आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतीय संघाने बऱ्याचदा परदेशी जमिनीवर क्रिकेटमध्ये चमत्कार घडवला आहे. आपल्या विजयाबरोबर भारतीय संघाने अनेक रेकॉर्ड देखील बनवले आहेत. क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाच्या रोमहर्षक विजयाचे अनेक किस्से आहेत. ज्यात आपल्या फलंदाज, गोलंदाज आणि यष्ठीरक्षकांनी अत्यंत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे.
आज आपण अशा एका सामन्याबद्दल जाणून घेणार आहोत, जो आपल्या हातातून निघून जात होता परंतु विकेट पडल्या तरी देखील भारताच्या यष्टिरक्षकाने हा सामना टिकवला होता. या रोमांचकारी सामन्यात उत्तम कामगिरी करत भारताने न्युझीलंडवर २ विकेट राखून विजय संपादन केला होता.
कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात टीम इंडिया १९९९ साली न्यूझीलंडच्या दौऱ्यावर रवाना झाली होती. त्यावेळी टीम इंडियाची गोलंदाजी न्यूझीलंडच्या पिचवर इतकी प्रभावी नव्हती. न्यूझीलंडचे फलंदाज मात्र दुसरीकडे भारतीय गोलंदाजांना पाणी पाजण्यासाठी तयार होते. त्यावेळी भारतीय संघात उत्तम सलामीचे फलंदाज आणि उत्तम मिडल ऑर्डर फलंदाज देखील होते.
नेपीयरच्या मैदानावर न्यूझीलंडच्या कॅप्टनने सर्वात आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा एक डे नाईट कसोटी सामना होता. न्यूझीलंडचा कॅप्टन डीजे नॅश याने सर्वप्रथम फलंदाजी करत स्कोअर बोर्डवर धावांचा डोंगर उभा करण्याचा निश्चय केला होता.
रात्रीच्या वेळी बॉल अधिक स्विंग होत असल्याने भारतीय फलंदाजांच्या अडचणीत वाढ झाली होती. न्यूझीलंडने खेळायला सुरुवात केली तेव्हा दोन ओव्हरमध्ये न्यूझीलंडला भारतीय संघाने पहिला धक्का दिला. फलंदाज बीए यांग ७ चेंडूत ४ रन बनवून परतले. सलामीच्या फलंदाजाने चुकीचा रन कॉल घेतल्याची किंमत यंग यांना मोजावी लागली होती. आपला साथीदार ६ रन करून बाद झाला हे बघून एमजे हॉर्न यांच्यावर जबाबदारी वाढली होती.
मॅच पुढे सरकत होती आणि हॉर्न आपल्या फलंदाजीचे उत्तम प्रदर्शन दाखवत होता. त्याने फलंदाजीच्या बळावर कुठलीही विकेट न गमावता, टीमला ८० रन्स करून दिले होते. त्याला मॅकमिलनची उत्तम साथ लाभली. दोघेही चांगली खेळी खेळतील असे वाटत असताना २८ रन करून मॅकमिलन तंबूत परतले.
हे सगळं शक्य झालं होतं अझरुद्दीनच्या तेज डोक्यामुळे! ज्यावेळी भारतीय गोलंदाज विकेट घेऊ शकत नाही, हे अझरुद्दीनच्या लक्षात आलं त्याने बॉल रॉबिन सिंहच्या हातात दिला. रॉबिनने मॅकमिलनला विकेटकिपर नयन मोंगियाच्या हस्ते आउट केले आणि न्यूझीलंडला झटका दिला.
मॅकमिलनच्या विकेटनंतर भारतीय संघात उत्साह संचारला होता. टीम इंडियाचे खेळाडू न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमधे परत पाठवण्यात यशस्वी ठरले होते. कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीन आपल्या साथीदार खेळाडूंना शेवटपर्यंत मार्गदर्शन करत होता.
