आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
युरोपमध्ये एकीकडे चर्चचं महत्व, कर्मठपणा आणि धर्माचा मानवी जीवनात अनावश्यक हस्तक्षेप वाढलेला होता. त्याच काळात रेनेसाँच्या प्रभावाखाली धार्मिक संकल्पनांचे बुरुज कोसळवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात होते. त्यामध्ये केवळ कर्मकांडांनाच नव्हे तर धर्माने आखून दिलेल्या नीतिनियमांनाही केवळ विरोधासाठी विरोध करण्यात आला.
धार्मिक कर्मठपणाएवढंच बऱ्याचदा धर्मविरोधालाही अतिरेकी स्वरूप आलं. अशा वेळी समाजोपयोगी धर्मपरंपरा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतानाच धर्मातील वाईट चालीरीती आणि धर्मगुरूंच्या बेताल वागण्यावर आसूड ओढण्याचं काम डेसिडेरियस इरास्मस यांनी केलं.
इरास्मस हे नेदरलॅंड(तत्कालीन हॉलंड)मधील एक मोठे मानवतावादी विचारवंत, ख्रिश्चन तत्वज्ञानाचे भाष्यकार, तत्वचिंतक आणि अभिजात वैचारिक वाङ्ममयाचे लेखक म्हणून त्यांचं स्थान महत्वाचं आहे. त्यांचा जन्म २७ ऑक्टोबर १४६९ रोजी रॉटरडॅममध्ये झाला. पुनर्जागरणाची प्रक्रिया (रेनेसाँ) पुढे नेणारे सर्वात मोठे विद्वान म्हणून त्यांना ओळखलं जातं.
न्यू टेस्टामेंट आणि पॅट्रिस्टिक या ग्रंथांचं पहिलं संपादन इरास्मस यांनी केलं आणि अभिजात साहित्यात मोलाची भर घातली. त्यांनी सुमारे ५ शतकांपूर्वी मूळ लॅटिनमध्ये लिहिलेल्या “The Praise of Madness” हा उपहासात्मक ग्रंथाची आजही पारायणं केली जातात.
त्या काळातल्या विसंगती आणि विकृती उपहासाच्या माध्यमातून त्यांनी समाजासमोर मांडल्या. शतकं उलटल्यानंतरही या विसंगती आणि विकृती अजूनही बऱ्याच अंशी कायम असल्याने या ग्रंथातला उपहास आजही तितकाच लागू पडतो.
इरास्मस यांनी धर्माच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाचा पाया घालून दिला. विशेषत: ग्रीक नवीन करार आणि चर्चमध्ये धर्मगुरूंच्या प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या जुन्या अभ्यासक्रमांच्याऐवजी इरास्मस यांच्या शैक्षणिक लेखनाने धर्मशास्त्राचा मानवतावादी अर्थ समोर आणला. धर्मवाद्यांच्या चांगल्या कामाचा गौरव करतानाच त्या काळातल्या चर्चच्या गैरवर्तनांवर टीका करून त्यांनी सुधारणेचा आग्रह धरला. त्याची परिणिती प्रोटेस्टंट सुधारणा आणि कॅथोलिक पंथांमध्ये प्रतिसुधारणेत झाली.
अखेर इरास्मस यांच्या स्वतंत्र आणि निष्पक्ष भूमिकेने पोपसमर्थक आणि पोपविरोधी अशा दोन्हीकडच्या लोकांमध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल नाराजी निर्माण झाली. मात्र, स्वतः इरास्मस यांनी धार्मिक कट्टरतावादापेक्षा व्यक्तिस्वातंत्र्याला अधिक महत्त्व दिलं आणि या तत्वाचा अंगीकार करणाऱ्यांना प्रोत्साहनही दिलं.
इरास्मस यांची निष्पक्ष धर्मचिकित्सक बनण्याची इच्छा होती. पाप आणि वाईटपणा या मूलभूत शत्रूंशी लढण्यासाठी आणि ‘प्राचीन धर्मशास्त्र’ समजून घेण्यासाठी केवळ प्रार्थना आणि बायबल एवढं पुरेसं नाही. त्यासाठी प्राचीन मूर्तिपूजक ग्रीक आणि रोमन कवी आणि दार्शनिक यांच्या साहित्याचा आभास आवश्यक आहे. अर्थातच, त्यासाठी ग्रीक भाषेवर प्रभुत्व असायला हवं असा त्यांचं मत बनलं होतं.
फ्रान्समध्ये आर्टोइसच्या दौऱ्यावर असताना (१५०१) इरास्मस यांची भेट धडाडीचे धर्मोपदेशक जीन व्हॉइरियर यांच्याशी झाली. स्वतः धर्मगुरू असूनही त्यांची, मठवाद हा खऱ्या धार्मिक नाही तर भामट्या लोकांसाठी बनवण्यात आला आहे, अशी रोखठोक धारणा होती.
