आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
स्वतंत्र भारताची घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली हे सर्वश्रुत आहेच. परंतु स्वतंत्र पाकिस्तानचा पहिला कायदामंत्री देखील एक दलित होता त्याचे नाव म्हणजे “जोगेंद्रनाथ मोंडल”.
जोगेंद्रनाथ मोंडल हे देखील दलितांच्या हक्कासाठी लढा देणारे एक नेते होते. मुस्लिम आणि दलित युती करून स्वतंत्र देशात मानाने रहायचं स्वप्न जोगेंद्रनाथ आपल्या बांधवांसाठी पहात होते, या स्वप्नाच्या पुर्ततेसाठी त्यांनी मुस्लिम लिग हा पक्ष निवडला आणि थोड्याच काळात मोहम्मद अली जिना यांच्या बरोबर त्यांची जोडी जमली.
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घडलेल्या एका घटनेचे उदाहरण देतो. बंगालमधील सिल्हेट या गावात हिंदु आणि मुस्लिम संख्या समान असल्याने भारतात की पाकिस्तानात सामील व्हायचे यावर तोडगा निघत नव्हता अशावेळी जिनांनी जोगेंद्रनाथांना सिल्हेट मध्ये पाठवलं आणि दलितांची मते पाकिस्तानच्या पारड्यात फिरवली आणि सिल्हेट पाकिस्तानमध्ये सामिल झालं यावरून जोगेंद्रनाथांचे महत्व आणि पाकिस्तान घडवण्यातील भूमिका लक्षात यावी.
पुढे पाकिस्तानचा पहिला कायदामंत्री बनल्यावर हळूहळू परिस्थिती त्यांच्या लक्षात आली परंतु तोवर उशीर झालेला होता कारण सर्वधर्मियांसाठी समान न्याय हे स्वप्न दाखवणारे जिन्हा मृत्युपंथाला लागलेले होते. स्वतः जिनांच्या भगिनीवर भारतीय गुप्तहेर असल्याचा संशय घेत पहारे बसले होते तिथे जोगेंद्रनाथांची काय कथा.
“मुस्लिमांसाठी पाकिस्तान” हे विचार डोक्यात असणारे नोकरशहांना हिंदु कायदामंत्री कसा खपावा?
त्यांनी जोगेंद्रनाथांबरोबर असहकार सुरू केला, त्यांना अपमानकारक वागणुक दिली जाऊ लागली, त्यांच्यावर संशय व्यक्त केला जाऊ लागला आणि अशात मोहम्मद जिना यांचा देखील मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युवेळी जोगेंद्रनाथ म्हणतात “कायदे आझम अशावेळी आम्हाला सोडुन गेलेत ज्यावेळी आम्हाला सर्वात जास्त त्यांची गरज आहे”.
पुढे त्यांना सर्व प्रकार सहन होईनात तेव्हा त्यांनी विस्तारपुर्वक एक राजीनामा पत्र लिहिले “त्यात नोकरशहांच्या वागणुकी बरोबरच काही घटनांचा त्यांनी उल्लेख केला आहे त्यात दलित हिंदु जनतेची मालमत्ता पोलिसांच्या सहकार्याने लुटणे तसेच लष्करी तळावर हिंदु महिलांना रात्रीच्या मनोरंजनासाठी उचलून नेणे तसेच १९५० साली बंगालमध्ये झालेल्या धार्मिक दं*गलीत जवळपास दहा हजार हिंदुंची क*त्तल अशा घटना घडुन देखील प्रशासनाने दुर्लक्ष करणे आदींचा उल्लेख आहे, पाकिस्तान सरकार पद्धतशीरपणे मुस्लिमेतर धर्मियांना देशोधडीला लावण्याचा कट आखत असल्याचा उल्लेख त्या राजीनाम्यात आहे”.
मनाशी बाळगलेल्या स्वप्नांचा झालेला चुराडा पहात जोगेंद्रनाथांनी भारत सरकारकडे शरण मागितली आणि भारताने ती त्यांना दिली. पण यात एक गोष्ट म्हणजे या माणसाच्या अंगातली मस्ती जिरली नव्हती किंवा हा माणूस भिकेला लागण्याच्याच लायकीचा होता, असे माझे स्पष्ट मत आहे. कारण भारतात परतल्यावर एका पत्रकाराने “आपण भारतात परत आल्यावर कसे वाटतेय?” हा प्रश्न विचारल्यावर हा माणुस “मी बंगाल मध्ये परत आलो आहे” असे उत्तर देऊन मोकळा झाला म्हणजे याच्या साठी भारत अस्तित्वात नव्हता तर बंगाल हाच देश होता.
असो, एकाच परिस्थिती आणि पार्श्वभूमीतुन निघालेली दोन माणसं, एकाच्या आयुष्याच सोनं झालं तर दुसऱ्याच्या आयुष्याची माती, माणसाची निवड चुकली की काय होते त्याचे उत्कृष्ट उदाहरण.
स्त्रोत- https://en.m.wikisource.org/wiki/Resignation_letter_of_Jogendra_Nath_Mandal
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.