आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. आयपीएलने भारतातील अनेक अज्ञात खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी दिली. हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि जसप्रीत बुमराह सारखे खेळाडू आपण कसे विसरू शकतो, ज्यांनी आयपीएलमधूनच आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या खेळाडूंनी आज भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आणि आपल्या कामगिरीने देशाचा मानसन्मान वाढवत आहेत. आयपीएलने काही खेळाडूंना नावलौकिक मिळवून दिला तर काही खेळाडू मात्र मैदानावरून गायबच झाले आहेत.
आयपीएलच्या झगमगाटी विश्वात काही खेळाडू असेही आहेत ज्यांनी एकेकाळी आपल्या दमदार खेळाने प्रेक्षकांचे आणि क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. पण, आज हे खेळाडू कुठे आहेत हेही अनेकांना माहिती नाही.
पॉल वाल्थटी हे ही असेच एक नाव जे काही काळ क्रिकेटच्या मैदानावर काजव्यासारखे चमकून गेले. २०११ च्या आयपीएल सिझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्स विरोधात दमदार शतक ठोकणाऱ्या या फलंदाजाने सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे आकर्षून घेतले होते. त्यानंतर मात्र हळूहळू हा खेळाडू क्रिकेटच्या मैदानावरून गायब झाला हे कुणाच्या लक्षातही आले नाही.
आयपीएलमध्ये खेळणारे संघ हे एकमेकांना पुरून उरतात. त्यातही चेन्नई सुपरकिंग्सला ऑस्ट्रेलियन संघाचा दर्जा आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो दबदबा ऑस्ट्रेलियन संघाचा आहे तोच दबदबा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा आहे.
हा संघ कधी सामन्याचा निकाल पलटवून टाकेल सांगता येत नाही. २०११च्या आयपीएल चेन्नईकडेच जाणार असा अनेकांचा दावा होता. त्यात या संघाचा कप्तान महेंद्र सिंग धोनी आपल्या जिद्दी खेळासाठीच ओळखला जात होता.
तर पंजाब संघाने आपल्या संघाची रचनाच यावेळी बदलून टाकली होती. पंजाब संघाचे कर्णधार पद यावेळी गिलख्रिस्टकडे देण्यात आले होते. त्याने आपल्या संघात जास्तीत जास्त तरुण खेळाडूंची भरती करण्यावर जोर दिला होता.
चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि १८८ धावांचा मोठा डोंगर उभा केला. यात विजयच्या ७४ आणि बद्रीनाथच्या ६६ धावांची खूप मोठी मदत झाली होती. तर धोनीने २२ चेंडूत ४४ धावांची कामगिरी करून दाखवली होती.
१८८ धावांचे हे लक्ष्य पूर्ण करणे पंजाबसाठी तरी कठीणच आहे, असा सर्वांचा अंदाज होता. चेन्नईच्या संघात अश्विन, मोर्केल, सुरज रणदिव सारखे सरस गोलंदाज होते. त्याच्या चेंडूला प्रत्युत्तर देणे पंजाब संघाला जमेल असे वाटत नव्हते. एडमची रणनीती काय असेल याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. ऍडमसोबत मैदानावर भागीदारी करण्यासाठी कोण येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती.
ऍडम पॉल वाल्थटीसोबत मैदानावर आलेला पाहून अनेकांना धक्काच बसला. अशा नवख्या खेळाडूसोबत भागीदारी करण्याचा निर्णय त्याने नेमका कोणत्या उद्देशाने घेतला याचेच सर्वांना आश्चर्य वाटत होते. पण पॉलची बॅटिंग सुरु झाली तेव्हा सगळ्यांना याचे उत्तर मिळाले.
आयपीएलसारख्या मोठ्या खेळात आपले कर्तुत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे, याचे भान ठेवून पॉलने आपल्या कौशल्याची अविश्वसनीय चुणूक दाखवली. त्याने हा सामानाच अविस्मरणीय करून टाकला.