व्हॉईरिएर यांनी इरास्मस यांना ओरिजेन यांच्या लिखाणाची एक प्रत दिली, ते ग्रीक ख्रिश्चन लेखक होते, त्यांनी शास्त्रवचनाच्या विवेचनाच्या रूपकात्मक, आध्यात्मिक पद्धतीचा प्रचार केला. त्यांच्या विचाराचं आणि मांडणीचं मूळ प्लेटोनिक तत्वज्ञानात होते. सन १५०२ पर्यंत इरास्मस ‘युनिव्हर्सिटी टाउन ल्यूवेन’ इथे स्थायिक झाले आणि त्यांनी ग्रीकमध्ये ओरिजन आणि सेंट पॉल यांच्या लिखाणाचा अभ्यास केला.
या परिश्रमांचं फळ म्हणजे ‘एन्चिरिडियन मिलिटिस क्रिस्टियानी’ ( हँडबुक ऑफ ख्रिश्चन नाईट) हे पुस्तक त्यांनी लिहून हातावेगळं केलं. या पुस्तकाद्वारे ‘ख्रिश्चन राजपुत्र कसा असावा’, हे सांगण्याच्या ओघात इरॅस्मस यांनी वाचकांना शास्त्रवचनांचा अभ्यास करून आणि त्यावर मनन करून ख्रिस्ताच्या शिकवणी आचरणात आणण्याचं आवाहन केलं आहे.
एन्चिरिडियन हा खऱ्या धार्मिकतेचा जाहीरनामा होता. त्यात ‘मठवाद’ म्हणजे धर्मनिष्ठा नाही, हे इरास्मस यांनी ठासून सांगितलं. आद्य धर्मशास्त्रज्ञ, चिकित्सक म्हणून इरास्मस यांचं काम पुढे चालूच राहीलं. ग्रीक नव्या करारावरच्या व्हॅला यांच्या निरूपणाच्या हस्तलिखित इरास्मस यांनी पार्क ऍबी इथे शोधून काढल्या.त्या त्यांनी सन १५०५ मध्ये प्रकाशित केल्या.
इरास्मस यांचा शिक्षणाच्या सामर्थ्यावर असलेला प्रचंड विश्वास ‘डे प्युरीस इन्स्टिट्यूएन्डिस,’ या इटलीमध्ये असताना लिहिलेल्या पुस्तकात ठामपणे प्रतिपादन करण्यात आला आहे. मात्र, हे पुस्तक सन १५२९ पर्यंत प्रकाशित झालं नाही.
अथक परिश्रमाने मानवी स्वभाव घडवता येतो. लोकांना वाईट गोष्टींपासून परावृत्त करून चांगल्या गोष्टींकडे वळवता येईल. एकेका व्यक्तीचाच नव्हे तर संपूर्ण समाजाचं एक विधायक समाजमन घडवणं शक्य आहे. ख्रिश्चन धर्मग्रंथातील सदुपदेश माणसांच्या मनावर योग्य प्रभाव पाडतील, चांगल्या साहित्याच्या माध्यमातून लोकांचं मन विधायकतेने भरता येतं आणि किंग आर्थरच्या सूडकथांसारख्या साहित्याने वाचकांच्या मनात नकारात्मक भावना वाढतात, असा इरास्मस यांचा ठाम दावा होता.
केवळ हे दवे करून ते थांबले नाहीत. उत्तम साहित्य लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी इरास्मस यांनी पुढे जोहान फ्रोबेनच्या मुद्रणालयाशी करार केला आणि ‘अडागिया’ची नवीन आवृत्ती तयार करण्यासाठी बेसल गाठलं. या आणि त्याच काळातील इतर कामांमध्ये इरास्मसने ख्रिश्चन समाजातील वाईट प्रथा आणि चालीरीतींवर टीका करण्याचं धैर्य दाखवलं.
युद्धखोर वृत्तीने पोप यांनी येशू ख्रिस्तचं नव्हे तर सीझरचे अनुकरण केलं आणि य:कश्चित वैयक्तिक सूडभावनेपोटी देशांना युद्धात खाईत ढकलले. असे राजपुत्र; आणि धर्मोपदेशक युद्धाची घोषणा करून आपण नामानिराळे राहतात आणि युद्धाचे दुष्परिणाम सामान्यांना भोगावे लागतात, हे इरास्मस यांनी परखडपणे सुनावलं. धर्मगुरू लोकांना शहाणे करण्याऐवजी त्यांच्यात अंधश्रद्धा निर्माण करून आपल्या तुंबड्या भरतात, यावर देखील त्यांनी कठोर टीका केली.
समाजातल्या या सगळ्या वाईट गोष्टींवर उपाय म्हणून इरास्मस शिक्षणाकडे मोठ्या आशेने पाहिलं. विशेषतः, धर्मगुरू आणि प्रचारकांचे प्रशिक्षण हे विद्वानांच्या पद्धतींऐवजी ख्रिस्ताच्या तत्त्वज्ञानावर आधारित असले पाहिजे. असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी ग्रीक नवा करार, त्यावरचे भाष्य आणि सेंट जेरोम यांच्या ऑपेरा ओम्नियाच्या यांच्या आवृत्ती प्रसिद्ध केल्या. हे ग्रंथच लोकांना जगण्याचे योग्य मार्ग दाखवतील; असा त्यांना विश्वास होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.