आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जर आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर यासाठी आपण इतरांना, परिस्थितीला किंवा आपल्या शारीरीक क्षमतेला जबाबदार धरतो. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक दिसतात जे एकदम धडधाकट असूनही रडगाणं गात फिरत असतात. असे खूप कमी लोक आहेत ज्यांनी आपल्या शरीराला आहे त्या स्थितीमध्ये स्वीकारलेलं आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शरीराला आहे त्या स्थितीमध्ये स्वीकारते आणि आपल्या क्षमतांचा योग्य तो वापर करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला नक्कीच यश मिळतं. याबाबत अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट म्हणतात, ‘Do what you can, with what you have, where you are.’
हीच गोष्ट एका १३ वर्षीय भारतीय मुलीनं अंगीकारली आहे. जन्मत: ऑटिझम असलेल्या या मुलीनं आपल्या शारीरीक मर्यादांवर मात करत थेट समुद्रालाच आपलं मित्र बनवलं आहे. गेल्या आठवड्यात या मुलीनं १३ तासात भारत ते श्रीलंकेदरम्यानचं २८.५ किलोमीटर अंतर पोहून पार केलं! जिया राय, असं या १३वर्षीय जलपरीचं नाव आहे.
विविध विक्रम आपल्या नावावर केलेल्या जियाची ही कामगिरी इतरवेळी कदाचित फारशी विशेष ठरली नसती. मात्र, ज्यावेळी जिया भारत आणि श्रीलंकेदरम्यानची पाल्कची समुद्रधुनी पार करत होती त्यावेळी हिंदी महासागरात ‘असनी चक्रीवादळ’ विद्ध्वंस करण्याची पूर्वतयारी करत होतं!
अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जियानं पाल्कची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली. त्याबाबत हा विशेष लेख…..
द्वीपकल्प आणि द्विपसमूहांचा मिळून आपल्या भारताला एकूण ७ हजार ५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यामुळं चक्रीवादळं, त्सुनामी यासारख्या गोष्टी आपल्याला नवीन नाहीत. आतापर्यंत आपण समुद्रमार्गानं आलेल्या अनेक नैसर्गिक संकटांचा सामना केलेला आहे.
गेल्या आठवड्यात देखील असनी नावाचं असंच एक संकट बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं असनी चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. त्याच्या धोक्यामुळं लष्करालाही अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं होतं. अंदमान आणि निकोबार बेटांवरील मच्छिमारांना समुद्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.
अंदमान प्रशासनानं तर सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली होती कारण अंदमानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अंदमान आणि निकोबार प्रशासनानं खबरदारी म्हणून केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये २१ मार्चपासून बंद ठेवली होती.
अशा परिस्थितीमध्ये १३ वर्षांच्या जिया रायनं बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर यांना जोडणारी पाल्कची समुद्रधुनी पार करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय म्हणजे एक प्रकारे निसर्गाला दिलेलं खुलं आव्हानच होतं.
ऑटिझमबाबत जागरूकता, भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि भारत-श्रीलंका यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी या पॅरा-स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियानं ही मोहीम आयोजित केली होती. ऑटिझम असलेल्या जियानं २८.५ किलोमीटर अंतर पार करून इतिहास रचला आहे.
जिया अवघ्या १३ तासात श्रीलंकेतून भारतात पोहोचली. तिनं श्रीलंकेतील थलाईमन्नार किनाऱ्यापासून पाण्यात उडी मारली होती तर तामिळनाडूमधील धनुष्कोडी येथील अरिचलमुनई किनाऱ्यावर ती पाण्याबाहेर आली. ती पाल्क समुद्रधुनीमध्ये पोहणारी जगातील सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान महिला जलतरणपटू बनली आहे.
यापूर्वीचा विक्रम भुला चौधरी यांच्या नावावर होता. त्यांनी २००४मध्ये १३ तास ५२ मिनिटांत हे अंतर पार केलं होतं. विशेष म्हणजे या परिसरामध्ये मिल्क शार्क नावाच्या धोकादायक माशाचा आणि जेलीफिशचाही अधिवास आहे. तरीदेखील न घाबरता जियानं आपला समुद्र प्रवास पूर्ण केला.
