आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात आयुर्वेदाची परंपरा हजारो वर्षांपासून आहे. आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात ऍलोपॅथीच्या माध्यमातून उपचार केले जातात. पण आजही काही आजारांवर ऍलोपॅथीच्या माध्यमातून गुण येत नसेल तर लोक आयुर्वेदाकडे वळतात. गेल्या शेकडो वर्षांपासून बैद्यनाथसारख्या कंपन्या भारतातच नाहीत, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेदाच्या प्रसाराचे कार्य करीत आहेत.
पण तुम्हाला माहितीये का, या कंपनीचा इतिहास १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनाशी जोडलेला आहे?
इंग्रजांच्या विरोधात स्वदेशी मोहीम राबवून प्राचीन परंपरांचे जतन बैद्यनाथने केले आहे. आज शेकडो वर्ष जुन्या असलेल्या बैद्यनाथच्या प्रवासावर एक नजर टाकूया…
इंग्रजांच्या काळात भारतात स्वास्थ्य सुविधांचा अभाव होता. याचाच फायदा घेऊन इंग्रजांनी भारतात विदेशी औषधांची विक्री करण्यास सुरुवात केली. पर्याय नसल्याने भारतीय लोकांना ही महागडी औषधे विकत घ्यावी लागत होती. अशावेळी आयुर्वेदच होते, ज्याच्या बळावर इंग्रजी औषधांवर बहिष्कार करता येणे शक्य होते. यासाठी पंडित राम दयाळ जोशी यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वदेशी आणि आयुर्वेदाच्या बळावर इंग्रजांच्या वस्तू व औषधांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली.
यातूनच पुढे १९१८ साली त्यांनी आयुर्वेदाला समर्पित बैद्यनाथ आयुर्वेद नावाची कंपनी सुरु केली.
वैद्य रामनारायण शर्मा त्यांचे या कार्यात सहकारी होते. या कंपनीचे पहिले कार्यालय कोलकाता येथे सुरु करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या कंपनीने स्वदेशीचा प्रसार करण्यास सुरुवात केली. तेव्हा भारतात इंग्रजांच्या विरोधात भारत छोडो आंदोलन सुरु होते. या आंदोलनाचा प्रमुख उद्देश हा ब्रिटिश साम्राज्याचा पाडाव करणे होते. देशभरात हे आंदोलन जोर पकडत आहे, हे बघता बैद्यनाथने देखील या आंदोलनात उडी घेतली. भारत छोडो आंदोलनात बैद्यनाथची भूमिका तेव्हा महत्त्वपूर्ण ठरली ज्यावेळी सामान्य लोकांनी देश की मिट्टी, देश की हवा, देश का पानी और देश की दवा अशी घोषणा केली. असे म्हणतात या आंदोलनामुळे बैद्यनाथाच्या विकासाला वेग मिळाला.
बैद्यनाथचा पहिला कारखाना कोलकाता येथे उघडण्यात आला होता. खरे तर त्याकाळी कोलकात्यात आयुर्वेदिक औषधांना इतकी मागणी नव्हती. असे असले तरी त्याची सुरुवात इथे करण्यात आली. यामुळे लोकांना आश्चर्य वाटले. त्यांच्या या पावलामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु पंडित राम दयाळ जोशींना कंपनीचा इथूनच विस्तार करता येईल असा विश्वास होता. अगदी तसेच घडले. बैद्यनाथ कंपनीने ब्रिटिशांच्या कंपन्यांना आव्हान देत, स्वतःला प्रस्थापित करण्यात यश मिळवले.
१९३० साली मलेरियावर सिरप तयार करून या कंपनीने एक वेगळी क्रांती घडवून आणली. हळूहळू भारतीय लोकांमध्ये आयुर्वेद आणि स्वदेशी औषधांचा प्रभाव वाढत गेला. काही काळाने बैद्यनाथने च्यवनप्राश तयार करून आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण करण्यात यश मिळवले.
कोलकत्यातील बैद्यनाथचा कारखाना हा स्वातंत्र्य आंदोलनातील अनेकांसाठी हा एका सुरक्षित आसरा होता. ब्रिटिश भारतात लोकांना स्वदेशीच्या जवळ आणून बैद्यनाथने अमूल्य योगदान दिले होते. ब्रिटिशांच्या आयुर्वेदाला समाप्त करण्याचा प्रयत्नांना बैद्यनाथने हाणून पाडले होते.
आज शेकडो हजारो वर्षांनी देखील त्यांनी प्राचीन भारताच्या आयुर्वेदिक औषधांची परंपरा कायम ठेवली आहे.
बैद्यनाथने केवळ आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली नाही. त्यांनी वैदिक ज्ञानाच्या बळावर आयुर्वेदाविषयी शिक्षा व जनजागृतीचे कार्य सुरु ठेवले आहे. याच कारणांमुळे आज बैद्यनाथचा जगभरात विस्तार झाला आहे. अमेरिकेत देखील आज या कंपनीचे ३३हुन अधिक डीलर्स आहेत. तेथील डलास या शहरात बैद्यनाथचे मुख्यालय देखील आहे. इटली, जर्मनी, बेल्जीयमसारख्या ३५ देशांमध्ये आज बैद्यनाथचे साम्राज्य विस्तारले आहे. लोक बैद्यनाथाच्या हर्बल औषधींना विशेष पसंती दर्शवतात. त्यांच्या त्वचा, केस आणि पाचनसंस्थेवरील औषधांना विशेष मागणी आहे.
कंपनी ७०० पेक्षा जास्त उत्पादनांची निर्मिती करते. त्यांची आज भारत सरकारची मान्यता प्राप्त असलेली रिसर्च लॅब असून त्यात ५०हुन अधिक डॉक्टर्स कामाला आहेत. आयुर्वेदावर बैद्यनाथ पुस्तके देखील छापते या पुस्तकांचा वापर आयुर्वेदाच्या आभ्यासक्रमात करण्यात येतो.
संपूर्ण विश्व आज डिजिटलायझेशनकडे वळते आहे. बैद्यनाथ देखील आता डिजिटली ऍक्टिव्हेट झाली असून ई-कॉमर्सच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे काम करत आहे.
आज आयुर्वेद आधुनिक वैद्यकशास्त्राच्या तुलनेत जरी कमजोर असले तरी अमेरिकेसारख्या देशातील वाढती मागणी पाहता आयुर्वेद अजूनही लोकप्रिय आहे, याची खात्री पटते. खरंतर शंभर वर्षांपूर्वी वैद्यनाथची स्थापना करण्यात आली नसती तर आज हे शक्य झाले नसते. देशभक्तीच्या आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून सुरु करण्यात आलेल्या या कंपनीने आयुर्वेदाला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी प्रदान केली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.