आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करण्यात बॅ. मुहम्मद अली जिन्ना यांची भूमिका किती महत्वाची होती हे तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु, पाकिस्तानच्या फाळणीला जिन्नांइतकेच मुंबईचे दोन डॉक्टरही जबाबदार आहेत. ज्यांनी जिन्नांना टीबी असल्याचे आणि जिन्ना जास्त काळ जिवंत राहू शकत नसल्याचे सर्वांपासून लपवून ठेवले.
पाकिस्तानच्या निर्मितीनंतर वर्षभरातच मोहम्मद अली जिन्ना यांचे निधन झाले. अर्थात मुंबईच्या या डॉक्टरांनी जिन्नांना याची पूर्वकल्पना दिली होती. पण, जिन्नांनीच त्यांना ही माहिती गुप्त राखण्याची विनंती केली होती.
त्यांना गंभीर आजार आहे, ही बाब जर कॉंग्रेस आणि ब्रिटिशांना समजली तर पाकिस्तानच्या निर्मितीत खीळ बसेल, अशी भीती जिन्नांना होती.
जिन्नांना सिगारेट पिण्याचे प्रचंड व्यसन होते. आयुष्यातील सुमारे पन्नास वर्षे तरी या व्यसनाने त्यांचा पिच्छा पुरवला होता. सलग सिगारेट पिल्याने त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत होता. ही बाब त्यांच्याही लक्षात येत होती. मात्र स्वतःच्या तब्येतीपेक्षाही त्यांना पाकिस्तान निर्मितीचा प्रश्न महत्वाचा वाटत होता. म्हणून त्यांनी आपल्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले.
जिन्नांना आपल्या प्रकृतीत काही तरी गंभीर बिघाड झाल्याची जाणीव होऊ लागली होती. पण, तेव्हा देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. फाळणीच्या मागणीने चांगलाच जोर धरला होता. अशात जिन्नांना काही गंभीर आजार असल्याची बातमी पसरली असती तर, कदाचित फाळणीच्या निर्णयावर याचा विपरीत परिणाम झाला. म्हणून आपल्या स्वास्थ्य संबधीत तक्रारी त्यांनी कधीच जाहीर केल्या नाहीत.
फाळणीची वेळ जवळ आली होती आणि जिन्नांचे अखेरचे दिवसही. फाळणीचे स्वप्न पूर्ण झाले असले तरी पाकिस्तानची एक शक्तिशाली देश म्हणून उभारणी करण्याचे त्यांचे स्वप्न मात्र अपुरेच राहिले.
मुस्लीम लीगचे प्रमुख आणि त्यांचे मित्र हुसैन अली यांनी मुंबईच्या एका डॉक्टरांना भेटून आरोग्याची तपसणी करावी असा सल्ला दिला. पण, जिन्नांना याबाबत अजिबात बेफिकिरी चालणार नव्हती. त्यांना वाटत होते, जर या डॉक्टरकडून माझ्या प्रकृती विषयीची बातमी काँग्रेसमध्ये आणि ब्रिटीश सरकारपर्यंत पोहोचली तर, पाकिस्तानची निर्मिती होऊ शकणार नाही. परंतु तरीही हुसैन यांनी मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर जाल रतनजी पटेल यांच्यासोबत त्यांची भेट घडवून आणलीच.
डॉ. पटेलांकडे जिन्ना अधूनमधून किरकोळ तक्रारींवर औषध घेण्यास जात होते. त्यामुळे पटेल डॉक्टर आपल्याशी विश्वासार्हतेने वागतील याची त्यांना पूर्ण खात्री पटली. अशी खात्री पटल्यावरच ते डॉ. पटेलांना भेटण्यास तयार झाले. हुसैन यांनी जीन्नांची डॉ. पटेल यांच्याशी अपॉइंटमेंट ठरवली.
डॉ. पटेल यांनी जेव्हा जिन्नांना तपासले तेव्हाच त्यांना शंका होती की जिन्नांना ट्यूबरक्युलॉसिसने गाठले आहे. हा टीबी अशा टप्प्यावर होता जिथे जिन्नांवर कोणत्याच औषधांचा परिणाम होणार नाही, याचाही अंदाज त्यांना आला होता.
