आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एकीकडे क्रिकेट, बॉक्सिंग, कबड्डी, कुस्ती, बॅडमिंटन यांसारख्या खेळामध्ये भारतीय खेळाडू आपली कामगिरी उंचावत असताना जागतिक फुटबॉलमध्ये भारतीय संघाची कामगिरी ही यथातथाच आहे. बायचुंग भूतीया, भरत छेत्री असे एखाद दुसरे फुटबॉलपटू सोडले तर भारतीय खेळाडूंची आपल्याला नावे देखील माहीत नाहीत.
पण एकेकाळी भारतीय फुटबॉलचा संपूर्ण जगभर डंका वाजत होता. ६० च्या दशकात भारतीय फुटबॉल संघ यशाच्या शिखरावर होता. पी. के. बॅनर्जी, चुंन्नी गोस्वामी आणि तुलसीदास बलराम यांच्यासारख्या खेळाडूंनी भारतीय संघाला बलाढ्य बनवले होते. या खतरनाक त्रिकुटाने भारतीय संघाला अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात यश मिळवून दिले होते.
याच त्रिकुटाच्या बळावर भारताने १९५६ सालच्या मेलबर्न ऑलम्पिक स्पर्धेत थेट उपांत्यफेरीमध्ये धडक दिली होती. असा करणारा भारत पहिला आशियाई देश ठरला होता.
याच आपल्या फुटबॉल संघाने जकार्ता येथे झालेल्या १९६२ साली एशियाड स्पर्धेत १९५१ नंतर दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले होते.
१९६२ साली झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये भारत पहिल्याच सामन्यात दक्षिण कोरियाकडून २-० ने पराभूत झाला होता. पण नंतरच्या साखळी सामन्यात जपानला २-० ने तर थायलंडला ४-१ ने पराभूत करून भारतीय संघ उपांत्यफेरीत पोहचला.
थायलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात आशियामधील सर्वोत्तम डिफेंडर जरनेल सिंह प्रतिस्पर्धी खेळाडूच्या धडकेमध्ये गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यात दहा टाके पडले. भारताला हा सामना दहाच खेळाडूंनी खेळावा लागला, कारण त्याकाळी बदली खेळाडूचा नियम अस्तित्वात नव्हता.
दक्षिण व्हिएतनाम विरुद्धच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारतीय कोच रहीम यांनी जखमी जरनेल सिंह यांना सेंटर फॉरवर्डला खेळवून खूप मोठा जुगार खेळला. ते डिफेन्समध्ये खेळू शकत नव्हते जनरल सिंह यांच्या डोक्याला पट्टी होती, त्यांची जखम ताजी होती ते हेडर सुद्धा मारू शकत नव्हते.
पण कोच रहीम यांचा हा माईंडगेम होता. त्यांना माहीत होते की धिप्पाड दिसणाऱ्या जनरल सिंह यांना इतर आशियाई खेळाडू घाबरून असत. त्याशिवाय जनरल सिंह त्यांच्या सुरवातीच्या काळात हे सेंटर फॉरवर्ड स्थानी खेळत होते.
कोच रहीम यांची ही रणनीती कामी आली, सामन्याच्या अंतिम टप्यात चुन्नी गोस्वामी यांच्या थ्रू पासवर जर्नल सिंह यांनी गोल करून भारताला अंतिम फेरीत पोहचवले.
भारताचा अंतिम सामना दक्षिण कोरियाविरुद्ध होता. अंतिम सामान्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट गोष्ट घडली. यजमान इंडोनेशियाने त्या स्पर्धेसाठी इस्राईल व तैवानला निमंत्रित केले नव्हते.
यावरून यजमान इंडोनेशियावर टीका करताना भारतीय ऑलिम्पिक समितीचे प्रतिनिधी गुरुदत्त सोढी म्हणाले,
खेळामध्ये राजकारणाला थारा मिळता कामा नये यासाठी इंडोनेशियाने त्यांना आमंत्रित करायला हवे होते.
त्यांच्या वक्तव्याने एकच गदारोळ उडाला संपूर्ण इंडोनेशियन मीडिया, सरकार एवढेच काय सारे प्रेक्षकसुद्धा भारताच्या विरुद्ध झाले. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली होती की अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ मैदानावर जात असताना जनरल सिंह यांना बसमध्ये खाली बसून जावे लागले, संघ व्यवस्थापनाला भीती होती की लोक त्यांना ओळखून त्यांच्यावर दगडफेक करतील.
संपूर्ण वातावरण भारतीय संघाच्या विरोधात होते, बाकी सर्व खेळांमधील स्पर्धा आधीच संपल्या होत्या त्यामुळे इतर खेळातील भारतीय खेळाडू व भारतीय प्रेक्षकदेखील मायदेशी परतले होते. या अशा वातावरणामध्ये भारतीय संघ अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरला.
