आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
३ नोव्हेंबर २०१८ या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील बोराटी गावाजवळ एका वाघिणीला ठार करण्यात आलं. अवनी (टी-१) असं नाव असलेल्या या वाघिणीनं १३ नागरिकांचा जीव घेतला होता. त्यामुळं या नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश वन विभागाला मिळाले होते. वनविभागाची टीम आणि शिकारी असगर अली यांनी मिळून या वाघिणीला ठार केलं. त्यानंतर मात्र, वन्यजीव संरक्षक कार्यकर्त्यांनी वन विभागावर टीकेची झोड उठवली. अवनीला बेशुद्द करून पकडण्याचे प्रयत्न करता आले असते मात्र, तसे न करता तीचा खून करण्यात आला, असे आरोप या कार्यकर्त्यांनी केले. मात्र, अशी घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती.
इतिहासात अशीही एक वाघिण आहे जिच्या नावावर चक्क ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये विक्रम नोंदवण्यात आला आहे. तिनं तब्बल ४३६ लोकांचा जीव घेतला होता. ‘चंपावत’ असं या वाघिणचं नाव आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला या वाघिणीनं अक्षरश: मृत्यूचं तांडव उभ केलं होतं.
पश्चिम नेपाळच्या जंगलातील रुपल गावात राहणारी थारू ही व्यक्ती चंपावतची पहिली शिकार ठरली. त्यानंतर ती हळहळू भारताच्या कुमाऊं प्रदेशाकडे सरकली. प्रामुख्यानं जंगलात सरपण आणि हस्तकलेच्या वस्तूंना लागणारं साहित्य गोळा करण्यासाठी जाणाऱ्या मुली व महिला तिच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. अल्पावधीतच उत्तर भारतातील अनेक गावांमध्ये तिची दहशत पसरली. शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाणं सोडलं, इतकंच काय दिवसादेखील कुणी लवकर घराबाहेर पडण्यास धजावत नव्हतं.
एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाचे वजन 500 पौंडाहून अधिक असू शकतं. चार इंचाची नखं असेलेले त्याचे पंजे एका फटक्यात माणसाचा जीव घेऊ शकतात. वाघ एखाद्या रेसच्या घोड्याच्या वेगानं धावू शकतात. त्यांचे कान देखील अतिशय तीष्ण असतात. अगदी जवळपास असलेल्या व्यक्तीनं लाळ गिळली किंवा श्वास जरी घेतला तरी तो आवाज वाघ ऐकू शकतात.
शक्यतो वाघ स्वत:हून व्यक्तीवर हल्ला करत नाही आणि केला तरी त्याचे मांस खात नाही असं मानतात. मात्र, चंपावत या बंगाली वाघिणीनं हे सर्व समज मोडीत काढले. तिला माणसाच्या मांसाची चटकच लागली होती. तिने आपल्या झोपड्यांमध्ये झोपलेल्या कित्येक लोकांना ओढून नेलं होतं. तिच्या या वर्तवणुकीमागे अनेक कारणे होती. भारतात सत्ता असलेल्या ब्रिटिशांनी लाकूड आणि शेत जमिनीसाठी जंगलं व गवताळ कुरणं मोठ्या प्रमाणात नष्ट केली होती. त्यातच ब्रिटिशांना शिकारीचा देखील मोठ शौक होता. त्यांनी वाघांचे खाद्य असलेल्या कित्येक प्राण्यांची शिकार केली. त्यामुळे वाघांचा अधिवास आणि खाद्य दोन्ही गोष्टी धोक्यात आल्या अन् त्यामुळं चंपावतनं आपला मोर्चा मानवी वस्तीकडं वळवल्याचं अभ्यासक सांगतात.
ब्रिटिशांनी चंपावतला मारण्यासाठी बक्षिसांसाठी काम करणाऱ्या काही स्थानिक शिकाऱ्यांनाही पाचारण केले होते. याशिवाय काही पोलीस अधिकारी आणि लष्कराच्या जवानांनी देखील प्रयत्न करून पाहिला होता. मात्र, चंपावत कुणालाही दाद देत नव्हती.
१९०७ला नैनीतालचे उपायुक्त चार्ल्स हेन्री ब्रेथहूड यांनी त्यांचा मित्र जीम कॉर्बेट यांची भेट घेतली. कुमाऊंमध्ये स्थायिक झालेल्या एका आयरिश पोस्टमास्तरचा जीम मुलगा होता. त्यांची आणि कुमाऊंतील स्थानिक शिकाऱ्यांची चांगली मैत्री होती. अगदी बालपणापासून कुमाऊंतील जंगलं त्यांनी पालथी घातलेली होती. एका बिबट्याला मारून वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी जीम यांनी आपली पहिली शिकार केली होती. प्राण्यांचा माग काढण्यात जीम निष्णात होते. बिबट्याच्या गुरगरण्याची नक्कल करून त्यांनी कित्येक डिनर पार्ट्यांमध्ये लोकांना गमतीनं भीती दाखवलेली होती.
