आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
स्वातंत्र्य, एक माया! कोणाला ही अतिशयोक्ती वाटेल, पण खरंच असं आहे का? माणसाला कितीही आणि कशापासूनही स्वातंत्र्य मिळालं, तरी एका बंधनात तो सदैव अडकलेला असतोच, अगदी जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत! ते बंधन म्हणजे वेळ! वेळ ही अशी गोष्ट आहे ज्यापासून आजपर्यंत माणूसच काय तर देव आणि संत यांचीही सुटका झाली नाही, ‘यदा यदा’ ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत”, असं म्हणताना, धर्म ज्या ज्या वेळी संकटात येईल, हे सांगतानाही ती “वेळ” परमेश्वराला बंधनकारक आहेच.
माणसाच्या मनगटावर घड्याळ असो-नसो, तो मात्र सदैव वेळेला बांधला गेलेला आहे, याची प्रचिती मुंबईत रहायला गेल्यावर येते. जर माणसाचं आयुष्य या वेळेला बांधलं गेलं असेल तर आयुष्यातल्या कामांबरोबरच वेळेच नियोजन होणं हे बंधनकारक होऊन बसतं, अर्थात आयुष्यात काही अर्थपूर्ण कामं करायची असतील तर. नियमन आणि नियोजन करण्यासाठी तो वेळ मोजला गेला पाहिजे.
मानवाच्या उत्क्रांतीबरोबरच वेळेच्या मोजमापाची उत्क्रांती होत गेली, या दोन्ही गोष्टी परस्परांवर अवलंबून असतील काय?
ते काहीही असो. पण कोणताही माणूस वेळ पाळत जगत असेल तर त्याच्या आयुष्यात एक शिस्तबद्धता येते, “विद्या विनयेन् शोभते” या उक्तीप्रमाणे शिस्तबद्धता असेल तरच असलेल्या कोणत्याही प्रकारच्या विद्येला अथवा कामाला महत्त्व आहे. कारण विद्येबरोबर बेशिस्तपणा असेल, तर त्या विद्येचा गैरवापर होण्याच्या शक्यता वाढतात. नैसर्गिकरित्या माणसाचं मन हे वाईट गोष्टींकडे प्रवृत्त असतं, त्यातही मनाचे असे चोचले पुरवले गेले तर तीच सवय लागून वर सांगितल्याप्रमाणे त्या विद्येचा अथवा कामाचा गैरवापर होण्याच्या शक्यता वाढतात.
म्हणूनच आपल्यासारख्या ज्ञानाधिष्ठित आणि कर्माधिष्ठित मनुष्यप्राण्यांना वेळेचं नियोजन करण्याची गरज असते, जे वेळेचं मोजमाप केल्याशिवाय शक्य होणार नाही. मानवाच्या इतिहासात वेळेच्या मोजमापासाठी अनेक क्लुप्त्या आणि सूत्रं वापरली गेली. त्यामध्ये आज जी कालगणना वापरात आणली जाते, ती मानवाच्या दृष्टीने सर्वांत अचूक आणि सूक्ष्म कालगणना.
या पूर्वी कालगणनेचे अनेक प्रकार होते. उदाहरणादाखल – प्रहरावर आधारित कालगणना, एका दिवसाचे आठ प्रहर, आणि एक प्रहर आजच्या कालगणनेच्या भाषेत तीन तासांचा.
साधारण सोळाव्या-सतराव्या शतकात काचेच्या मध्यभागी निमुळत्या आणि दोन्ही बाजूला गोलाकार, बल्बसारखा भाग असलेल्या भांड्यात वाळूच्या प्रवाहाच्या सहाय्याने वेळेचं मोजमाप केलं जायचं.
भारतात अगदी वैदिक काळापासून वेळेच्या मोजमापाची परिमाणं असल्याचं आढळून येतं. पण या ना त्या कारणाने ती कालगणना सामान्यांपर्यंत पोहोचली नसावी. वैदिक काळ कोणता हे आजच्या कालगणनेच्या भाषेत ठामपणे सांगता येत नाही, पण साधारणतः ख्रिस्तपूर्व १५०० किंवा त्याच्या मागे-पुढे वैदिक काळ असावा असं आपण गृहीत धरू.