स्टेडियममध्ये एक लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक होते आणि सर्वजण भारतविरोधी घोषणा देत होते. त्यावेळी भारतीय संघामध्ये जोश भरण्यासाठी कोच रहीम यांनी भारतीय संघाकडून राष्ट्रगीत गाऊन घेतले. हाफ टाईममध्ये सुद्धा संपूर्ण टीमने परत राष्ट्रगीत गायले.
भारतीय संघाने चेंडूवर ताबा मिळवताच संपूर्ण स्टेडियम भारताविरुद्धच्या घोषणांनी भरून दणाणून जात होते. भारताच्या हाफमध्ये बॉल येताच प्रेक्षक इतका गोंगाट करत की रेफरीची शिट्टी सुद्धा ऐकू येत नव्हती. उलट त्यांच्या गोलपोस्टवर भारतीय खेळाडूंनी हल्ला केल्यास मात्र स्टेडियममध्ये स्मशानशांतता पसरत असे.
भारतीय संघासाठी कोणती दिलासादायक बाब म्हणावी तर ती एकमात्र होती. काल ज्या पाकिस्तानी हॉकी संघाने भारतीय संघाचा 2-0 ने अंतिम फेरीत पराभव केला होता तो पाकिस्तानी संघ प्रेक्षकांमधून घोषणा देऊन भारतीय संघांचे मनोबल वाढवत होता.
भारतीय संघ इतक्या जोशाने खेळत होता की त्यांना आपल्या दुखापतींचे देखील भान नव्हते. राईट बॅक त्रैलोक सिंह यांच्या पायाच्या करंगळीचे नख निघून पडले होते. त्यांनी बॉल अडवला किंवा शॉट मारला तर त्यांना असह्य वेदना होत होत्या पण खूप धैर्याने त्यांनी खेळावरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही.
जनरल सिंह यांच्या डोक्याची पट्टी देखील गळून पडली होती, त्यांचे संपूर्ण डोके रक्ताने भिजले होते पण त्यांनादेखील मैदान नाही सोडले.
भारताने अंतिम सामन्यासाठी 3-3-4 व्यूहरचना केली, युसूफ खान यांना बॅक फॉरवर्ड पोजिशनला खेळवले. तर दक्षिण कोरियाने 3-2-5 अशी पारंपरिक व्यूहरचना केली होती.
१७ व्या मिनिटाला भारताकडून पी के बॅनर्जी यांनी पहिला गोल नोंदवला आणि सामन्यात १-० अशी आघाडी मिळवली. २० व्या मिनिटाला जनरल सिंह यांनी भारताकडून दुसरा गोल केला आणि आघाडी २-० केली.
दुसऱ्या सत्रात १० मिनिटे शिल्लक असताना दक्षिण कोरियाने त्यांचा पहिला गोल नोंदवला पण नंतर सामना संपेपर्यंत अरुण घोष, त्रैलोक सिंह आणि पीटर थंगराज यांच्या मजबूत डिफेन्सने कोरियाला बरोबरीची अजिबात संधी दिली नाही.
आणि भारताने अंतिमसामना २-१ च्या फरकाने जिंकून सुवर्णपदक आपल्या झोळीत टाकले. पाकिस्तानच्या हॉकी खेळाडूंनी भारतीय फुटबॉल खेळाडूंना आपल्या खांद्यावर घेऊन जल्लोष केला. भारत-पाकिस्तानच्या क्रीडा इतिहासातील कदाचित हा एकमेव दुर्मिळ क्षण असेल.
परत आयोजकांनी भारताच्या आनंदावर विरजण टाकण्याचे काम केले. बक्षीस वितरण समारंभात फक्त ११ खेळाडूंनाच सुवर्णपदक देण्यात आले. पण नशीब आपलं की त्यांनी त्यांची ही चूक २० मिनीटांनी सुधरवली आणि उर्वरित ५ राखीव खेळाडूंनासुद्धा सुवर्णपदक देण्यात आले.
१९५२ नंतर प्रथमच भारतीय फुटबॉल संघाने कुठल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. भारताने आजपर्यंत मैदानामध्ये उतरवलेला फुटबॉलचा तो सर्वोत्तम संघ होता म्हणून जागतिक मीडियाने तत्कालीन संघाला ‘आशियाचा ब्राझील’ म्हणून गौरवले होते.
या विजयानंतर नऊ महिन्यांनी या विजयाचे सूत्रधार असणाऱ्या कोच रहीम यांचे फुफ्फुसांच्या कर्करोगाने निधन झाले. आणि त्यांच्यासोबतच भारतीय फुटबॉल संघाचे सुवर्णयुग देखील दफन झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.