१८९ धावांचे लक्ष्य गाठणे खुद्द पंजाब संघातील खेळाडूंनाचा अशक्य कोटीतील गोष्ट वाटत होती. तिथे या नवख्या खेळाडूने मात्र सर्वांना अचंबित करून सोडले. पॉलने ६३ चेंडूत १२० धावा करून पंजाबच्या विजयाला आकार दिला.
त्याच्या या धावांमुळे पंजाबला आपले लक्ष्य गाठणे सहज शक्य झाले. यावेळी त्याने १९ चौकार आणि २ षटकार ठोकले होते.
त्याच्या या सुरुवातीच्याच दमदार खेळानंतर दुसऱ्या फेरीतही पॉलने ४७ चेंडूत ७५ धावा करत पुन्हा एकदा आपल्या दमदार खेळाची चुणूक दाखवली. या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या. त्यानंतर पुन्हा एकदा ४६ धावांचा खेळ करून आयपीएलमधील आपण स्टार खेळाडू असल्याचे सिद्ध केले.
पॉलच्या रुपात भारतीय क्रिकेटला एक नवा तारा मिळाला आहे, अशीच सर्वांची समजूत झाली होती. मात्र पॉलच्या बाबतीत ही समजूत साफ खोटी ठरली.
या खेळानंतर पॉलला आणखी एक दोनदा खेळण्याची संधी मिळाली. पण त्यावेळी पॉलचा सूर पूर्णतः हरवला होता. त्याची आक्रमक शैलीची धार बोथट झाली होती. त्याच्या खेळाचा फॉर्मच हरवला होता. नंतर नंतर तर त्याच्या खेळाची अवस्था अशी झाली की त्याला दहा धावाही धडपणे पूर्ण करता येईना झाल्या. शेवटच्या काही खेळात तो दहापेक्षाही कमी धावांत तंबूत परतला.
नशीब एखादीच संधी देते आणि पुन्हा तोंड फिरवते, हे पॉलच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरले. पहिल्याच सामन्यात त्याने जी आक्रमक आणि दमदार खेळी केली तसा खेळ त्याला पुन्हा जमला नाही.
२०१३मधे त्याने हैदराबाद विरुद्ध खेळलेला सामना त्याचा शेवटचा सामना ठरला. या सामन्यात त्याला फक्त सहा धावा करता आल्या.
त्याच्या या खराब खेळामुळे त्याला आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आयपीएल तर सोडाच नंतर त्याला रणजी खेळण्याचीही संधी मिळाली नाही. त्याने आयपीएलमधे एकूण २३ सामने खेळले आणि या सामन्यात त्याने सरासरी २२.९५ प्रमाणे ५०५ धावा काढल्या. ज्यात एक शतक आणि दोन अर्ध शतकांचा समावेश आहे. गोलंदाजी बघितली तर त्याने ७ विकेट घेतल्या आहेत. २९ धावा सोबत ४ विकेट हा त्याचा बेस्ट स्कोअर ठरला आहे.
अजूनही त्याला आपल्या या खेळाची लय सापडलेली नाही. त्याची आत्ताची स्थिती पाहता तर त्याला पुन्हा संघात स्थान मिळण्याची शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नाही. आयपीएलच्या नंतरच्या सिजनमध्येही कुठलाही संघ त्याला संधी देण्यास तयार नाही.
आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर पॉल सध्या एअर इंडीयामधे नोकरी करतो. त्याने एअर इंडीयातर्फे काही मॅचेस सुद्धा खेळल्या आहेत. याशिवाय, तो मुंबईतील होम ग्राउंड क्रिकेट अकादमी येथे लहान मुलांना क्रिकेटचे धडे देतो आहे.
आयपीएलच्या झगमगाटात असे किती पॉल येतात आणि जातात. ज्यांना टिकून राहणे जमले तेच इथे आपले नाव कमवू शकतात. ज्यांची लय हरवली ते असेच विस्मृतीत निघून जातात. पॉल हे असे एक उदाहरण झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.