नौदल अधिकारी असलेल्या मदन राय यांच्या घरी जियाचा जन्म झाला. साधारण मुलं एक वर्षाचं झालं की ते हळूहळू बोलू आणि चालू लागतं. मात्र, जिया वर्षाची झाल्यानंतरही बोलू शकत नव्हती. त्यामुळे वडील मदन राय आणि आई रचना यांनी तिला डॉक्टरांनाकडे नेलं. तिथे तिला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असल्याचं निदान केलं.
ऑटिझम हा एक आजार आहे जो मुख्यतः लहान मुलांमध्ये आढळतो. परंतु, तो शोधणं फार कठीण आहे. हा रोग केवळ असामान्य प्रतिक्रिया आणि हावभावाने ओळखला जाऊ शकतो. इतर मुलांच्या तुलनेत तुमचं मूल गप्प राहत असेल किंवा कोणत्याही गोष्टीवर उशीरा प्रतिक्रिया देत असेल तर त्याला ऑटिझम असू शकतो. तज्ज्ञांच्या मते ऑटिझम हा एक मानसिक आजार आहे. या आजाराने ग्रस्त मुलांचा मानसिक विकास पूर्णपणे पूर्ण झालेला नसतो. जियाला हाच आजार होता.
ती इतर मुलांसारखी नव्हती. त्यामुळं तिची फार काळजी घ्यावी लागत असे. एक दिवस तिचे वडील तिला स्विमिंग पूलवर घेऊन गेले. तिथे ती पाण्यात खेळू लागली. तेव्हा तिला पोहायला शिकवण्याचा निर्णय तिच्या वडिलांनी घेतला.
जियाची जलतरणपटू बनण्याची कहाणी इथून सुरू झाली. पण, तरीही अडचणींनी तिची पाठ सोडली नाही. सरकारी नियम जियाच्या पोहण्यात अडथळा ठरले. पण आपली क्षमता दाखवत तिनं सगळ्यांची बोलती बंद केली. तिनं आतापर्यंत २५ पेक्षा जास्त गोल्ड मेडल्स मिळवलेली आहेत.
ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्याचं तिचं स्वप्न आहे. यासाठी कसून सराव करते. ती दररोज सकाळी पहाटे साडेचार वाजता उठते. त्यानंतर एक तासभर धावण्याचा सराव करते. तिथून ती जिमला जाते व सकाळी ८ ते १० स्विमिंग करते. इयत्ता आठवीमध्ये असलेली जिया सायंकाळी पुन्हा दोन तास पोहण्याचा सराव करते.
गेल्यावर्षी जियानं वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे ३६ किमीचे अंतर अवघ्या ८ तास ४० मिनिटांत पोहून एक नवा विक्रम केला होता. याआधी तिनं आंचल कोर्ट ते वसई किल्ला असा 22 किमीचा प्रवास ७ तास ४ मिनिटांत पार करून विश्वविक्रम केला होता.
जलपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिया रायनं राष्ट्रीय जलतरणातही चमकदार कामगिरी केलेली आहे. तिनं २०० मीटर फ्री स्टाईल, १०० मीटर बॅकस्ट्रोक आणि १०० मीटर बटरफ्लाय स्विममध्ये सुवर्णपदक जिंकलेली आहेत. आता तिला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून जागतिक पटलावर आपला ठसा उमटवायचा आहे.
जलतरणात २४ सुवर्णपदकं जिंकणाऱ्या अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सला जिया आपला आदर्श मानते. विलक्षण प्रतिभा असलेल्या जियाचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ‘सर्वात तरुण जलतरणपटू’ म्हणून नोंदवलं गेलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये जियाचं कौतुक केलं होतं. अलीकडेच तिला ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आलं.
जियासारखी जिद्ग प्रत्येक व्यक्तीनं दाखवली तर नक्कीच प्रत्येक संकटावर, प्रत्येक मर्यादेवर सहज मात करता येईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.