आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतीय हॉकी आणि तिचा सुवर्णकाळ म्हणलं की आपल्याला फक्त मेजर ध्यानचंद, धनराज पिल्ले एवढीच नावं माहीत असतात. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या सिनेमामुळे तरी आपल्या हॉकीचे काही हिरो आजच्या पिढीला माहीत झाले.
एकेकाळी आपला सुवर्णकाळ अनुभवणाऱ्या भारतीय हॉकीने भारताला अनेक हिरो दिले पण इतिहासाने त्यांची म्हणावी तशी दखल कधीच घेतली नाही. त्यातलेच एक नाव म्हणजे जयपाल सिंग मुंडा.
१९२८ साली पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते कर्णधार होते. फक्त हॉकीच नाही तर बिरसा मुंडा यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी इंग्रज सत्तेविरुद्ध लढा दिला. सोबतच आदिवासींच्या हक्कासाठी त्यांना आयुष्यभर झगडावे लागले.
हॉकीची नर्सरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झारखंडने भारताला अनेक खेळाडू दिले पण त्यांच्यासारखा खेळाडू आजवर देशाला लाभला नाही.
३ जानेवारी १९०३ रोजी रांची जिल्ह्यातील टकरा या गावी जयपाल मुंडा यांचा जन्म झाला. इतर आदिवासींप्रमाणे त्यांचे आईवडीलसुद्धा सामान्य शेतकरी होते. त्यांचं शिक्षण ख्रिस्ती मिशनरीकडून चालवल्या जाणाऱ्या शाळेमध्ये झाले. पुढे चर्चद्वारेच चालविल्या जाणाऱ्या रांची येथील सेंट पॉल कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. तिथे त्यांचे हॉकीमधले नैपुण्य आणि कुशाग्र बुद्धिमतेचे सर्व कॉलेजकडून कौतुक होऊ लागले.
त्यांचे टॅलेंट भारतामध्ये वाया जाऊ नये म्हणून कॉलेजच्या प्राचार्यांनी त्यांना ऑक्सफर्ड विद्यापिठात उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळवून दिला. तिथे त्यांचा खेळ तर अजूनच बहरला आणि थोड्याच दिवसांत त्यांची युनिव्हर्सिटीच्या टीममध्ये निवड देखील झाली.
अगदी उत्तम असा डिफेन्स, लयबद्ध खेळ आणि अचूक डायरेक्ट हिट मारण्याच्या कौशल्यामुळे ते टीमचे अतिशय महत्त्वाचे खेळाडू बनले. एवढेच नव्हे, तर युनिव्हर्सिटीकडून दिला जाणारा अगदी मानाचा ‘ऑक्सफर्ड ब्लू’ हा पुरस्कार पटकवणारे ते एकमात्र आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरले.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतली. त्या काळात त्यांनी अनेक प्रसिद्ध ब्रिटिश नियतकालिकांमध्ये हॉकीवर लेख लिहिले.
पुढे भारतीय प्रशासकीय सेवेसाठी घेतल्या जाणाऱ्या ICS (Indian civilian service) परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पण प्रशिक्षण कालावधी सुरू असताना १९२८ साली नेदरलँड येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्यांची भारतीय हॉकी संघात कर्णधार म्हणून निवड झाली.
ब्रिटिश सरकारने त्यांना विशेष रजा देण्यास स्पष्ट नकार दिला. आता हॉकी की प्रशासकीय सेवा, असा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. शेवटी प्रशिक्षण अर्ध्यावर सोडून ते भारतीय संघासोबत नेदरलँडला रवाना झाले.आणि अंतिम फेरीत यजमान नेदरलँडचा ३-० ने पराभव करून भारताने सुवर्णपदक जिंकले. हे ऐकायला जरी इतके सोपे वाटत असले तरी कर्णधार असणाऱ्या जयपाल यांना इतक्या सहजासहजी हे यश मिळाले नव्हते.
भारतीय संघात असणाऱ्या अँग्लो-इंडियन खेळाडू त्यांच्या आदिवासी असण्यामुळे त्यांना सतत विरोध करत होते आणि गोष्टी इतक्या थराला पोहचल्या होत्या की जयपाल यांना अंतिम सामन्याला मुकावे लागले होते.
