आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारत आणि चीन यांच्यात ३ हजार ४८८ किमी लांबीची सीमा आहे. ही सीमारेषा जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतून जाते. पश्चिम सेक्टर म्हणजे जम्मू-काश्मीर, मिडल सेक्टर म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि पूर्व सेक्टर म्हणजे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश अशा तीन विभागांत ही सीमा आहे.
यातल्या खूप भागांवरून दोन्ही देशांमध्ये वाद असल्यानं अजून बऱ्याच ठिकाणी सीमेची निश्चितीच झाली नाहीये. पश्चिम सेक्टरमधल्या अक्साई चीन, पूर्व सेक्टरमधल्या अरुणाचल प्रदेशवर चीन आपला दावा करतो.
अशा वादांमुळेच दोन्ही देशांमध्ये अजूनही प्रत्यक्ष सीमा आखण्यात आलेल्या नाही. पण किमान, आहे ती परिस्थिती कायम ठेवण्यासाठी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणजे प्रत्यक्ष सीमारेषा ही संज्ञा वापरली गेली. पण ही सीमारेषा काही निश्चित नसते.
दोन्ही देश वेगवेगळ्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा दाखवत असतात. या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये डोंगर, दऱ्या, हिमनदी, बर्फाळ प्रदेश अशा भौगोलिक परिस्थितीचा अडथळा पण असतो.
अक्साई चीन या अशाच एका वादग्रस्त भागात भारत-चीन सीमेच्या अगदी जवळच गलवान व्हॅली आहे. चीनच्या शिंजियांग आणि भारताच्या लडाखपर्यंत पसरललेली ही गलवान व्हॅली जवळची LAC अक्साई चीन भारतापासून वेगळा करते. १९६२ च्या यु*द्धात हा गलवान नदीचा प्रदेश यु*द्धाचं मुख्य केंद्र होतं.
भारत आणि चीन यांच्यात झालेल्या एका करारात दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा मान्य करण्याचं आणि त्या भागात कुठलंही बांधकाम न करण्याचं मान्य केलं आहे. पण, गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या या भागात सतत काहीतरी हालचाली दिसून येत होत्या.
गलवान खोऱ्याच्या सीमेवर चीनी सैन्याने टेंट उभारले असल्याचं दिसून आल्यावर आपणही आपली बाजू बळकट करण्यासाठी लष्कराची कुमक आणि सामग्रीची जुळवाजुळव तिथं केली होती.
हे सगळं कशामुळं झालं हे बघायला गेलं, तर अचानक एक नाव पुढं येत, दौलत बेग ओल्डी (DBO).
भारतानं दारबुक-श्योक-दौलत बेग ओल्डी (DSDBO) ज्याला लष्करी भाषेत सब सेक्टर नॉर्थ असं म्हणतात, या ठिकाणी रस्ता करण्याचा निर्णय घेतला. एकूण २५५ किमी चा दारबुक ते श्योक (भारताच्या हद्दीतलं शेवटचं गाव) हा रस्ता LAC ला जवळजवळ समांतर असणारा होता.
१३००० फूट ते १६००० फूट उंची असणारा हा अत्यंत अवघड रस्ता करण्याचा निर्णय २००० साली घेण्यात आला (आता ओरडणाऱ्यांचं सरकार तेव्हाही नव्हतं) त्यासाठी ३२० कोटी रुपये तातडीनं मंजूर केले गेले. या कामाच्या निगराणीचं काम थेट PMO कडून करण्यात येत होतं. 2012 पर्यंत हा रस्ता पूर्ण करण्यात येणार होता, पण श्योक नदीला वारंवार येणाऱ्या पुरांमुळं हा रस्ता वाहून जायचा. थंडीत बर्फामुळं काम बंद ठेवावं लागायचं. त्यामुळे या कामाला उशीर होत गेला.
शेवटी ऑक्टोबर २०१९ मध्ये इथं ४३० मीटर लांब कर्नल चेवांग रिनचेन पूल बांधला, आणि हा रस्ता पूर्ण करण्यात आला.
यादरम्यान म्हणजे श्योक ते काराकोरम पास दरम्यान १६७०० फूट उंचीवर एक पठार आहे, तेच हे दौलत बेग ओल्डी. LAC पासून फक्त ९ किमीच्या अंतरावर. याचं भौगोलिक स्थान असं, की इथून एकाच वेळी अक्साई चीन, पाकव्याप्त काश्मीर आणि काराकोरम हायवे यावर लक्ष किंवा नियंत्रण ठेवता येतं, तेही उंचावरून.
इथं भारताची १६७०० फूट उंचीवर, म्हणजे जगातली सर्वात उंचीवर असणारी हवाई पट्टी आहे. २०१३ मध्ये इथं भारतीय हवाई दलाचं हर्क्युलीस विमान उतरलं, आणि चीनला धक्का बसला होता. तेव्हापासून चीन या भागात वारंवार कुरापती करत आहे.
दौलत बेग ओल्डीवर १९६२ च्या युद्धात भारतानं एक तात्पुरती हवाई पट्टी तयार केली होती. पण त्यानंतर, म्हणजे १९६५ पासून २००८ पर्यंत ती पडीक होती. एअर मार्शल प्रणब कुमार बारबोरा यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणं २००८ मध्ये ते वेस्टर्न कमांडचे प्रमुख झाल्यावर पाहणी करत असताना या धावपट्टीचं महत्व त्यांच्या लक्षात आलं, आणि त्यांनी इथं कायमस्वरूपी धावपट्टी होण्यासाठी प्रस्ताव पाठवले, जे मनमोहन सिंग सरकारने ५ वेळा फेटाळले.
मग हवाई दल आणि मोठ्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात चक्क सरकारला अंधारात ठेऊन २०१३ मध्ये याचं काम पूर्ण करून घेतलं होतं. जी हवाई पट्टी भारताच्या बाजूनं आज गेम चेंजर ठरलीये.
चीन मागे सरकलाय. त्याला सरकावं लागणारच होतं. राजकारणात मतभेद असतात. देशाच्या सुरक्षा किंवा परराष्ट्र धोरणात ही फरक असू शकतो. पण तोपर्यंत आपल्या देशात त्यावरून जे राजकारण झालं, मा. पंतप्रधान आणि संरक्षण खात्यावर टीका झाली, हा सगळा प्रकार म्हणजे आपल्या देशप्रेमाचा आणि सामाजिक ऐक्याचा वर्तमान लसावि आहे, हे नक्की!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.