वेदकाळात सूर्य सिद्धांतानुसार काळाची गणना व्हायची. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण ही कालगणनेची परिमाणं अत्यन्त सूक्ष्म पातळीची होती होती, विज्ञान आणि गणिताच्या भाषेत बोलायचं झालं तर “परमाणू” म्हणजे २६.३ मायक्रो-सेकंद म्हणजेच ०.०००००२६ सेकंद. अशाच काही परिमाणांचं कोष्टक काहीसे खालीलप्रमाणे होते-
अणू : २ परमाणू: ०.०००००५२६७ सेकंद
त्रासारेणू: ३अणू: ०.००००१५८ सेकंद
त्रुती: ३ त्रासारेणू: ०.००००४७४ सेकंद
वेध: १०० त्रुती: ०.०४७४ सेकंद
लव: ३ वेध: ०.१४ सेकंद
निमेसा: ३ लव: ०.४३ सेकंद
क्षण: ३ निमेसा: १.२८ सेकंद
कष्ठ: ५ क्षण: ६.४ सेकंद
लघू: १५ कष्ठ: ९६ सेकंद (१.६ सेकंद)
दंड: १५लघू: १४४० सेकंद (२४ मिनिटे)
मुहूर्त: २ दंड: २८८० सेकंद (४८ मिनिटे)
अहोरात्र: ३० मुहूर्त: ८६,४०० सेकंद (२४ तास)
मास: ३० अहोरात्र: २५,९२,००० सेकंद
ऋतू: २ मास: ५१,४८,००० सेकंद
अयन: ३ ऋतू
संवत (वर्ष): २ अयन (१२ मास)
“अणुपासोनी ब्रह्मांडाएवढे” होत जाणारी ही परिमाणं फक्त संवतावर थांबत नाहीत, या संवतांचं गणित पुढे कल्प, प्रलय, महाकल्प, मानवंत्र, चतुर्यग आणि पुढे त्या चतुर्यगाची विभागणी कृत, त्रेता, द्वापर, कली अशी केलेली दिसते, यातही अनेक वेगवेगळ्या विभागण्या आहेत त्या संक्षिप्तात सध्यातरी जात नाही.
जगातील अन्य कोणत्याही कालगणनेपेक्षा अचूक आणि अतिसूक्ष्म गणनेपासून ते अफाट गणना ही वैदिक कालगणना म्हणावी लागेल.
वर सांगितल्याप्रमाणे या गणनेची सूत्र काही कारणांन्वये सामान्यांपर्यंत पोहोचली नाहीत, त्यामुळे ती सूत्रं “घड्याळांसारखी” यंत्रबद्ध झाली नाहीत आणि कैक वेळा कालगणनेच्या अभावामुळे काळ-वेळेचं नियोजन न करण्याने भारताला अनेक युद्धांच्या आघाड्यांवर पराभव पत्करावे लागले. त्यामुळे आपली अधोगती होत राहिली आणि त्या अधोगतीचा कळस म्हणजे मूळ वेद आणि त्या वेदांचं सार असलेला वेदांत यांचा जवळजवळ विसर भारतीय समाजाला पडला.
ज्या योद्ध्यांनी वेळेचं आणि त्याच बरोबर माणसांचं अचूक नियोजन केलं ते योद्धे अजिंक्य राहिले. उदाहरणादाखल, अफजलखानाला मारल्यानंतर काही क्षणांत दांडपट्टा फिरवणारा सय्यद बडा शिवाजीराजांवर वार करणार, इतक्यात अचूकपणे ती वेळ साधून जिवा महालेंनी सय्यदचा हात वरचेवर दांडपट्ट्यानेच कापला. इथे एका क्षणाचा विलंब झाला असता असता तर? कदाचित तुम्ही-आम्ही आज मराठी लिहू-वाचू शकलो नसतो. या उलट पन्हाळ्याच्या लढाईत नेतोजी पालकरांना काही अवधीचा उशीर झाल्याने जवळजवळ हजारभर मावळे खर्ची पडले.
असो. पण वर वर्णन केल्याप्रमाणे वेदांमधील कालगणनेच्या सूत्रांना यंत्रबद्धता न आल्याने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली नाही. मग आले युरोपीय लोक, ज्यांनी गणित आणि विज्ञान तंत्रज्ञानाला वाव दिला होता, उपलब्ध असलेलं ज्ञान खुलं केलं होतं.
ब्रिटिश सत्तेने स्वार्थासाठी भारतात जी “आधुनिक” म्हणवली जाते, अशी शिक्षणपद्धती, यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानही आणलं, पण ते राष्ट्र म्हणून भारताच्या उत्थानासाठी नव्हे तर व्यापारामध्ये फायदा व्हावा यासाठी. त्याच दृष्टिकोनातून रेल्वे आली, ट्राम वगैरे आले.
इसवी सन १८०२ मध्ये जॉन गोल्डिंगम या भारतातील इस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटीश खगोलशास्रज्ञाने मद्रास कालक्षेत्र स्थापन केलं. मद्रासचं रेखावृत्त ग्रीनवीच प्रमाणवेळेच्या ०५ तास, २१ मिनिटे, १४ सेकंद पुढे असल्याचा निष्कर्ष जॉन गोल्डिंगमने काढला.
*ग्रीनवीच प्रमाणवेळ म्हणजे ग्रीनवीच, लंडन येथील वेधशाळेतील सरासरी सौर वेळ, सौर वेळ अर्थात आकाशातील सूर्याच्या स्थितीच्या सहाय्याने केलेली कालगणना.
मद्रास कालक्षेत्र “यु.टी.सी.+५.३०” पासून ०८ मिनिटे, ४६ सेकंद आणि कलकत्ता कालक्षेत्रापासून ३२ मिनिटे ०६ सेकंद मागे होतं, म्हणूनच मद्रास कालक्षेत्रालाच “यु.टी.सी.+५.२१.१४” असंही म्हणता येईल.