भारतात परत आल्यावर ब्रिटिश सरकारने त्यांना ICS जॉईन करण्याची परवानगी दिली पण त्यासोबतच १ वर्षाचा प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण करण्याची अट ठेवली. त्यामुळे जयपाल यांनी ही ऑफर धुडकावून लावत बर्मा शेल नावाच्या तेल उत्पादक कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
काही काळ तिथे काम केल्यावर त्यांनी भारताच्या विविध विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९३४ साली त्यांना घाना येथील ‘प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेज’मध्ये कॉमर्सचे प्राध्यापक म्हणून बोलावणे आले, पण ३ वर्षांतच घाना सोडून ते भारतात परत आले व रायपूरच्या राजकुमार कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून रुजू झाले.
राजकुमार कॉलेजमध्ये त्याकाळी ब्रिटिश उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची आणि भारतीय राजघराण्यातली मुले शिक्षण घेत होती. पण जयपाल हे आदिवासी. त्यामुळे त्यांना विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्याकडून सतत वर्षभर ते आदिवासी असण्याची किंमत चुकवावी लागली. प्रचंड मानहानीनंतर त्यांनी प्राचार्य पदाचा राजीनामा दिला व बिकानेर संस्थांनामध्ये ते महसूल आयुक्त व पुढे राजदूत म्हणून काम पाहू लागले.
दरम्यानच्या काळात त्यांनी भारताचे मूलनिवासी असणाऱ्या आदिवासी लोकांच्या हक्कासाठी चळवळ उभी केली. हजारो वर्षांपासून उपेक्षित असणाऱ्या समाजाच्या न्यायहक्कांसाठी त्यांनी लढा द्यायला सुरुवात केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदिवासींच्या हक्कांबाबत अतिशय उदासीन असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे नाराज असलेल्या जयपाल यांनी शेवटी १९३८ साली आदिवासी महासभा स्थापन केली व आपला लढा नेटाने चालू ठेवला.
स्वतंत्र आदिवासी राज्य म्हणून झारखंडला मान्यता द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. पुढे ते १९४६ साली बिहारमधून संविधान सभेसाठी निवडून आले.
१९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरवण्यात आली. या बैठकीमध्ये त्यांनी स्वतःची ओळख ‘जंगली’ म्हणून करून दिली. आपल्या भाषणात पुढे ते म्हणाले,” आज मी त्या लाखो वीरांच्या वतीने बोलत आहे ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले अमूल्य योगदान दिले आहे. पण आज त्यांची काही ओळख नाहीये. आपल्या देशाचे मूळनिवासी असणाऱ्या या लोकांना मागास जमाती, चोर, अपराधी, जंगली म्हणून हिणवले जाते. पण मी सर्वांना सांगू इच्छितो की मला अभिमान आहे मी जंगली असल्याचा. देशाच्या अनेक भागात आम्हाला याच नावाने ओळखले जाते. मला फक्त हे समजत नाही की आदिवासींच्या हक्काचा प्रस्ताव मंजूर करण्यात संविधान सभेला नेमकी अडचण काय आहे? तुम्ही आदिवासींना लोकशाही मूल्य नाही शिकवू शकत. उलट तुम्हीच त्यांच्या लोकशाही परंपरा शिकून घ्यायला हव्यात. ते या पृथ्वीवरील सगळ्यात लोकशाहीने वागणारे लोक आहेत.
स्वतः उच्चशिक्षित असून पण जयपाल यांना सतत भेदभाव व अन्यायाचा सामना करावा लागला. तिथे बाकी गरीब व अडाणी आदिवासींविषयी न बोललेच बरे.
पुढे आदिवासी अस्मितेचे जनक म्हणून त्यांना लोकांनी ‘मरांग गोमके’ म्हणजे ‘ग्रेट लीडर’ ही पदवी दिली.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सरकारने २००४ साली एक स्टेडियम देखील उभे केले. त्यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी त्यांच्या ‘टकरा’ गावाला आदर्शग्राम बनवण्याची घोषणा केली.
पण एवढं पुरेसं नाहीये. ३० वर्ष लोटली त्यांच्या मृत्यूला पण त्यांच्या योगदानाला पद्धतशीर बगल देऊन आजही जयपाल सिंग मुंडा हे झारखंड आंदोलनाचे नायक होते का खलनायक असे या वादातच तेथील राजकीय पुढारी रममाण आहेत हे नक्कीच दुर्दैवी आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.