आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
रिक्षा किंवा ऑटोरिक्षा हे सर्वसामान्य लोकांचे वाहन मानले जाते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध करून देण्याचा प्रश्न उभा राहिला तेंव्हा त्या समस्येवर उपाय शोधताना या रिक्षाचा जन्म झाला.
भारतात आज सर्रास प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरातून, गावातून इतकेच काय तर अगदी खेड्यातूनही या रिक्षा धावताना दिसतात. रिक्षा पहिल्यांदा १९४९ साली भारताच्या रस्त्यावरून धावू लागल्या. यानंतर कित्येक मोठमोठी वाहने आली, मेट्रो आली आणि कित्येक वाहने नामशेषसुद्धा झाली तरी, रिक्षा मात्र आजही भारतीय रस्त्यावरून अशी धावते आहे, जसे धमन्यांतून रक्त.
भारतातील छोट्यातील छोट्या खेड्यांनाही एकमेकांशी आणि शहराशी जोडणारी ही छोटी रिक्षाच तर आहे, ज्यामुळे आज भारतातील दळणवळण सुलभ झाले आहे.
भाजीपाला मार्केटमध्ये पोहोचवण्यापासून ते लहान मुलांना शाळेत पोहोचवण्यापर्यंत कित्येक छोटी-मोठी कामे आज हिच्यावरच तर अवलंबून आहेत. इतके महत्त्व असणाऱ्या या रिक्षाच्या जन्माची कथाही तितकीच रोचक आहे.
स्वातंत्र्यानंतर भारतीय जनता फाळणीच्या आगीतून होरपळून निघाली होती. सरकारसमोर दुहेरी पेच होता, एक तर धार्मिक दंगली थांबवणे आणि दुसरे देशाला उभे करण्यासाठी अर्थव्यवस्थेला गती देणे.
समाजातील हरवलेला समतोल पुन्हा स्थापित करणे आणि त्याचवेळी नागरिकांचे राहणीमान सुधारणे ही कसरत एकाच वेळी करावी लागणार होती. यासाठी काही प्रमुख उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून पंचवार्षिक योजना आखण्यात आल्या.
याचवेळी कुणीतरी मानवी शक्तीवर ओढली जाणारी ढकलगाडी ही अमानुषतेचे प्रतिक असल्याची चर्चा सुरु केली. मुंबई प्रांताचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी लागलीच या ढकलगाड्या बंद करण्याचे आदेश काढले. परंतु, भारतीय शहरांना आणि खेड्यांना जोडणारा एक दुवा तर हवाच होता. कमी खर्चात सार्वजनिक वाहतुकीसाठी कोणते उपाय योजता येतील यावर विचार सुरु झाला.
तेव्हा नवलमल कुंदलमल फिरोदिया यांना एक संधी दिसली त्यांनी तीनचाकी मालवाहतूक गाडीची कल्पना मांडली. त्यांनी देसाईसमोर एक योजना सादर केली आणि म्हणाले की, तांत्रिकदृष्ट्या जर ही योजना सफल झाली तर, सार्वजनिक स्वरुपात आणण्यासाठी याला परवानगीची गरज लागेल.
त्यानंतर फिरोदिया यांची जय हिंद इंडस्ट्रीज आणि बछाराज ट्रेडिंग कार्पोरेशन (नंतर बजाज ऑटो प्रायव्हेट लिमिटेड) यांनी या योजनेतील तीन चाकी गाडी बनवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
फिरोदिया यांनी एक स्कूटर आणि एक तीनचाकी मालवाहतूक करणारी गाडी इटालियन कंपनीकडून विकत घेतली. या दोन्ही मॉडेल्सचा त्यांनी अभ्यास केला आणि आपल्या योजनेतील गाडी प्रत्यक्षात उतरेपर्यंत ते या मॉडेल्सच्या रचनेत नवनवे प्रयोग करत राहिले.
१९४८ साली याचे नवे मॉडेल नेहरूंसमोर सभागृहात सादर करण्यात आले. दोनचाकी आणि हाताने ओढली जाणारी ढकलगाडी यांचे ते एक आधुनिक मिश्रण होते. लवकरच हे नवे जुगाड भारतीय रस्त्यांवरून धावू लागले. हळूहळू ही इतके सामान्य बाब बनली की, भारतीयांच्या मनात याची छबी खोलवर रुतली गेली.
भारतातील शहरे आणि गावातून जास्तीतजास्त फेऱ्या मारता येतील आणि त्यासाठी त्यांना कमी पैसे मोजावे लागतील हे पाहण्यासाठी फिरोदिया यांच्यातील उद्योगपतीने कंबर कसली.