तरीही या गोष्टीची खात्री करण्यासाठी जिन्नांचा एक्सरे काढून पाहणे गरजेचे होते. त्यांनी जिन्नांना एक्सरे करण्याचा सल्ला दिला. परंतु जिन्नांना एक्सरेचीदेखील भीती वाटत होती. एक्सरे काढून घेण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. अर्थात, त्यांना भीती एकाच गोष्टीची होती की ही गोष्ट बाहेर पसरेल. परंतु डॉक्टर पटेलांनी त्यांना सांगितले की एक्सरे काढणारे डॉक्टर देखील पारसीच आहेत आणि त्यांच्या चांगल्या परिचयाचे आहेत. तेही ही बाब गुप्त ठेवतील आणि कुणापुढेही याची वाच्यता करणार नाहीत. जिन्नांना त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही, असे डॉ पटेलांनी आश्वस्त केल्यानंतर जिन्ना एक्सरे करून घेण्यास तयार झाले.
डॉक्टरांच्या सांगण्यावरून जिन्नांनी एक्सरे काढून घेतला. एक्सरेतून ही बाब तर स्पष्ट होत होती की जिन्नांना ट्यूबरक्यूलॉसिस झाला आहे. शिवाय, तो अशा अवस्थेत होता की जिन्नांवर औषधोपचार करूनही त्यांच्या त्याब्येतीत सुधारणा झाली नसती.
जिन्नांच्या इच्छेचा मान राखत दोन्ही डॉक्टरांनी जिन्नांच्या या आरोग्य विषयक समस्येची माहिती गोपनीयच ठेवली. त्यावेळी फाळणीवरून भारतात बरेच वादविवाद चर्चा सुरु होत्या. फाळणीनंतरही दोन्हीकडे भीषण दं*गल माजली, तरीही या डॉक्टरांनी ही माहिती उघड केली नाही. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर जिन्नांनी डॉ. पटेल यांना पाकिस्तानमध्ये मोठे पद देण्याचे आश्वासन दिले आणि त्यांना पाकिस्तानात येण्याचे आमंत्रणही दिले. मात्र डॉ. पटेलांनी याचा स्वीकार केला नाही. त्यांनी भारतातच राहणे पसंत केले.
डॉमिनिक लेपियर जेंव्हा ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ हे पुस्तक लिहित होते तेंव्हा त्यांनी डॉ. पटेलांची भेट घेतली. त्याकाळात डॉ. पटेल हे मुंबईतील एक प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यामुळे ते नेहमीच व्यस्त असत तरीही त्यांनी घाईघाईत डॉमिनिक लेपियर यांची भेट घेतली. त्याकाळी ते ग्रँट मेडिकल कॉलेजचे डीन देखील होते.
१९४० ते १९६० च्या दशकात त्यांचे नाव नामचीन फिजिशियन म्हणून घेतले जाई. लेपियर जेंव्हा त्यांना भेटायला गेले तेंव्हा त्यांनी आपल्या कपाटातून एक फाईल काढली ज्यावर लिहिले होते, मोहम्मद आली जिन्ना. लेपियर यांच्याकडे त्यांनी ती फाईल दिली. नंतर पटेलांच्या या कृत्यावरून अनेकांनी त्यांना आपल्या टीकेचे लक्ष केले.
राष्ट्रहिताचा विचार करून त्यांनी या गोष्टी आधीच जाहीर करायला हव्या होत्या असेही म्हटले गेले. परंतु जर हे वास्तव उघड झाले असते तर माउंटबॅटनने ही फाळणीच होऊ दिली नसती, अशा विचारधारेचेही काही लोक होते.
डॉ. जाल पटेल हे मुंबईतील एक उच्च प्रतिष्ठित डॉक्टर होते. त्यांच्याकडे उच्चभ्रू समाजातील अनेक रुग्ण उपचारासाठी येत असत. त्यांच्या रुग्णांमध्ये मोठमोठे नेते आणि मंत्र्याचाही समावेश होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन १९६२ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने डॉ. पटेल यांच्या विषयी माहिती छापून आली होती तेव्हा त्याच्या अनेक चाहत्यांनी पाकिस्तान पेपरमध्ये त्यांचे कौतुक करणारे अनेक पत्रव्यवहार छापून आले होते.
त्यावेळी जर त्यांनी जिन्नांच्या आजाराची माहिती उघड केली असती तर कदाचित आज पाकिस्तान अस्तित्वात नसता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.