*यु.टी.सी. म्हणजे एखाद्या जागेची वेळ वैश्विक वेळेच्या तुलनेत मागे अथवा पुढे असणे. म्हणजेच UTC+01 किंवा UTC+01:00 किंवा UTC+0100 असं आढळल्यास ते वैश्विक वेळेच्या एक तास पुढे आहे, असा त्याचा अर्थ.
यु.टी.सी.+५.३० हे कालक्षेत्र भारत आणि श्रीलंकेत अधिकृतरित्या वापरलं जातं, पूर्वी हे प्रमाण नेपाळमध्येही वापरलं जात.
इसवी सन १८८४ मध्ये मुंबई (तेव्हाचं बॉम्बे) कालक्षेत्र आणि कलकत्ता कालक्षेत्र हे ब्रिटिश भारताचे अधिकृत कालक्षेत्रं ठरवले गेले. यानंतर भारतीय रेल्वे कम्पन्यांनी मद्रास कालक्षेत्र हे या दोन्ही कालक्षेत्रांदरम्यानचं कालक्षेत्र म्हणून वापरायला सुरुवात केली, जेणेकरुन रेल्वेच्या वेळा अचुकरीतीने साधल्या जाव्यात, या मुळेच मद्रास कालक्षेत्राला “भारतीय रेल्वेचं कालक्षेत्र” म्हणतात.
मुंबई आणि कलकत्ता ही दोन्ही कालक्षेत्रं इसवी सन १८८४ मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. येथे एका आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेदरम्यान स्थापन करण्यात आली. मुंबई कालक्षेत्र हे ग्रीनवीच प्रमाणवेळेपासून ४ तास ५१ मिनिटे पुढे आहे.
०१ जानेवारी, इसवी सन १९०६ रोजी ब्रिटिश सरकारने भारतीय प्रमाणवेळ (आय.एस.टी.) स्विकारली. पण मुंबईमध्ये मुंबई कालक्षेत्राचं भारतीय प्रमाणवेळेत रूपांतर होताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांवर खटला सुरू होता.
खटला चालवल्या कारणाने सरकारविरोधी जनभावनेमुळे बॅरिस्टर फिरोजशहा मेहता यांनी या कालक्षेत्र बदलाला विरोध दर्शवला, आणि लोकांना विश्वासात न घेता कारभार सुरू आहे असं म्हणत बॉम्बे महानगरपालिकेचं कामकाज काही दिवस बंद ठेवलं. लोकमान्यांवर चालवल्या गेलेल्या खटल्यामुळे जनतेमध्ये रोषाचं वातावरण निर्माण झालं होतं, यामुळेच तत्कालीन ब्रिटिश सरकारला कालक्षेत्रातील हा बदल घडवून आणता आला नाही.
म्हणूनच मुंबई कालक्षेत्र (मुंबई टाइमझोन) हा स्वातंत्र्योत्तर भारतातही १९५५ पर्यंत स्वतंत्रपणे अधिकृत होता.
या दोन कालक्षेत्रांव्यतिरिक्त ‘पोर्ट ब्लेअर प्रमाण वेळ’ ही सुद्धा प्रमाणवेळ होती, ही प्रमाण वेळ बंगालच्या खाडीतील अंदमान-निकोबार बेटांसाठी १९व्या शतकाच्या सुरूवातीला ठरवून देण्यात आली होती. ०१ जानेवारी १९०६ रोजी या प्रमाणवेळेचं सुद्धा भारतीय प्रमाणवेळेत रूपांतर करण्यात आलं.
आजमितीस आपण भारतीय प्रमाण वेळ (आय.एस.टी.) अधिकृतरित्या वापरत आहोत. जगाच्या तुलनेत तयार केलेली प्रमाण वेळ जरी ब्रिटिशांनी भारताला दिलेली असली, नव्हे, तर त्या वेळी ब्रिटीश साम्राज्य भारतात असल्या कारणाने ती ब्रिटिशांद्वारे भारतात आली.
ब्रिटिश भारतात नसते तर अशी “प्रमाणवेळ”, यु.टी. सी. वगैरे गोष्टी भारतात आल्या नसत्या का? उशिरा का होइना, पण निश्चितच आल्या असत्या!
आधीही सांगितल्याप्रमाणे भारतीय प्राचीन ग्रंथांत सांगितलेली कालगणनांची सूत्र ही सर्वसामान्यांना उपलब्ध नव्हती, ज्यामुळे त्या सूत्रांची यंत्रबद्धता किंवा प्रत्यक्ष आयुष्यातही वापर कमीच झाला. पण ब्रिटिश सरकारला वेळेच्या नियोजनाची अत्यन्त मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासल्याने त्यांनी भारताला प्रमाण वेळ बहाल केली.
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीत असेच गाफील राहिलो, तर प्रगती खुंटतच जाणार आहे, मागच्या अनेक दशकांत भारताने विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे, आणि या पुढेही अविरतपणे तंत्रज्ञान क्षेत्रात विश्वकल्याणाची भावना मनात ठेऊनच पण ‘देशद्रोही तितुके कुत्ते, मारोनी घालांवे परते’ हे न विसरता यशाची अनेक शिखरं भारत देश गाठत राहील हीच सदिच्छा!!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.