ब्रेथहूड अनेकदा आपल्या या मित्राला भेटण्यासाठी जात असतं. मात्र, यावेळची त्यांची भेट सामान्य नव्हती. चंपावतला मारण्यासाठी त्यांनी जीम यांना गळ घातली. जीम त्यांची शेवटची आशा होते. चंपावतच्या ठावठिकाण्याची कुठलीही माहिती नसताना जीम यांनी आपल्या मित्राची विनंती मान्य केली.
आपले सावज शोधण्यासाठी जीमला जास्त वाट पहावी लागली नाही. ब्रेथहूड भेटून गेल्यानंतर पाच दिवसातच चंपावतनं शहरापासून ६० मैलावर असलेल्या गावात एका महिलेचा बळी घेतला. त्याची खबर जीमपर्यंत पोहचवण्यात आली. त्यांनी ६ स्थानिक शिकाऱ्यांसह तत्काळ त्या गावाकडे धाव घेतली. त्यांनी कित्येक दिवस वाघिणीचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना यश आलं नाही. गावकऱ्यांच्या सल्ल्यावरून त्यांनी आपला मुक्काम ‘चंपावत’ या गावी हलवला. याच ठिकाणी वाघिणीनं सर्वात जास्त बळी घेतल्याची नोंद आहे. जीम आणि त्यांची टीम गावात पोहचल्यानंतर काही दिवसातचं वाघिणीनं प्रेमिका देवी नावाच्या १६ वर्षीय मुलीचा बळी घेतला आणि तिला जंगलात ओढत नेलं. खाली सांडलेल्या रक्तावरून माग काढण्याचा मार्ग जीमला मिळाला.
त्यानंतर सुरू झाला जिवघेणा पाठलाग! रक्ताचा आणि पावलांचा मागोवा घेत-घेत जीम घनदाट जंगलात पोहचले. वाटेत त्यांना मुलीचा स्कर्ट, हाडांचे काही तुकडे आणि रक्तानं माखलेला पाय सापडला. याचा अर्थ ती नरभक्षक वाघिण जवळचं होती. मात्र, खूप शोध घेऊनही ती हाती आली नाही. शेवटी जीमला माघार घ्यावी मात्र, त्याचवेळी त्यांच्या डोक्यात एक योजना आकार घेत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी ३०० गावकऱ्यांसह जीम कॉर्बेटनं वाघिण लपलेल्या खोऱ्यात प्रवेश केला. त्यांनी जोरजोरात ढोल-ताशे बडवले. शरीरातील सर्व बळ एकवटून त्यांनी आरडाओरड सुरू केली. कार्बेटला माहित होतं सावज टिपण्यासाठी त्यांना अगदी काही सेंकद मिळणार आहेत आणि वेळ किंवा नेम चुकला तर मृत्यू अटळ आहे. तरी देखील त्यांनी धोका पत्करला.
काही वेळ वाट पाहिल्यानंतर घनदाट जंगलाच्या सावल्यांमधून मार्ग काढत राजेशाही थाटात चंपावत बाहेर येताना दिसली. जीमनी निशाणा लावला मात्र, तो चुकला, दुसरी आणि तिसरी गोळी चंपावला लागली. दोन गोळ्या लागूनही चंपावत शांत झाली नाही. तोपर्यंत जीमची काडतूसं संपली होती. लगेच काही हालचाल केली नाही तर चवताळलेली चंपावत जीमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय सोडणार नव्हती.
जीमनं तडक २० फूट अंतरावर असलेल्या एका गावकऱ्याच्या हातातून एक शॉटगन घेतली आणि एक चंपावतच्या दिशेनं एक स्फोट घडवून आणला. त्याचक्षणी नरसंहार करणारी चंपावत वाघिण शांत झाली. शेकडो लोकांचे बळी घेणाऱ्या नरभक्षकाला शांत करण्यात जीम कॉर्बेटला यश मिळालं.
चंपावतच्या मृत्यूनंतर हजारो गावकऱ्यांनी आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी गावातच एक मेजवानी आयोजित केली होती. मात्र, जीम शिकारी असले तरी चंपावतला मारल्याचं त्यांना काहीसं दु:ख झालं. गावकऱ्यांची मेजवानी न स्विकारता चंपावत वाघिणीच्या कातडीसह आपलं घर गाठलं.
यानंतर जीम कॉर्बेट यांनी कित्येक नरभक्षकांना ठार केलं. १९३८ला वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी आपली शेवटची शिकार केली. त्यांच्या कार्यासाठी ब्रिटिश आणि भारत सरकारनं त्यांचा गौरव केला. आयुष्याच्या शेवटच्या दोन दशकांमध्ये त्यांनी वन्य प्राणी आणि जंगलांच्या संरक्षण व संवर्धनासाठी काम केलं. वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास किती महत्त्वाचा आहे याबाबत त्यांनी लोकांच्या मनात जागृती केली.
एकेकाळी वाघांचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आता वाघांची संख्या अतिशय कमी झाली आहे. जंगलांचा नाश आणि शिकार ही यामागची मुख्य कारणं आहेत. अजूनही अधून-मधून वाघ मानवावर हल्ले करत असल्याच्या घटना घडतात. २०१४मध्ये नैनीतालच्या एका राष्ट्रीय उद्यानातून पळालेल्या वाघानं १० नागरिकांचा जीव घेतल्याची घटना घडली होती आणि त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव होतं ‘जीम कॉर्बेट नॅशनल पार्क’!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.