मुंबई प्रांतात त्याच्या या नव्या वाहनाला परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी पुण्यातही आपल्या या गाड्यांसाठी मार्ग खुला होत असल्याची संधी साधली. पुण्यात सायकल रिक्षावर बंदी घालण्यात आली.
त्याचवेळी १९५० साली बंगलोर संस्थानचे दिवाण एन केशव अय्यंगर यांनी देखील मैसूर प्रांतात दहा ऑटोरिक्षा चालवण्यास परवानगी दिली. ही रिक्षा म्हणजे जणू स्कूटरला ढकलगाडीचा मागचा भाग जोडला आहे अशी वाटावे, अशीच होती.
अय्यंगार यांनी बंगलोरमधील पहिल्या ऑटोरिक्षाचे उद्घाटन केले. लोक या ऑटोरिक्षाचे कौतुक करत असतानाच बंगलोरतील ढकलगाडीवाले आणि पुण्यातील सायकल रिक्षा चालवणारे मात्र नाराज झाले होते.
बजाज ऑटोचे संस्थापक कमलनयन बजाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सुरुवातीला आम्हाला १०० स्कूटर आणि ऑटोरिक्षाचे उत्पादन करण्याची परवानगी मिळाली होती. नंतर नंतर हा आकडा वाढत गेला. १९६३ साली आम्ही २४,००० ऐवजी ४८,००० स्कूटर्सची निर्मिती करण्यासाठी परवानगी मागितली. १९७१ साली आम्हाला सरकारने ४८,००० स्कूटर्सची निर्मिती करण्याची परवानगी दिली.”
बजाज कंपनीकडे ऑटोरिक्षा निर्मितीचे अधिकार आल्यावर फिरोदिया आणि बजाज यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. त्याचवेळी बंगलोरमधील ऑटोरिक्षाची संख्या दहावरून चाळीसवर पोहोचली होती.
मध्यमवर्गीय भारतीयांना स्वतःचे वाहन घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळेच परवडणाऱ्या दरात सार्वजनिक वाहतुकीसाठी रिक्षा हाच पर्याय योग्य होता.
अर्थात, फक्त भारतातच नाही तर विकसित देशांचीही हीच अवस्था होती. १९७३पर्यंत बजाज ऑटो नायजेरिया, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, सुदान, हॉंगकॉंग, येमेन या देशांतही ऑटोरिक्षांची निर्यात करू लागली.
१९७७ साली कंपनीने रिअर इंजिनवाले ऑटोरिक्षा आणल्या आणि त्यावर्षी एक लाख ऑटोरिक्षा विकल्या गेल्या. १९८०पर्यंत या रिक्षातून एकावेळी फक्त दोन प्रवासी नेण्याची परवानगी होती. पुढच्या दशकात यात थोडा बदल झाला. आज ऑटोरिक्षात रिक्षावाले जितके प्रवासी बसवतील तितके प्रवासी बसवून नेले जातात.
आजपर्यंत, इएमबीएआरक्यूच्या डाटानुसार, १० ते ४० लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरात १५ ते ३० हजार रिक्षा धावतात. तर, ४० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांत ५० हजारपेक्षा जास्त रिक्षा धावतात.
रिक्षाने अंदाजे ५० लाखांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
विशेष म्हणजे रिक्षा चालक संघटना ही देशातील संघटीत कामगारांची एक मोठी संघटना आहे. त्यामुळे बंद, आंदोलन यांच्या माध्यमातून या कामगारांची आणि या क्षेत्राची परिणामकारकता दिसून येते.
रिक्षाची मागची बाजू म्हणजे या रिक्षा चालकांचे अभिव्यक्तीचे मध्यम असते. इथे आपल्या आवडत्या हिरोच्या पोस्टरपासून ते आपल्या विचारसारणीचे दर्शन करण्यापर्यंत अनेक करामती केलेल्या दिसून येतात.
रिक्षा चालक वाजवी दर आकारात नाहीत इथपासून ते त्यांना प्रवाशांच्या जीवाची जराही फिकीर नसते इथपर्यंत या रिक्षा चालकांच्यावर अनेक आरोप केले जातात. तरीही आजही सार्वजनिक वाहतुकीत रिक्षाचे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे ढळ आहे. गेल्या ७ दशकांपासून रिक्षा अखंडपणे भारतीय रस्त्यांवर धावतच आहे..
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.