क्रीझवर आरजी टॉवसने एम जे हॉर्नशी चर्चा केली आणि पुन्हा फलंदाजी करायला परतला. एमजे हॉर्नने क्रीझवर बराच काळ घालवला होता, त्यामुळे नव्या फलंदाजाला समजावून सांगत होते की क्रीझवर कशाप्रकारे खेळायचे.
टॉवसने ३ बॉलमध्ये ५ रन बनवले होते. पण रॉबिन सिंहच्या बॉलवर रन घेण्याच्या गडबडीत मोंगियाने टॉवसला बाद करत, त्याला पव्हेलियनमध्ये रवाना केले. न्यूझीलंडच्या आता ८८ रन्सवर ३ विकेट होत्या.
एकावेळी न्यूझीलंडचे ८२ वर २ बाद होते. पण टॉवस रन आउट झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ संकटात सापडला. फक्त एमी जे हॉर्न एकीकडे सामना ओढत होते. परंतु ३३व्या ओव्हरमध्ये ६१ रन्स करून ते देखील रन आउट झाले. ३५व्या षटकात एडम परोरे १२ बॉलमध्ये ७ रन बनवून नयन मोंगियाच्या हातून रन आउट झाले. आता न्यूझीलंडचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर उरलेला संघ देखील पव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात भारतीय फिल्डर्सने पाच फलंदाज बाद केले होते. न्यूझीलंडने एकूण २१३ धावा केल्या होत्या.
भारतीय संघाला ५० ओव्हरमध्ये २१५ धावा करायच्या होत्या. सचिन-गांगुली ही जोडी मैदानात उतरली. कमी स्कोअर असला तरी दोघांनी आक्रमक सुरुवात केली. ७ ओव्हरमध्ये संघाचे ५० रन पूर्ण झाले होते. न्यूझीलंडच्या कॅप्टन नॅशच्या हातातून सामना निसटत चालला होता. त्याने स्वतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
त्याच्या समोर सचिन होता. त्याने सचिनला आऊट करत सलामीच्या जोडीला तोडले होते. यानंतर स्कोअर ८१ रन्सवर आला त्यावेळी नॅश पुन्हा बॉलिंग करायला आला. त्याने गांगुलीला कॅच आउट करत पव्हेलियनमध्ये रवाना केले. राहुल द्रविड देखील आउट झाला.
कॅप्टन अझरुद्दीन ७ रन बनवून आउट झाला. स्कोअर बोर्डवर फार कमी स्कोअर दिसत होता. २१३ रन्सचे टार्गेट असताना १२२ रन झाले होते आणि अनेक दिग्गज फलंदाज बाद झाले होते.
१८२ रन्सचा आकडा गाठेपर्यंत न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाच्या ७ विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात टीम इंडियाचे ३ फलंदाज रन आऊट झाले होते. टीम इंडियाच्या फलंदाजाना न्यूझीलंडच्या गोलंदाजांपेक्षा तेथील पीच त्रासदायक ठरत होती. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने क्रिकेटर रन आउट होत होते
ज्यावेळी टीम इंडियाचा पराभव दृष्टीक्षेपात होता, अशावेळी नयन मोंगिया बॅटिंग करायला आला. त्याने ३२ चेंडूत ३० धावा काढल्या. त्याच्या बॅटिंगने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यादिवशी मोंगिया फक्त भारताला विजयी करण्याच्या उद्देशाने खेळत होता
२०४ धावा स्कोअर बोर्डवर असताना गोलंदाज निखिल चोपडा देखील रन आऊट झाला होता. आता २०४-८ असा स्कोअर बोर्ड होता. अखेरीस अनिल कुंबळेने मोंगियाला साथ दिली. कुंबळेने ७ बॉलमध्ये ६ रन बनवले आणि भारताला विजय मिळवून दिला. भारतीय संघाने २१४ धावा केल्यावर न्यूझीलंडमध्ये एक ऐतिहासिक विजय नोंदवला होता.
आजही या मॅचमधील जोरदार कामगीरीसाठी मोंगियाची आठवण क्रिकेटप्रेमी काढतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.