आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतातील वसाहतवादाचा आणि विस्तारवादाचा परिणाम आजही अनेक स्थानिक भाषांवर आहे. अनेक परदेशी शब्द भारतीय भाषांमध्ये मिसळले आहेत. अशा प्रकारच्या शब्दांचं पुन्हा शुद्धीकरण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांच्या राजाभिषेकाच्या आधी ‘राज्यव्यवहारकोष’ तयार करून घेतला होता. त्यातील शब्दांनुसार मराठी भाषेतील फारसी आणि उर्दू शब्द काढून टाकण्यात आले. त्यांना पर्याय म्हणून संस्कृत आणि मराठी शब्दांची योजना करण्यात आली.
कित्येकदा आपल्याला आपण फारसी किंवा उर्दू शब्द वापरतोय याचं भानही नसतं. ‘बाप’ हा शब्द उर्दू असूनही संत ज्ञानेश्वरांसारख्या थोर साहित्यिकांनीही आपल्या साहित्यामध्ये त्याचा वापर केला, कारण तेराव्या शतकापर्यंत हा उर्दू शब्द मोठ्या प्रमाणात लोकांनी वापरायला सुरुवात केली होती.
त्याचप्रमाणे दवाखाना, कमी, जकात, मुलाखत, दर्या, बक्षीस, बाग, किल्ला, बुरुज, शहर, बाजार, हजार, साहेब, शिपाई, जिल्हा, कायदा, गुन्हा, शिफारस, सरकार, अस्मान, कागद, कारखाना, कारसेवा, कारनामा, सरखेल, शाहीर आणि यासारखे अनेक शब्द फारसी किंवा उर्दू भाषेतून आले आहेत.
याला कारणही तसेच आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकापासून भारतावर परकीय आक्र*मणे व्हायला सुरुवात झाली. या परकीय आणि विशेषतः जुलमी इस्लामी आक्र*मणांचा कळस म्हणजे बाराव्या शतकातील अल्लाउद्दीन खिलजीचे यादवांवरील आक्र*मण. बाराव्या शतकात खिलजीने देवगिरीचा गरुडध्वज उ*ध्वस्त केला आणि शिवरायांचा उदय होईपर्यंत ३०० वर्षं महाराष्ट्राची संस्कृती, धर्म आणि भाषा परकीय टाचांखाली राहिले. दरम्यानच्या काळात ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव यांसारख्या संतांनी समाजाला एकजूट ठेवण्याचे बहुमूल्य काम केले. पण परकीय शब्द नकळत मराठी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये शिरले.
फक्त मराठीच्याच बाबतीत हे घडलं असं नाही. तर सर्वच भारतीय भाषांच्या बाबतीत हे घडलं. दुबाकुर हा तामिळ भाषेत सहसा वापरला जाणारा शब्द आहे. या शब्दाचा अर्थ फसवणूक करणारा माणूस किंवा कॉनमॅन असा होतो. परंतु या शब्दाची मुळे मध्ययुगीन भारतात आहेत. दुबाकूर हा शब्द तामिळ भाषेत अपभ्रंशित झालेला असून मूळ शब्द दुभाषी असा आहे. दुभाषी म्हणजेच ट्रान्स्लेटर.
दुभाष्याची गरज
ज्या युरोपीय देशांनी भारतात व्यापार करण्यास सुरुवात केली त्यांना एका मोठ्या समस्येला सामोरं जावं लागलं, ती म्हणजे भाषा. युरोपियन भाषांपेक्षा भारतातील सर्व प्रदेशांची भाषा मोठ्या प्रमाणात भिन्न होती. युरोपियन व्यापाऱ्यांना स्थानिक भाषेचे युरोपियन भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी कोणाची तरी आवश्यकता होती, तर भारतीयांनाही युरोपीय लोकांच्या भाषेचे भारतीय भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी कोणाची तरी आवशक्यता होती.
भाषेच्या या अडथळ्याने युरोपियन व्यापाऱ्यांच्या अंतर्गत वर्तुळांमध्ये एका नव्या आणि फायदेशीर नोकरीची संधी उपलब्ध करवून दिली – ती म्हणजे दुभाषी. दक्षिणेकडील दुभाष्यांना सहसा तमिळ, तेलगू, इंग्रजी आणि फ्रेंच भाषा अस्खलितपणे येत होत्या. यामुळे ते व्यापारावर उत्तम प्रकारे लक्ष ठेऊ शकले.
पदाचा गैरवापर?
दुभाष्याच्या या पदावरील माणसावर मोठी जबाबदारी असे पण त्याचबरोबर दुभाषी असल्याचा प्रचन्ड अभिमानही या पदावरील माणसाला असायचा. जेव्हा ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला मद्रास (आधुनिक चेन्नई) तयार करण्यासाठी जमीन भाड्याने द्यायची होती, तेव्हा पेरांबूर येथील दुभाष्याने स्थानिक शासक आणि ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात वाटाघाटी करण्यास मदत केली. ‘लीज डीड’वर स्वाक्षरी झाल्यानंतर, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना भाडे करार देण्यासाठी तो दुभाषी एका मिरवणुकीमध्ये हत्तीवर आला.
अनेक दुभाषींनी एजन्टप्रमाणे नफा कमवायला सुरुवात केली. ब्रिटिशांचे दुभाषी स्थानिक व्यापाऱ्याकडून किंवा शेतकऱ्याकडून कमी किमतीत अन्न-धान्य किंवा वस्तू खरेदी करीत असे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या वस्तू किंवा अन्न-धान्य चढ्या भावाने विकत असे. स्थानिक भाषा अवगत नसल्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुभाषांवर विश्वास ठेवला होता. सुमारे १२ दुभाषांनी मद्रास शहराद्वारे संपूर्ण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर वर्षाकाठी लाखो पौंड्सचा नफा कमावला.
दुभाषी किंवा ‘दुबाकूर’ याचा अर्थ ‘फसवणूक करणारा’ असाच का?
दुभाषांनी फक्त आर्थिक फायदाच करून घेतला नाही तर ब्रिटीश गव्हर्नर्सना पदच्युत करण्यासाठी आणि समान हितसंबंध असलेल्या लोकांना उच्च पदांवर बसवण्यातही हे दुभाषी पारंगत होते. त्यामुळे समाजामध्ये दुभाषांची प्रतिमा काळवंडायला सुरुवात झाली. लोकांच्या मते, ती फसवणूक करणारी माणसे होती. त्यामुळे हळूहळू दुभाषी या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि ‘दुबाकूर’ हा शब्द प्रचलित झाला. याशिवाय लोकांच्या गैरसमजुतीमुळे दुबाकूर या शब्दाचा अर्थ ‘फसवणूक करणारा’ असा बनला.
ब्रिटिश काळात दुभाषी प्रचंड श्रीमंत होत गेले. त्यांनी शहरात बंगले खरेदी केले आणि त्यांची संपत्ती वाढतच राहिली. चेन्नईतील अनेक रस्त्यांची नावे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारामध्ये मदत करणाऱ्या दुभाष्यांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत. उदाहरणार्थ थंबू चेट्टी स्ट्रीट. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सत्तेत आल्यानंतरही मुघल शासकांना कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी दुभाष्याशी संपर्क साधावा लागत असे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्यांसाठी दुभाषी हे शत्रू आणि मित्र यांच्यातील संवादाचे एकमेव साधन होते.
काही अंशी भारत पारतंत्र्यात जाण्यासाठी दुभाषीसुद्धा जबाबदार आहेत. त्यातून बरीच संपत्ती कमावली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.