी पैशात जास्त सुविधा देणाऱ्या हॉटेल रूम हव्या आहेत. लोकांना काय हवं आहे, हे त्याला लक्षात आले आणि त्यानुरुप त्याने व्यवसायात बदल करण्यास सुरुवात केली होती.
रितेश यांनी ऑरवेल स्टेट्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले.
२०१३ साली त्यांनी ऑरवेल स्टेट्सचे ‘ओयो’ असे नामकरण केले. ओयो रूम्सचा अर्थ आपली खोली असा होतो. ग्राहकांना चांगल्या सुविधा आणि रूम्स देण्यावर रितेशने भर दिला.
यामुळे मोठ्या प्रमाणात लोक ओयो रूम्सकडे आकर्षित होऊ लागले. त्याने स्वतः ग्राहकांना देण्यात येणाऱ्या हॉटेल्सविषयी जाणून घेण्यास सुरुवात केली. हॉटेल्स बऱ्यचदा आपल्या रूम्सविषयी फार खोट सांगायच्या, यामुळे लोकांची निराशा व्हायची.
आपल्या ग्राहकांची निराशा कुठल्याही परिस्थितीमध्ये नको व्हायला यासाठी रितेश स्वतः हॉटेलला जाऊन भेट द्यायचे. मागच्या वेळी केलेली चूक त्याला पुन्हा करायची नव्हती.
ओयो रूम्सने आपल्या हॉटेल्ससाठी काही विशेष मापदंड तयार केले होते, जर त्या मापदंडात हॉटेल्स बसत नसतील तर त्यांच्याशी ओयो करार करत नसे. ओयोचे अधिकारी येऊन हॉटेलच्या एकूण परिस्थितीची माहिती घेऊनच त्या हॉटेलची सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून द्यायचे. रितेशने ओयोमध्ये आणलेल्या क्रांतिकारी बदलामुळे कंपनीची गाडी रुळावर आली, काही काळातच ओयो ग्राहकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागली.
ओयोची प्रगती बघून डीएसजी कन्झ्युमर पार्टनर्सने ओयोमध्ये चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. २०१७ मध्ये एका जपानी बहुराष्ट्रीय कंपनीने यात सात अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली.
आज ओयोने स्वतःला बाजारात स्थापित केले आहे, दिवसाला एक कोटी ग्राहक ओयोचा वापर करत आहेत. ओयो सध्या तेजीत असून तिला स्पर्धा करायला कुठली दुसरी कंपनी मार्केटमध्ये नाही आहे.
ओयोने आपला विस्तार मलेशिया व इतर देशांत देखील केला आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल ओयोमध्ये होते आहे. या सर्व यशाचे श्रेय जाते ते रितेशला. त्याने त्यावेळी चिकाटी बाळगली म्हणून आज त्याचा व्यवसाय यशाच्या शिखरावर आहे. जर त्याने ही चिकाटी दाखवली नसती, तर तो आजही गावात एखाद्या दुकानाच्या गल्ल्यावर बसलेला दिसला असता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.